अमरावती जिल्ह्यातील एमआयडीसीला उद्योगाची प्रतीक्षा...बेरोजगारीवर मात करण्यासाठी हव्यात विशेष सवलती

file photo
file photo

अमरावती  : कोरोनाने खूप काही शिकविले असले; तरी तालुक्‍याच्या ठिकाणी असलेल्या एमआयडीसीच्या भूखंडावर आतातरी उद्योग येणार आहेत काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. उद्योगांच्या कमतरतेनेच तालुक्‍याच्या ठिकाणावरून महानगरांमध्ये स्थलांतर वाढले असून ते रोखण्यासाठी तालुक्‍याच्या ठिकाणी उद्योग उभारणे हाच एकमेव पर्याय असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

नांदगावपेठ औद्योगिक वसाहत, अमरावतीची एमआयडीसी तसेच सातूर्णा औद्योगिक वसाहत या तीन प्रमुख इंडस्ट्रीयल सेक्‍टर जिल्ह्यात आहेत. यासोबतच प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी एमआयडीसी आहे. परंतु तालुक्‍यातील एमआयडीसीच्या जमिनी पडीक आहेत. त्याठिकाणी उद्योग उभारण्यात आले नाही. फक्त बोर्ड लावण्याव्यतिरिक्त कोणतेही काम झालेले नाही.

संत्राप्रकिया उद्योगाचे काय?

वरुड-मोर्शीला संत्राप्रक्रिया उद्योगाच्या घोषणा अनेकदा झाल्या; परंतु प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. येथील उद्योगासाठी शासनाने तरतूद केल्याचेसुद्धा सांगितले जाते; मात्र त्याची खरोखरच सुरुवात कधी होणार, हे कुणालाच माहीत नाही.

मेळघाटातील आदिवासींना मिळावे गारमेंटचे प्रशिक्षण

जिल्ह्यातील अचलपूर येथे फिनले मिल असल्याने त्याठिकाणी गारमेंटची फॅक्‍ट्री उभारून नजीकच्या मेळघाटातील आदिवासी महिलांना गारमेंटचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याची मोठी संधी आहे. वरुड-मोर्शी भागात संत्राप्रक्रिया प्रकल्प उभारून रोजगार देता येऊ शकतो तसेच जिल्ह्यात सर्वांत मोठे पीक असलेल्या सोयाबीनवर आधारित उद्योगांसाठीसुद्धा भरपूर वाव आहे. परंतु त्या दिशेने अद्यापही पावले उचलण्यात आलेली नाहीत.


...तरच समांतर विकास

शहर व ग्रामीण भागातील समांतर विकासाच्या दृष्टीनेच तालुक्‍याच्या ठिकाणी एमआयडीसी स्थापन करण्यात आल्या. परंतु तालुकास्तरावर उद्योग येण्यासाठी त्यांना चांगल्या सवलती देणे अतिशय आवश्‍यक आहे. त्यातूनच स्थानिक उद्योजक तयार होतील. वीज, जीएसटी, कर्जावरील व्याजात सवलत, रोख सबसीडी अशा योजना आणण्यात आल्यास ग्रामीण भागात उद्योग उभे राहू शकतात, असे अमरावती एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे माजी अध्यक्ष विजय जाधव यांनी सांगितले.

जाणून घ्या : पाऊस आला आणि खरीप पिकाचे नुकसान करून गेला


विशेष पॅकेज हवे

संपूर्ण राज्यातील उद्योगांसाठी एकच निकष लावणे योग्य नाही. ग्रामीण भागाला विशेष पॅकेज देणे आवश्‍यक आहे. शेतीसोबतच जोडधंदा विकसित झाला पाहिजे. त्यासाठी लोकांना माहिती देणे, प्रोत्साहित करणे, लहान लहान उद्योगांच्या माध्यमाने रोजगार उपलब्ध करून देणे आवश्‍यक असल्याचे सातूर्णा औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष वीरेंद्र लढ्ढा यांनी सांगितले.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com