तंत्रज्ञानातून शेती केली समृद्ध

रोहणा (जि. वर्धा) येथे अविनाश कहाते यांनी सुधारित पद्धतीने केलेली कारली लागवड.
रोहणा (जि. वर्धा) येथे अविनाश कहाते यांनी सुधारित पद्धतीने केलेली कारली लागवड.

रोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील अविनाश बबनराव कहाते यांनी बाजारपेठेची गरज ओळखून भाजीपाला लागवडीवर भर दिला. पीक उत्पादनवाढीसाठी लागवडीपासूनच नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरवात केली. टोमॅटो, मिरची, हळद, आले या पिकांच्या जोडीला सोयाबीन, कपाशीसारख्या पारंपरिक पिकांच्या उत्पादनातही वाढ साधली आहे.

वर्धा जिल्ह्यातील रोहणा गावामधील अविनाश कहाते यांचे शिक्षण कृषी डिप्लोमा. कहाते कुटुंबीयांची २१ एकर शेती. अविनाश यांनी वडिलांचे निधन झाल्यानंतर स्वतःकडे शेतीची सूत्रे घेतली.  सुरवातीला सोयाबीन, कपाशी या पारंपरिक पिकांवर भर दिला. त्यांना सोयाबीनचे एकरी ६ क्‍विंटल आणि कपाशीचे २५ क्‍विंटल उत्पादन मिळत होते. मात्र, वाढत्या खर्चामुळे उत्पन्नाचा ताळमेळ बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी पीक बदलाचा निर्णय घेतला.  

बदलली पीक पद्धती 
पीक लागवड बदलण्यापूर्वी अविनाश कहाते यांनी परिसरातील शेतकरी, तसेच कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कृषी विभागाच्या वतीने आयोजित मेळावे, अभ्यास दौऱ्यात सहभाग नोंदविला. मोर्शी (जि. अमरावती) येथील गजानन बारबुद्धे आणि येरला (जि. अमरावती) येथील राजेंद्र जकाते यांच्याकडून टोमॅटो, मिरची व्यवस्थापनाचे तंत्र समजावून घेतले. त्यानंतर स्वतःच्या शेतीतील पीकपद्धती बदलण्याचा निर्णय घेतला.
२०१०-११ साली अविनाश कहाते यांनी टोमॅटो व मिरची लागवडीला सुरवात केली. पहिल्या वर्षी खरीप हंगामात एक एकरावर मिरची लागवड केली. काटेकोर पीक व्यवस्थापन ठेवल्याने एकरी २०० क्विंटल उत्पादन मिळाले. मिरचीला सरासरी १७ रुपये किलो दर मिळाला. खर्च वजा जाता चांगला नफा मिळाला. रब्बी हंगामात पावणेदोन एकरांवर टोमॅटो लागवड केली. या पिकाचेदेखील चांगले व्यवस्थापन ठेवल्याने एकरी ५३ टन उत्पादन मिळाले. टोमॅटोला प्रतिक्रेट सरासरी २४४ रुपयांचा दर मिळाला. 

पारंपरिक पिकांच्या तुलनेत मिरची, टोमॅटो लागवडीतून चांगला नफा मिळाल्याने या पिकांच्या लागवडीत त्यांनी सातत्य ठेवले आहे. या पिकांच्या जोडीला बाजारपेठेचा अंदाज घेत आले, हळद, कोबी, कारली, काकडी, वांगी, ढोबळी मिरची या पिकांच्या लागवडीचे त्यांचे नियोजन असते. गेल्या वर्षी गारपिटीमुळे शेडनेटचे नुकसान झाल्याने त्यांना यंदा ढोबळी मिरचीची लागवड करता आली नाही. 

सध्या सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करीत एक एकर कारले,अडीच एकर हळद, दीड एकर केळी, खरिपात साडेपाच एकर आणि रब्बीत सव्वादोन एकरांवर काकडी, एक एकर खरबूज, सव्वा एकर चवळी, सव्वा एकर टोमॅटो, साडेतीन एकर मिरची आणि एक एकर वांगी लागवडीचे नियोजन असते.

काकडी लागवड
  सन २०१२ पासून सातत्याने साडे पाच एकरावर जुलै ते सप्टेंबर या कालावधीत चार टप्प्यात काकडी लागवड. पावसाळ्यात काकडीचे क्षेत्र कमी असल्याने लागवडीचे नियोजन.
  दोन गादीवाफ्यात पाच फुटांचे अंतर दोन रोपांत एक फूट अंतर. वेलीसाठी ताटी पद्धतीचा अवलंब. प्लॅस्टिक आच्छादन, ठिबक सिंचन आणि काटेकोर खत आणि कीडनाशकांच्या वापरावर भर. गेल्या वर्षी १४ ते १५ रुपये प्रतिकिलो दर.
  नोव्हेंबरमध्ये काकडी काढणीनंतर कोणतीही मशागत न करता पुन्हा त्याच मल्चिंगचा वापर करीत डिसेंबरमध्ये दोन टप्प्यांत काकडी लागवड. या हंगामात वेल जमिनीवर सोडले.  पिकाची काढणी येत्या १५ दिवसांत सुरू होणार.

खरबूज लागवड
  एक एकरावर डिसेंबर महिन्यात खरबूज लागवड. गादीवाफ्यावर आच्छादन आणि ठिबक सिंचनाचा वापर करीत लागवड केल्यामुळे तण नियंत्रण आणि पुरेसा ओलावा जमिनीत राहतो.
  पिकाला क्रॉप कव्हरचा वापर केल्यामुळे कीडी तसेच थंडीपासून पिकाचे संरक्षण. गेल्या ४३ दिवसांपासून पिकावर एकही फवारणी नाही. त्यामुळे क्रॉप कव्हरचा चांगला फायदा. 
  क्रॉप कव्हर तीन हंगामापर्यंत वापरता येते. क्रॉप कव्हरसाठी एकरी १७ हजार, तर आच्छादनासाठी १४ हजार रुपयांचा खर्च. परंतु बाजारात मागणी असलेल्या काळात खरबूज उपलब्ध करून देणे शक्‍य होत असल्याने चांगल्या दराच्या माध्यमातून या खर्चाची भरपाई.
  खरबुजाचे एकरी उत्पादन १२ ते १५ टन होण्याची अपेक्षा. फेब्रुवारीत बाजारपेठेत सरासरी वीस रुपये किलोचा दर अपेक्षित. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

मिरची रोपनिर्मितीवर भर 
  गेल्या पाच वर्षांपासून शेडनेटमधील रोपवाटिकेमध्ये मिरची रोपांची निर्मिती.
  यंदाच्या वर्षी मिरचीच्या दीड लाख रोपांची निर्मिती. यातील ३५ हजार रोपे घरच्या लागवडीसाठी वापरून इतर रोपांची  परिसरातील शेतकऱ्यांना विक्री.

बाजारपेठेचा अभ्यास
  परिसरातील बाजारपेठेतील  टोमॅटो व मिरची दराचा अंदाज घेऊन विक्री नियोजन. 
  दरात तेजी असल्यास अमरावती, वर्धा, राजुरा येथे शेतीमाल विक्री. गटातील शेतकऱ्यांची एकत्रित विक्री.

उभारला शेतकरी गट
रोहणा गावातील युवा शेतकऱ्यांनी कृषिमित्र स्वयंसहायता बचत गटाची उभारणी केली आहे.  गटाचे अध्यक्ष जितेंद्र जुवारे, तर अविनाश कहाते हे सचिव आहेत. सदस्यांमध्ये गजानन पाटेकर, प्रवीण बोडके, राकेश वडाळकर, वैभव जगताप,सुरज माळोदे,देवेंद्र गुल्हाने, राहुल वडाळकर, अशोक भगत, सुभाष मचाले, चंद्रकांत गुडवार, नीलेश गलाट, फुलचंद गलाट, ज्ञानेश्‍वर घोडे, शरद डायरे, दिनेश वडाळकर, मंगेश वडाळकर, विजय राऊत यांचा समावेश आहे.  दरमहा प्रत्येक सदस्य २०० रुपये  गटाच्या बॅंक खात्यामध्ये बचत करतो. आत्मा अंतर्गंत गटाची नोंदणी झाली आहे. गटातर्फे शिवार फेरी, गटचर्चेचे आयोजन केले जाते. माहितीच्या देवाणघेवाणीमुळे पीक उत्पादनात दुप्पट वाढ मिळविली आहे. २०११-१२ मध्ये समूहाव्दारे कृषी विभागाच्या सहकार्यातून थेट बांधावर खत पोचविण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. अविनाश कहाते यांना कृषी विभागातर्फे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

असे आहे शेती नियोजन
  संपूर्ण २१ एकर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली.
  जमीन सुपिकतेवर भर. हिरवळीच्या पिकांची लागवड. एकरी ५ ट्रॉली शेणखताचा वापर. 
  भाजीपाला लागवडीकरिता गादीवाफा, सुधारित पद्धतीने लागवड.
  पिकाच्या गरजेनुसार अन्नद्रव्यांचा वापर, एकात्मिक कीड, रोग नियंत्रण.
  क्रॉप कव्हर, आच्छादन तंत्राचा योग्य वापर. 
  बाजारपेठेचा अंदाज घेत शेतीमालाची विक्री.
  शेतकरी समूहाच्या माध्यमातून  एकत्रित भाजीपाला विक्रीचे नियोजन. 

- अविनाश कहाते, ८२७५२८९५८५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com