
यवतमाळ : जिल्ह्यात एक हजार सातशेच्यावर ग्रामपंचायती, दहा नगरपालिका व सहा नगरपंचायती आहेत. असे असतानाही तब्बल दहा गावे ‘ना ग्रामपंचायतमध्ये आहेत ना नगरपालिका क्षेत्रात' त्यामुळे या गावांतील जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चार गावे एका तालुक्यात आहेत, तर त्या गावांचा समावेश दुसऱ्या तालुक्यातील पंचायत समितीत असल्याने शासकीय योजनांचा लाभ घेताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
परिणामी, यांसह इतर काही गटग्रामपंचायतींमध्ये असलेल्या गावांनी स्वतंत्र गामपंचायतीसाठी मागणी करूनही अद्याप निर्णय झालेला नाही.
१४ व्या वित्त आयोग, स्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, रस्ते अशा अनेक सार्वजनिक कामांसाठी ग्रामपंचयातीला निधी वितरित केला जातो. नगरपालिका हद्दीत असलेल्या भागासाठी नगरपालिकेला निधी वितरित केला जातो. मात्र, जी गावे ग्रामपंचायत अथवा पालिका हद्दीत नाहीत, अशा गावांना या योजनांचा लाभ घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावे ग्रामपंचायत व पालिका हद्दीत नसल्याने विकासकामांसाठी निधी वितरित केला जात नाही. त्याचा विपरीत परिणाम या गावांत झाला आहे.
याशिवाय, प्रमाणपत्र घेताना अडचणी येत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात प्रशासनाने या ठिकाणी प्रशासक नेमले आहेत. मात्र, गावात कुठेच काही नसल्याने त्यांची भेटही दुर्मीळ ठरत आहे. पंचायत समितीस्तर व इतर वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेतानाही त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यवतमाळ तालुक्यातील शहरालगत असलेला भाग उद्योगनगर, दिघोरी, वरुड ईजारा, पांढरकवडा तालुक्यातील पिंटापुगरी, दर्यापूर, नेर कापसी, उजाडगाव बव्हाळा, दिग्रसमधील पिंपरी तर उमरखेडमधील भोजूनगर या गावांचा कुठल्याही ग्रामीण किंवा शहरी भागात समावेश नाही.
उद्योगनगर औद्योगिक वसाहत परिसरात येत असल्याने काही प्रमाणात या भागात सुविधा मिळत आहेत. मात्र, इतर ठिकाणी निधीची अडचण जाणवत आहे. याशिवाय जिल्ह्यातील जवळपास चार गावे एका तालुक्यात आहेत, तर त्यांची पंचायत समिती दुसऱ्या तालुक्यातील आहे. परिणामी या गावांतील नागरिकांनाही शासकीय योजनांचा लाभ घेताना व कागदोपत्री काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दोन ठिकाणी संबंध येत असल्याने कधीकधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे प्रसंगही वारंवार या भागातील नागरिकांवर आले आहेत. त्यामुळे या गावांतील नागरिकांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी केली आहे. मात्र, अजूनही त्यांच्या मागणीला यश आलेले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून या गावांचा लढा सुरू आहे.
यवतमाळ तालुक्यातील जामवाडी, उद्योगनगर, नारकुंड, दिघोरी, वरुड ईजारा, दारव्हा तालुक्यातील वारजई, बाभूळगावमधील कोपरा-दोन, घाटंजीमधील बिलायता, पांढरकवडा तालुक्यातील पिटापुंगरी, दर्यापूर, झरी जामणीमधील पेंढरी, नाडेघाट, नेर कापसी, दिग्रस डोंळबावाडी, पिंपरी व उमरखेडमधील भोजुनगर या सर्व गावांची मागणी स्वतंत्र ग्रामपंचायतीची आहे. त्यातील काहींचे प्रस्ताव शासनस्तरावर गेलेले आहेत, तर काहींचे अजूनही प्रलंबितच आहेत.
पाठपुरावा सरू आहे
या गावांतील जनतेच्या अनेक समस्या आहेत. नागरिकांना त्यांचे अधिकार मिळावेत, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त व ग्रामविकास विभागाशी संपर्क साधला आहे. या गावांना स्वतंत्र ग्रामपंचायत मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
- श्याम जयस्वाल, माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य, जिल्हा परिषद, यवतमाळ.
(संपादन : दुलिराम रहांगडाले)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.