यवतमाळ : अनेक संकटांशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाचाही मुकाबला सुरू केला आहे. मात्र असे असले तरी गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातील 28 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. मार्च महिन्यात आठ, एप्रिल 16 तर मे महिन्यात आतापर्यंत चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
नैसर्गिक, सुलतानी संकट, शेतमालाला नसलेला भाव, कर्जांचा डोंगर अशा अनेक संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपला जीवनप्रवास थांबविला आहे. 2001 ते 2020 या काळात तब्बल साडेचार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चौकशी केल्यानंतर यातील एक हजार 775 पात्र; तर दोन हजार 691 शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत.
गेल्या वीस वर्षांच्या काळात शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात, यासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या गेल्या. मात्र, यातील किती योजनांचा शेतकऱ्यांना थेट लाभ झाला, यावर वाद-विवाद सुरूच आहे. असे असले तरी शेतकऱ्यांमागे लागलेले समस्यांचे शुक्लकाष्ठ काही संपलेले नाही. कधी अस्मानी तर कधी सुलतानी अशा संकटात शेतकरी कायमच अडकलेला आहे. यंदा तर कोरोनाच्या संकटातही शेतकरीच अधिक भरडला जात आहे.
रब्बी हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांना या काळातील पीक एकतर कवडीमोल भावाने विकण्याची; तर काहींवर अक्षरश: फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी या काळातही अडचणीत आला आहे. देश लॉकडाउन असताना शेतकरी आपल्या शेतातील माल विकावा कसा, या मानसिकतेत होते. यामुळेच लॉकडाउनच्या काळात जिल्ह्यातील 28 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
जानेवारी ते मे या काळात जिल्ह्यातील 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील 73 प्रकरणे चौकशीत असून, एक शेतकरी आत्महत्या अपात्र ठरली आहे. येणाऱ्या काळात शेती तसेच शेतकरी या वर्गाला कसा दिलासा देता येईल, याचा विचार होणे आता गरजेचे झाले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.