गटशेतीतून मिळाली ‘कृषी संजीवनी’

Agrowon special story Group Farming
Agrowon special story Group Farming

विरगाव (ता. अकोले, जि. नगर) येथील २० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन चार वर्षांपूर्वी  ‘कृषी संजीवनी’ डाळिंब व भाजीपाला उत्पादन शेतकरी गट तयार केला. रासायनिक अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादन करून ‘व्हेजिटेबल बास्केट’ संकल्पना राबवण्यासाठी गटातील शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गटातील सात शेतकऱ्यांनी शेडनेट उभारले आहेत. प्रयोगशील वृत्तीने पुढे जात समृद्ध शेतकरी व सशक्त समाज हे ब्रीद प्रत्यक्षात आणण्याचे गटाचे प्रयत्न आहेत.

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील विरगावासह गणोरे, जवळे कडलग, वडगाव लांडगा, निपाणी पिंपळगाव, देवठाण आदी गावांत डाळिंब आणि भाजीपाला ही पिके अनेक वर्षांपासून घेतली जातात. २०१५ मध्ये डाळिंबावर मर आणि तेलकट रोगाचा मोठा प्रादुर्भाव वाढला. दरांतही घसरण झाली, मग डाळिंबाचे क्षेत्र कमी झाले. त्यानंतर या शेतकऱ्यांचा कल भाजीपाला पिकांकडे वाढला. स्थानिक बाजारात, मुंबई, नाशिक व अन्य बाजारांत विक्री व्हायची. मात्र पुरेसा दर मिळत नव्हता. 

गटाद्वारे एकत्र आले शेतकरी 
समस्यांवर उपाय शोधण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मदतीने २०१५ मध्ये कृषी संजीवनी डाळिंब व भाजीपाला उत्पादन शेतकरी गट तयार केला. मग सामूहिकपणे भाजीपाला उत्पादन नियोजन केले. चार वर्षांपासून एकत्रित शेती करीत असलेल्या या गटाला डिसेंबर २०१८ मध्ये मान्यता मिळाली. 

गटशेतीची वैशिष्ट्ये 
  सध्या पंचवीस एकरांत शेडनेटचे नियोजन. आत्तापर्यंत १६ एकरांवरील नेट उभारणीचे काम पूर्ण   शेडनेटमध्ये ढोबळी मिरची, काकडी, झेंडू   सुमारे ७५ एकर खुल्या क्षेत्रावर भाजीपाला व अन्य पिकांचे उत्पादन   हवामान बदलाचा होणारा परिणाम लक्षात घेता गटातील शेतकऱ्यांकडून स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी. यात वातावरणातील तापमान, आर्द्रता, प्रकाशाची तीव्रता, पर्जन्यमापन व वाऱ्याची दिशा आदींची माहिती मिळणार. भविष्यात ही माहिती अन्य शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे उपलब्ध करून देणार.    गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नीलेश दीक्षित या उच्चशिक्षित तरुणाची सल्लागार म्हणून नियुक्ती    प्रत्येक शेतकऱ्याकडे सुमारे दोन गांडूळखत युनिटस. प्रत्येक युनिटमधून वर्षाला १० टन खतनिर्मिती.   गटाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सुमारे पाचशे शेतकऱ्यांकडून भेटी    उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरहाळे, ‘आत्मा’चे तालुका समन्वयक बाळनाथ सोनवणे यांचे मार्गदर्शन 

बांधावर खरेदी 
सुरवातीला २० एकरांवर उत्पादित होणारा भाजीपाला व अन्य माल खरेदीसाठी पालघर, मुंबईचे व्यापारी बांधावर येतात. दरही चांगला मिळत आहे. गटातील जालिंदर खुळे, गणेश तोडकर, विनायक शेळके, संतोष वरपे, भानुदास बोडके, संतोष अस्वले, अनिल पानसरे, यांनी २०१७ साली कृषी विभागाच्या सहकार्याने प्रत्येकी वीस गुंठे क्षेत्रात शेडनेट उभारले. मागणीनुसार त्यात भाजीपाला उत्पादन सुरू केल्याने विरगावातून दर दिवसाला दोन टन विक्री होऊ लागली. सध्या ‘रोटेशन’नुसार भाजीपाला व अन्य पिकांचे उत्पादन घेतले जाते.  

खर्चात बचत 
  खते, बियाणे व अन्य बाबींची एकत्रित खरेदी, त्यामुळे खर्चात मोठी बचत.   भाजीपाल्याचीही थेट बांधावर खरेदी. त्यामुळे वाहतूक आणि पॅकिंग खर्चात बचत    गटातील शेतकऱ्यांकडून कृषी परंपरागत विकास योजनेतून औजार बॅंक विकसित. त्यात टॅंकरसह विविध औजारे. त्यामुळे मजुरीचा खर्चही कमी झाला. 

व्हेजिटेबल बास्केट  
संगमनेर येथील कृषी प्रदर्शंनासह जिल्हाभरातील विविध प्रदर्शनात गटातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. सेंद्रिय भाजीपाल्याला मागणी अधिक असल्याचे हेरून गटाने व्हेजिटेबल बास्केट संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने काम सुरू केले आहे. त्यासाठी संगमनेर येथील दोन हजार ग्राहकांचे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार ग्राहकांकडून बुकिंगही सुरू केले आहे. त्यासाठी ॲपचाही वापर होणार आहे.    

दुष्काळाचा फटका 
गटाला यंदा दुष्काळाच्या गंभीर संकटाला समोरे जावे लागले आहे. मध्यंतरीच्या चार-पाच महिन्यांच्या काळात उत्पादन थांबवावे लागले होते. सध्या गटातील शेतकऱ्यांकडे एकरांत सांगायचे तर मका २०, बाजरी १०, घेवडा २, कांदा २,  ब्रोकोली २, कोबी २, डाळिंब ५, चवळी ३, झेंडू ४, ढोबळी साडेतीन एकर, काकडी २ एकर, भेंडी २० गुंठे, भुईमूग ३ एकर क्षेत्र आहे. सुमारे वीस एकरांत टोमॅटो, वांगी व अन्य भाजीपाला आहे.  

भावी नियोजन 
  करार केलेल्या २७ गुंठ्यांत भाजीपाला संकलन केंद्र, पॅकहाऊस. वाया जाणाऱ्या मालाचे व्यवस्थापन   देशी गाईंचा गोठा, बायोगॅस, स्लरी युनिट   देशी गायींचे दूध घरपोच विक्री करण्याचे नियोजन.    कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता 

शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरवात केल्याने खर्चात बचत झाली. वेगवेगळ्या प्रयोगातून उत्पादन वाढ झाली, बाजारपेठ मिळाली.  
   गणेश तोरकड, ७५८८५१४९८६ ,  अध्यक्ष,  ‘कृषी संजीवनी’ 

एकत्र आल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला. मालाचे दर ठरवण्याची किमया साधता आली. ग्राहकांनाही आरोग्यदायी भाजीपाला उपलब्ध करणार आहोत. समृद्ध शेतकरी व सशक्त समाज हे ब्रीद प्रत्यक्षात आणण्याचे समाधान मिळत आहे.
अनिल निवृत्ती देशमुख, ९९६०४९२४२६, गटातील सदस्य 

गटाला कृषी विभागाचे पाठबळ आहे. गटाने दर्जेदार भाजीपाला उत्पादनातून जिल्ह्यासह अन्य भागातंही नावलौकिक मिळवला आहे. 
प्रवीण गोसावी,  तालुका कृषी अधिकारी, संगमनेर 

कल्चर बॅंकेची संकल्पना 
विरगावातील शेतकरी सेंद्रिय, रासायनिक अवशेषमुक्त उत्पादन घेऊ लागले आहेत. त्यासाठी येथील उच्चशिक्षित अनिल देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांनी जैविक खते, कीडनाशके तयार करण्याचे युनीट उभारले आहे. यामुळे रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी होऊन जैविक घटकांचा वापर वाढला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com