गडचांदूर (जि. चंद्रपूर): मोठे उद्योग आणि स्थानिक आदिवासी हा संघर्ष जुनाच आहे. मोठ्या उद्योगांना कारखान्यासाठी जमिनींची आवश्यकता असते त्यामुळे स्थानिक आदिवासींच्या जमिनींचे अधिग्रहण करून शासन उद्योगांना जमिनी देण्यास तयार होते. मात्र आदिवासींसाठी त्या शेतजमिनी म्हणजे त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असते. परिणामी उद्योग आणि स्थानिक असा संघर्ष सुरू होतो. माणिकगडसारखी कंपनी तर गेल्या तीन वर्षांपासून उत्खनना करीत आदिवासींच्या शेतजमिनीवर वरवंटा फिरवित आहे.
माणिकगड सिमेंट कंपनीच्या अतिक्रमणा विरोधात खाण क्षेत्रातील टॉवरवर चढून आज सोमवारी आदिवासींनी आंदोलन केले. मागील तीन वर्षांपासून त्यांचा लढा सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत आंदोलनकर्ते पावसात टॉवरवर ठाण मांडून होते. प्रशासनाशी त्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या. महादेव कुळमेथे, गणेश सिडाम, रामदास मंगाम, जयराम कुळमेथे, सागर येडम अशी टॉवरवर चढलेल्या आदिवासींची नावे आहेत.
माणिकगड सिमेंट कंपनीचा जमीन भूपृष्ठ घोटाळ्याचा लढा न्यायालयापर्यंत पोहचला आहे. प्रशासनाने सुरूवातीपासूनच याप्रकरणाकडे दूर्लक्ष केले. आदिवासींच्या शेतजमिनी नष्ट करून अविरत चुनखड्डी उत्खनन केल्याच्या अनेक तक्रारी शासन आणि प्रशासनाकडे करण्यात आल्या. मात्र प्रशासनाने साध्या चौकशीचेही सौजन्य दाखविले नाही.
14 आदिवासी कोलाम बांधवांची जमीन नियमबाह्यरित्या माणिकगड कंपनीच्या खाणीकडे वळती करण्यात आली. शेत जमिनीचा मोबदला दिला नाही. नोकरी दिली नाही. अनेक तलाठी अहवाल असताना सुद्धा वरिष्ठ कार्यालय कारवाई करण्यासाठी पुढे सरसावले नाही. यामुळे जमिनीसाठी आदिवासींचा संघर्ष सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत ते टॉवरवरच चढलेले होते. राजुरा तहसीलदार देवराव होळी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. मात्र टॉवरवरील आंदोलनकर्ते खाली उतरण्यास तयार नाहीत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.