दिग्रस (जि. यवतमाळ) : कोरोना विषाणूबाबत सध्या विविध आफवांचे पेव फुटत आहे. कोरोनाचा सक्षमपणे सामना करण्यासाठी बेशिस्तांना शिस्त लावणे गरजेचे आहे. स्थानिक नगरपरिषद, तहसील व पोलिस प्रशासनाला अधिक सक्तीने कारवाई करण्याची गरज आहे. खबरदारीचे उपाय करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात कोरोना (कोवीट-19) विषाणूमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे कलम 144 (1) लागू करण्यात आले आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार, ठाणेदार व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या बैठकीनंतर शहरात गस्त, जनजागृतीला सुरुवात झाली आहे. तालुक्यातील अनेक नागरिक वीटभट्टी व गवंडी कामावर मजूर म्हणून पुणे, मुंबई व बाहेर राज्यातदेखील जातात. परंतु, राज्यात कोरोनाचा कहर सर्वत्र दिसून येत असल्याने पुण्या, मुंबईला गेलेले कामगार शहरात परतत आहेत. दररोज सकाळी लोकांचे जत्थेच्या जत्थे शहरात येत आहेत. या साऱ्यांची प्राथमिक तपासणी नेमकी कोणी करावी, असा प्रश्न आहे. याकडे अजूनही दुर्लक्ष केले जात आहे. बाहेरून आलेल्यांना तपासणी करण्यात कमीपणा वाटत असल्याने हे अज्ञान किती महागात पडणार आहे, या बाबतीत सारेच अनभिज्ञ आहेत. तहसील किंवा पोलिस विभागाने यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. त्याबरोबर सक्ती करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूमुळे कोरोना या संसर्ग रोगाच्या नियंत्रणासाठी आपत्कालीन उपाययोजना करण्याच्यादृष्टीने या विभागाला गंभीर व्हावे लागणार आहे.
ग्रामीण रुग्णालयाने गंभीर होणे गरजेचे
अगदी साध्या आजाराच्या रुग्णांना रेफर करणारे येथील ग्रामीण रुग्णालयाने गंभीर होणे गरजेचे झाले आहे. आवश्यकता असलेल्या नागरिकांना रुग्णालयात भरती करणे, त्यांना तोंडाचे मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून त्याचा उपयोग करण्यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. लाउडस्पिकरद्वारे लोकांना प्राथमिक तपासणीसाठी आवाहन करून रुग्णालयामार्फत कोरोनाची भीती नव्हे, तर सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी त्याच्या संसर्गावर आळा घालणे आवश्यक आहे, हे पटवून सांगावे, अशी अपेक्षा आहे. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शेषराव टाले व आरोग्य सभापती बाळू जाधव यांनी सर्व सफाईकामगार व कंत्राटी मजुरांबरोबर नियोजन करून या निमित्ताने शहराची स्वच्छता करण्याच्यादृष्टीने अधिक गंभीर होणे गरजेचे आहे. नगरपालिकेने स्वच्छता मोहीम राबविण्याकरिता रोजंदारी वाढवून युद्धपातळीवर पावलं उचलायला हवी. मात्र, याबाबत नगरपालिका अजूनही गंभीर दिसत नाही.
दिग्रस येथील एक हृदयरोगतज्ज्ञ गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीर येथून परत आले. त्यांची विमानतळावर आरोग्य तपासणी झाली. त्यानंतर ते शहरात आले. दक्षता म्हणून त्यांनी काही दिवस दवाखाना बंद ठेवला. त्यामुळे लोकांनी त्यांनाच कोरोना झाल्याची अफवा उठवली. अशा अफवा होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळीच काळजी घ्यायला हवी.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.