राजाश्रय हवा : बांबू उद्योगाच्या पायाभरणीला मुहूर्ताची प्रतीक्षा 

  अमरावती : बांबूपासूनच तयार करण्यात आलेले उद्यानाचे प्रवेशद्वार.
अमरावती : बांबूपासूनच तयार करण्यात आलेले उद्यानाचे प्रवेशद्वार.

अमरावती :  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या बांबू रोपांच्या निर्मितीपासून तर त्यांच्या प्रसार व प्रचारासाठी झटणारे देशातील एकमेव बांबू उद्यान अमरावतीत आहे. बांबू उद्योगाला बळ देण्याच्या दृष्टीने येथे हालचालीसुद्धा झाल्या, परंतु या उद्योगाच्या पायाभरणीला अद्याप मुहूर्ताची प्रतीक्षा आहे. 

49 हेक्‍टरमध्ये विस्तारलेला 

देशातील एकमेव असलेल्या अमरावतीच्या बांबू उद्यानात 63 च्यावर देशी व विदेशी प्रजातींच्या बांबूंची लागवड येथील वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या विस्तीर्ण परिसरात झाली आहे. खाद्यपदार्थांपासून तर कपड्यांसाठी बांबूचा वापर होऊ शकतो, असे अनेक प्रयोग येथे करण्यात आले. बांबू उद्यान शहरातील वडाळी तलावाच्या दक्षिणेस आहे. वनविभागाच्या माध्यमाने उभारण्यात आलेल्या या उद्यानाचा परिसर 49 हेक्‍टरमध्ये विस्तारलेला आहे. 
राज्यात बांबू वनक्षेत्र पर्यावरण संतुलनासोबत एक उत्पन्नाचे स्रोत म्हणून विकसित करणे. विविध बांबूंच्या प्रजातींची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व विशेष करून शेतकऱ्यांना करून देणे. पर्यटनस्थळ म्हणून हा परिसर विकसित करणे, विद्यार्थी व वैज्ञानिकांना बांबू प्रजातींची तांत्रिक माहिती देण्यासोबत विविध बांबू उत्पन्नाचे प्रदर्शन करणे, हा या उद्यानाचा उद्देश आहे. आजवर अनेक संस्था, संघटना, शेतकऱ्यांना बांबूंची महती सांगून या क्षेत्राकडे वळण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे. मात्र, विविध घटकांकडून मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी या महत्वाच्या विषयाकडे लक्ष देणे आवश्‍यक झाले आहे. 

रोपवाटिकेपासून माहिती केंद्रापर्यंत 

विविध प्रजातींच्या बांबू लागवडीसह बालउद्यान, बांबू आर्च, बांबू पूल, बांबू पगोटा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वनचेतना केंद्र, बांबू गुफा, फुलपाखरू उद्यान, बांबू हट, बांबू वन माहिती केंद्र, प्रेक्षागृह, नक्षत्र वन, निरीक्षण मनोरा, बांबू रोपवाटिका, निसर्ग पाऊलवाट, ग्रीन जीम, फुटका तलाव, निरीक्षक मनोरा आणि कमळ उद्यान अशा सुविधा येथे सद्य:स्थितीत उपलब्ध आहेत. 
 
उद्योगासाठी 25 लाख बांबू बोर्डाकडे वर्ग 

वनविभागाच्या परिसरात उद्योग निर्मिती करायची झाल्यास नियमांची पूर्तता करावी लागते. येथे बांबूंच्या वस्तू निर्मितीसाठी एक उद्योग उभारावा, असा प्रस्ताव आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेला 25 लाखांचा निधी महाराष्ट्र बांबू बोर्डाकडे वर्ग केला आहे. येत्या काही दिवसांत त्या कामाला सुरुवात होईल, असे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com