पुणे जिल्ह्यातील धरणांत १४३ टीएमसी पाणीसाठा

पुणे जिल्ह्यातील धरणांत १४३ टीएमसी पाणीसाठा

पुणे - यंदा पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार झालेल्या पावसामुळे बहुतांशी सर्वच धरणे भरली होती. त्यानंतर रब्बी हंगामासाठी लागणारे आवर्तनाची असलेली मागणी आणि पुणे, पिंपरी चिंचवड शहराला होणारा पाणीपुरवठा यामुळे धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. 

सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये १४३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध अाहे. त्याचा नागरिकांनी जपून वापर करावा, असे आवाहन माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी केले. पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या कालावधीत पुणे जिल्ह्यात पावसाची सरासरी ६१२.७ मिलिमीटर एवढी आहे. त्यापैकी ९८८.७ मिलिमीटर म्हणजेच १६१.४ टक्के एवढा पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, नाले, ओढे भरून वाहिल्याने जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के तुडूंब भरली होती. 

परिणामी दरवर्षी भासणारी पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात सुटेल. गेल्या सव्वा दोन महिन्यांत नागरिकांनी केलेला पाण्याचा वापर बघता अशीच स्थिती पुढील काळात राहिल्यास उन्हाळ्यात पुन्हा पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासून शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर करण्याची गरज आहे.  

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांना खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव, पवना या धरणातून पाणीपुरवठा होत आहे. तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी वीर, खडकवासला आणि चासकमान या धरणांच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू आहे. शहरांना वडिवळे, पवना, खडकवासला आणि वीर धरणांतू बंद जलवाहिनेद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. तर, टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी टेमघर धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आला असून या धरणात सध्या अवघा एक टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या पानशेत ही धरणे शंभर टक्के पाणीसाठा असून उर्वरित धरणातील पाणीसाठा ९० ते ९५ टक्केच्या दरम्यान आहे. 

धरणनिहाय असलेला पाणीसाठा (टीएमसीमध्ये) - पिंपळगाव जोगे ३.३४, माणिकडोह ८.३०, येडगाव २.६७, वडज १.१०, डिंभे १२.३८, घोड ५.१०, विसापूर ०.९०, कळमोडी १.५०, चासकमान ७.३६, भामाआसखेड ७.४७, वडीवळे ०.९१, आंध्रा २.८६, पवना ७.३५, कासारसाई ०.५२, मुळशी १४.११, टेमघर ०.०५, वसरगाव १२.२५, पानशेत १०.६५, खडकवासला १.६७, गुंजवणी १.९९, निरा देवधर ११.३२, भाटघर २३.०२, वीर ६.११, नाझरे ०.३९.

पाण्याचा वापर जपून करण्याची गरज
येत्या रब्बी हंगामात आणि उन्हाळ्यात या पाण्याचा वापर व मागणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची आवश्यकता आहे. तरच उन्हाळ्यात पाणीप्रश्न काहीसा सुटेल, अन्यथा पुणे शहरातील नागरिकांना उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार अाहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com