file photo
file photo

असे काय झाले की, शंख-शिंपले, मासे अन्‌ पक्ष्यांच्या प्रजाती आल्या धोक्‍यात... 

अमरावती : नदी-नाल्यातील वाळू उपसा मोठ्‌या प्रमाणात होत आहे. त्याचा थेट परिणाम जलचर प्राण्यांवर होत आहे. शंख, शिपंलेही धोक्‍यात आले आहेत. तर मासे आणि पक्ष्यांवर वाळू उपसा होत असल्याने वाईट दिवस आले आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने हे दिवस पहायला मिळत आहेत. 

वाळूचा उपसा 
नदी व नाल्यांमध्ये असलेली वाळू, दगड, खडक आणि तलावात असलेली माती हे तेथील संपन्न असलेल्या जैवविविधतेसाठी आवश्‍यक अशा अधिवासाची भूमिका पार पाडीत असतात. परंतु अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात नदी-नाल्यांमधून ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक वाळू, दगड, खडक इत्यादी गौणखनिजांचा सतत उपसा केल्या जात आहे. नदी-नाले अक्षरश: ओरबाडून काढल्या जात असल्याने शंख, शिंपले, मासे व पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 
नदीनाले व तलावातील जैवविविधता ही इतर जैवविविधतेपेक्षा निश्‍चितच वेगळ्या स्वरूपाची आहे. तेथील पाणवनस्पती, शेवाळे, पाणगवताच्या प्रजाती तसेच सूक्ष्म जीवजंतू, कीटक, शंख, शिंपले, मासे, उभयचर प्राणी हे सर्व तेथील परिसंस्थेचे घटक आहेत आणि तेथील परिसंस्था भू-भागावरील इतर परिसंस्थांना पुनर्जीवित करीत असतात. त्यामुळे त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. 

हा होत आहे परिणाम 
या गोष्टींचा परिणाम म्हणजे नदी-नाल्यात पावसाचे पाणी थांबून-थांबून वाहने बंध झाले आहे. जमिनीत पाणी जिरणे बंद झाले. याबाबींचा परिणाम तेथील संपन्न अशा जैवविविधतेवर झालेला आहे. जलचर कीटक, शंख, शिंपले, खेकडे, झिंगे, मासे, कासव तसेच काही पाणपक्ष्यांच्या प्रजननासाठी आवश्‍यक असणारा हा अधिवास नष्ट होऊ घातलेला आहे. 

काय आहे जिल्ह्याची स्थिती 
अमरावती जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये माशांच्या जवळपास 96 प्रजाती, शंख, शिंपले यांच्या 30 प्रजाती, खेकड्यांच्या 2 प्रजाती आणि पाणपक्ष्यांच्या 73 प्रजाती आढळतात. मोठा करवानक, भारतीय करवानक आणि नदी टिटवी यासारख्या पक्षी प्रजातींचे प्रजनन हे नदीनाल्यातील वाळू आणि दगड अशा ठिकाणीच होते. त्यामुळे या प्रजातींच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झालेला आहे. मोठा करवानक आणि नदी टिटवी हे दोन्ही पक्षी प्रजाती आयूसीएनच्या संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत येतात. 


वाढती लोकसंख्या, शहरीकरण, वाढते बांधकाम आणि सिमेंटचे रस्ते यासाठी मोठ्या प्रमाणात वाळू, दगड, खडक इत्यादी लागणारे नैसर्गिक साधनांचा शासनाची नजर चुकवून, चोरून आणि मर्यादेपेक्षा जास्त उपसा होत असल्यामुळे तेथील पाणवनस्पती, शेवाळे, पाणगवताच्या प्रजाती, पाणवेली तसेच जलकीटक, शंख, शिंपले, खेकडे, मासे, उभयचर प्राणी आणि पाणपक्षांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. त्यामुळे बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूला पर्याय शोधून या नैसर्गिक साधनांचा उपसा थांबवणे आणि शासकीय पातळीवरून याला निर्बंध घालणे गरजेचे आहे. 
-प्रा. डॉ. गजानन वाघ, सहयोगी प्राध्यापक, श्रीशिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती, पक्षी अभ्यासक तथा सदस्य जैवविविधता समिती. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com