
नंदोरी (जि. वर्धा) : राज्यात 3 मेपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आल्याने राज्यातील कुंभार व्यावसायिकांची ऐन हंगामाच्या प्रारंभीच आर्थिक कोंडी झाली आहे. राज्यातील कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय यामुळे डबघाईस आला आहे. माठ, रांजन, सुरई इत्यादी मालाची विक्री होत नसल्याने कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
अगदी उन्हाळ्याच्या प्रारंभीच राज्यात लॉकडाउन झाल्याने ग्राहक फिरकेनासे झाले आहेत. पर्यायाने कुंभार समाज आर्थिक कोंडीत सापडला आहे. या समाजाला शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यासह राज्यात आजही 50-60 टक्के कुंभार समाज पारंपरिक मातीची भांडी बनविण्याचा व्यवसाय करीत आहेत. त्यांचा व्यवसाय हंगामी आहे. वर्षभरात फक्त सहा महिने कुंभार समाजाचा व्यवसाय चालतो. सणवारासाठी लागणारे मातीचे साहित्य आणि उन्हाळ्यात सर्वसामान्य जनतेला थंड पाण्यासाठी माठ, सुरई, रांजनाची निर्मिती करण्यात येते. मात्र, या हंगामातच राज्य लॉकडाउन झाल्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद झाला आहे.
उन्हाळ्यात मातीचे रांजन, माठ यांना मोठी मागणी असते. 26 एप्रिलला येणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या पूजेसाठी लागणारे माठ, विवाहाच्या कार्यप्रसंगी लागणाऱ्या कळशी हे सर्व साहित्य बाजारात विक्रीसाठी आणता येत नसल्याने व लाकडाउनमुळे दुकानेही बंद असल्याने कुंभार समाज व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यातील कुंभार समाजाची संख्या हजारो आहे. त्यांचा मूळ व्यवसायही मातीकामच आहे. वर्षभर मूर्ती, पणत्या, माठ तयार करून विकणे आणि आलेल्या पैशातून वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत असतात. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे त्यांच्या व्यवसायाला फटका बसला आहे. परिणामी, कुंभार समाजासमोर आर्थिक संकट ओढवले आहे.
जिल्ह्यासह राज्यात घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विटा तयार करणाऱ्या वीटभट्टींवरही शुकशुकाट आहे. वीटभट्ट्यांवर काम करणारे मजूरही लाकडाउनमुळे कामावर येईनासे झाले आहेत. याचा फटका राज्यातील वीटभट्टी व्यवसायाला बसला आहे.
वीटभट्टी व्यवसाय अटीवर सुरू करा
वर्धा जिल्ह्यात कुंभार समाजाची लोकसंख्या 50 हजार, तर राज्यात 60 लाख आहे. यातील 50 ते 60 टक्के समाज पारंपरिक व्यवसाय करतो. सध्या राज्यात लॉकडाउन असल्याने या समाजाचा पारंपरिक व्यवसाय ठप्प झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आर्थिक मदतीसह दररोज सकाळी सात ते दुपारी एक या वेळात व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. तसेच राज्यातील बंद पडलेला वीटभट्टी व्यवसाय सोशल डिस्टन्सिंगच्या अटीवर सुरू करावा, अशी विनंती केली आहे.
- संजय गाते, माजी अध्यक्ष, कुंभार समाज महासंघ.
शासनाने मदत करावी
जानेवारी ते मे या पाच महिन्यांत कुंभार समाजाचा व्यवसाय मोठा असतो. याच हंगामात राज्यात लॉकडाउन असल्याने आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या बिकट परिस्थितीत शासनाने कुंभार समाजाला मदत देण्याची गरज आहे.
- अशोक पाठक, कुंभार व्यावसायिक, नंदोरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.