गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात 'शिक्षण तुमच्या दारी उपक्रम'

Bhamragarh school
Bhamragarh school

भामरागड (जि. गडचिरोली) : कोरोनाच्या संकटामुळे शाळांच्या अंतिम शैक्षणिक सत्रापासून राज्यभरातील शाळा बंद आहेत. या पुढेही कधी सुरू होणार याचा नेम नाही. त्यामुळे शहरात खासगी शिकवणी वर्ग घेणाऱ्या संचालकांनी तसेच काही नामांकीत शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. मात्र, इंटरनेटची सोय नसल्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पातील विद्यार्थ्यासाठी 'शिक्षण तुमच्या दारी' हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. भामरागड तालुक्‍यातील दुर्गम गावात जाऊन तेथील शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.

कोरोना विषाणुमुळे जग हादरून गेले आहे. यामुळेच सरकारने संचारबंदी लागू केली. त्यामुळे विद्यार्थ्यांची द्वितीय सत्राची परीक्षा न घेता सुट्ट्या जाहीर केल्या. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मार्चमध्ये घरी सोडण्यात आले. पुढे शाळा कधी सुरू होणार याचीही शाश्वती नाही. चार ते पाच महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची लिंक तुटू नये, शिक्षण ही प्रक्रिया अविरत सुरू राहावी त्यासाठी लोक बिरादरी आश्रम शाळेचे संचालक अनिकेत आमटे यांच्या प्रेरणेने व आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे यांच्या कल्पनेतून व पुढाकाराने 'शिक्षण तुमच्या दारी' हा अभिनव उपक्रम दुर्गम गावामध्ये राबविला जात आहे.

इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक ज्ञान, गोष्टी, खेळ, लेखन, वाचन, गणितीय क्रीया, इंग्रजी शिक्षण देण्यात येत आहे. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविला जात आहे. विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत घेण्यात येते आहेत. गावागावात लोक बिरादरीतर्फे सुरू असलेले शिकवणी वर्ग शाळा सुरू होईपर्यंत राहणार आहेत. प्रत्येक शिकवणी वर्गाला 95 ते 100 टक्के विद्यार्थी उपस्थित राहतात हे विशेष! भामरागड तालुक्‍यातील लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसातर्फे यंदा पहिल्यांदाच सुरू केलेल्या एका नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

केंद्रांची निवड
सर्वत्र लॉकडाउन असल्यामुळे येथील शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टीत स्वगावी जाता आले नाही. त्यामुळे इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग प्रत्यक्ष त्यांच्या गावी जाऊन घ्यायचे ठरले. त्यासाठी इयत्ता पहिली ते नववीसाठी तालुक्‍यात 12 केंद्र व इयत्ता दहावी व बारावीसाठी पाच केंद्र निवडण्यात आले.

लॉकडाउनच्या नियमांचे पालन
तेंदूपत्त्यांचा हंगाम संपताच आणि लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळताच शिकवणी वर्गाला सुरवात करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर परिसरातील दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून विद्यार्थी पालकांसोबत येतात. एका केंद्रावर दोन शिक्षक याप्रमाणे सरकारच्या लॉकडाउन नियमांचे पालन करीत, सामाजिक अंतर राखून, तोंडावर मॉस्क लावून 20 विद्यार्थ्यांचा एक वर्ग याप्रमाणे गावांतील मोकळ्या जागेत झाडाखाली विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com