चामोर्शी शहरात चार दिवसांपासून पाणीच नाही! पाणी पुरवठा योजनेला ग्रहण

water-tab
water-tab

चामोर्शी : महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारतात अजूनही प्राथमिक सुविधा काही भागात पोहोचलेल्या नाहीत. त्यातलाच एक भाग म्हणजे निसर्गसंपन्न गडचिरोली जिल्हा. आणि त्यातील चामोर्शी तालुका. पिण्याच्या पाण्यापासून सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत जीवनावश्‍यक गोष्टींसाठी इथल्या नागरिकांना संघर्ष करावा लागतो. त्याला शासनाचे धोरण कारणीभूत आहे की ते राबविणारे अधिकारी आणि कर्मचारी याविषयी सामान्यांच्या मनात प्रश्‍नचिन्ह आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्‍यात अनेक समस्या असून तालुक्‍याचे मुख्यालय असलेल्या चामोर्शी शहरात मागील चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झालेला असतानाही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
चामोर्शी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यात आले. आता ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर या परिसराचा विकास होईल, अशी नागरिकांना भाबडी आशा होती. पण, नागरिकांची ही आशा फोल ठरली आहे. येथील पाणीपुरवठा वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने बंद होत असतो. त्यामुळे चामोर्शीवासींना नळाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. पाणीपुरवठा योजनेवर लाखो रुपये आतापर्यंत खर्च झाले परंतु येथील पाणीपुरवठा सुरळीत केव्हा होणार असा प्रश्‍न चामोर्शी नगरवासीयांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे.

चामोर्शी नगरपंचायत झाल्यापासून चामोर्शी नगराच्या विकासाला व पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले आहे. नगरपंचायतीच्या प्रत्येक विकासकामांत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा व लोकप्रतिनिधींची उदासीनता, यामुळे चामोर्शी शहराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास अजून झालेला नाही. प्रशासनावर कोणाचाही वचक नाही. संपूर्ण चामोर्शी शहर समस्याग्रस्त झाले आहे. मात्र, कुणालाही याची काळजी नाही. नागरिकांच्या समस्यांकडे नगरपंचायत प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या समस्येने नागरिक त्रस्त असून पाणीपुरवठ्यावर कायमचा उपाय शोधून ही समस्या दूर करावी, प्रलंबित असलेली कामे त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सविस्तर वाचा - नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळणार?

समस्यांचे माहेरघर
चामोर्शी शहर सध्या समस्यांचे माहेरघर झाले आहे. नाल्याचा उपसा 12 मजुरांच्या साहाय्याने पावसाच्या तोंडावर सुरू केलेला आहे. परंतु पावसाला सुरुवात झाली पण, नाल्यांचा उपसा पूर्ण झालेला नाही. लक्ष्मी गेट ते शारदा राइस मिल हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून येथे पाण्यामुळे डबके तयार झाले आहे. तसेच अनेक प्रभागांतील ओपन स्पेस विकासाअभावी कचरा फेकण्याची जागा होत आहेत. अनेक नाल्यांची दुरस्ती न झाल्याने तेथील पाण्याचा विसर्ग होत नाही. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. घरकुल योजनेपासून लाभार्थी वंचित आहेत. घनकचऱ्याचा प्रश्‍न अजूनही सुटला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com