161 दुकाने बंद होण्याची शक्यता
भंडारा - वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या आदेशाची 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. जिल्ह्यातील 161 दारूविक्रीची दुकाने आणि बार यांना कुलूप लागणार आहे. यामध्ये वाइनशॉप, बिअरबार, देशी दारू दुकानांचा समावेश आहे.
महामार्गावरील वाढत्या अपघातांची दखल घेऊन पंजाबमधील काही सामाजिक संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूविक्रीची दुकाने बंद करावीत अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने महामार्गावरील दारूविक्रीची दुकाने महामार्गापासून पाचशे मीटरच्या बाहेर हलविण्याचा आदेश दिला आहे.
महामार्गाच्या दोन्ही बाजूला पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत दारूविक्री होणार नाही. 1 एप्रिलनंतर महामार्गावरील दारू दुकानाचे परवाने नूतनीकरण करून दिले जाणार नाहीत.
पर्यायी जागेची निवड
ही दुकाने एक एप्रिलनंतर बंद होणार आहेत. या दुकानदारांना आता पर्यायी जागेची निवड करावी लागणार आहे. पर्यायी जागा निवडताना गावठाण, मंदिर, शाळा, महाविद्यालये आणि महामार्ग राज्यमार्ग या बाबीचा विचार करावा लागणार आहे. पर्यायी जागा निवडून नव्याने दुकान सुरू करण्यास किमान नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
'जिल्ह्यातील राज्यमार्गाची प्रत्यक्ष आकडेवारी, नकाशा व स्थिती दर्शविणारा तक्ता याची माहिती
उत्पादन शुल्क विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागविली आहे. तूर्तास शासनादेशाप्रमाणे जिल्ह्यातील 100 मीटर व पाचशे मीटर आत असलेल्या मद्य दुकानांसंदर्भातील अंदाजित आकडा पाठविण्यात आला आहे.''
- सुरेंद्र मनपिया, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, भंडारा.
यापूर्वीही झाला होता निर्णय
आघाडी सरकारच्या काळातही महामार्ग अथवा राज्यमार्गाला लागून असलेले बार आणि दारूच्या दुकानांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. मद्यसेवन करून गाडी चालविल्यानंतर होणाऱ्या अपघाताच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी महामार्गाशेजारील बार अन्यत्र हटविण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले होते.
|