कोरोना काळात दिली सेवा, तरी नाकारला मृत एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा 

ST Bus
ST Bus

अमरावती ः कोविडच्या काळात सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना ५० लाखांच्या विम्याचे संरक्षण देण्याची घोषणा महामंडळ तसेच शासनाने केली खरी, मात्र अद्यापही कोरानामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम मिळत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच मागील तीन महिन्यांपासून पगारच नसल्याने अनेक कर्मचारी कर्जबाजारीसुद्धा झाले आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील तसेच राज्याबाहेरील स्थलांतरीत नागरिकांना त्यांच्या गावांना एसटी बसने पोहोचवून देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात आली. या काळात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जर कोरोनाने मृत्यू झाल्यास ५० लाख रुपयांच्या विम्याचे संरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली. तसे पत्रकसुद्धा काढण्यात आले. एसटी महामंडळात सेवा बजावत असताना राज्यात आजवर ४२ कर्मचारी कोरोनामुळे मृत्युमुखी पडले. मात्र, त्यापैकी केवळ सहाच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ देण्यात आला, असा आरोप मोटार कामगार फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

३६ कर्मचाऱ्यांना विमासुरक्षा क्‍लेम नाकारण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले आहेत. घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यानंतर आता पुढे काय करावे, असा प्रश्‍न घरातील सदस्यांसमोर उभा ठाकला आहे. मुलांचे शिक्षण, आरोग्यावरील खर्च, दैनंदिन गरजा कशा भागवाव्यात, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. क्‍लेम नाकारण्याचे कारणसुद्धा समोर करण्यात आले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसार विमाधारक कर्मचारी १५ दिवस आधी व त्यानंतर कामगिरीवर असणे आवश्‍यक आहे. मात्र, सदर कालावधीत लॉकडाउन असल्याने राज्य परिवहन महामंडळाची बससेवाच बंद होती. प्रवासी वाहतूक बंद होती तर कर्मचारी कामगिरीवर कसे राहणार? असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे. मात्र या नियमामुळे मृत्यू पावलेल्या ३६ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

एसटी महामंडळाच्या जाचक नियमांमुळे ३६ कर्मचाऱ्यांना विमा क्‍लेम नाकारण्यात आला आहे. हा त्यांच्यावरील अन्याय आहे. जर बससेवाच सुरू नव्हती तर कर्मचारी कामावर कसे उपस्थित राहणार, याचा विचार महामंडळ आणि शासनाने केला पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ देण्यासाठी संघटना पाठपुरावा करीत आहे. 
- शैलेश विश्‍वकर्मा, अध्यक्ष, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com