नोकरीपेक्षा शेती बरी आनंद नांदतोय घरी

माळीवाडगाव, जि. अौरंगाबाद येथील एकत्रित गवळी कुटुंबीय.
माळीवाडगाव, जि. अौरंगाबाद येथील एकत्रित गवळी कुटुंबीय.

शिक्षणशास्त्राची पदवी व पदविकाप्राप्त गवळी कुटुंबातील (माळीवाडगाव, जि. अौरंगाबाद) चार सदस्य आज नोकरीपेक्षाही शेतीत रमले आहेत. पारंपरिक पिकांपेक्षा फळे व भाजीपाला यांना प्राधान्य देत ते एकमेकांच्या साथीने घरची शेती समृद्ध करण्यात गुंतले आहेत. नोकरीपेक्षा शेतीतच त्यांनी आनंद शोधला आहे.

माळीवाडगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील गाव (ता. गंगापूर) टोमॅटोचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तसा गावाला धरणाच्या पाण्याचा आधार असतो; मात्र पाऊसच पडला नाही तर धरणात तरी पाऊस कुठून येणार? यंदा गावात पावसाळ्यात किमान पाऊसही पडला नाही. त्यामुळे गावाकुसात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते आहे; मात्र हे दुर्भिक्ष जाणवण्याआधी यंदा टोमॅटोला मिळालेल्या दरामुळे येथील शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळतो आहे. 

गवळी बंधूंची शेती
याच गावातील विठ्ठल मारोती गवळी यांच्या कुटुंबातील विलास अशोक गवळी व संदीप अशोक गवळी या दोन्ही भावांनी शिक्षणशास्त्रातील अनुक्रमे पदवी व पदविका घेतली आहे. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीचा प्रयत्न त्यांनी केला; मात्र आज ही बाब तितकीशी सोपी राहिलेली नाही. शिवाय ‘डोनेशन’ हा स्वतंत्र विषय झाला आहे. त्यामुळे तिथे पैसे देण्यापेक्षा आपण शेतीतच गुंतवणूक करावी, असे गवळी बंधूंनी ठरवले. 

दोघांच्या सौभाग्यवतीही डीएड
दरम्यान, दोन्ही भावांची लग्ने झाली. विलास यांच्या पत्नी संध्या व संदीप यांच्या पत्नी पल्लवी यादेखील शिक्षणशास्त्र विषयातील पदविका घेतलेल्या अाहेत. त्यांनीही आपल्या पतीला शेतीत समर्थ साथ देणेच पसंत केले. आज पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या शेतातील कामांची जबाबदारी सांभाळतात. 

गवळी बंधूंचा हुरूपही मग वाढला. काळानुरूप शेतीत बदल करताना सिंचनाची सोय वाढविण्यासह, शेततळे, पीकबदल आदींच्या माध्यमातून अर्थार्जनाची सोय केली आहे. एकत्र कुटुंबपद्धतीत आनंद मानणाऱ्या गवळी बंधूंना वडिलांबरोबरच काका सुभाष, चुलतभाऊ सचिन, सुरज यांचीही मोठी मदत होते.  
 
पाण्याची धडपड 
शेतात जवळपास चार विहिरी आहेत; मात्र कोणत्याही विहिरीला पुरेसे पाणी नाही. पाण्याचे महत्त्व जाणूनच मागील वर्षी ४४ बाय ४४ मीटर आकाराच्या शेततळ्याची निर्मिती केली. पाच किलोमीटरवरील कन्नड तालुक्‍यातील देवगाव रंगारी शिवार व शिवना नदीवरून चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणले. ते या तळ्यात सोडले. त्यानंतर ठिबक सिंचनाच्या साहाय्याने ते पिकांपर्यंत पोचविण्याची सोय करण्यात आली आहे. 
 
पीकबदल करताना...
गवळ कुटुंबाकडे सुमारे पंचवीस वर्षांपासून पाच एकरावर मोसंबीची बाग होती. प्रत्येक वर्षी किमान तीन ते चार लाख रुपये या बागेतून मिळायचे; परंतु २०१६ मध्ये सततच्या अवर्षणस्थितीमुळे ही बाग काढावी लागली. चार वर्षांपासून गवळी बंधू डाळिंब शेतीकडे वळले आहेत. या शेतीतून एकूण क्षेत्रातून १५०० ते २००० क्रेटपर्यंत उत्पादन त्यांनी घेतले आहे. यंदा मात्र बहार नियोजन पाण्याअभावी कोलमडले. 
 
टोमॅटोची शेती ठरली फायद्याची 
तीन वर्षांपासून गवळी टोमॅटोच्या शेतीकडे वळले. साधारणत: पाच ते १५ जूनदरम्यान टोमॅटोची लागवड केली जाते. फळपिकांच्या जोडीला भाजीपाला शेती चांगले उत्पन्न देऊन जाते, असे गवळी सांगतात. व्यापाऱ्यांना एकाच जागी मोठ्या प्रमाणावर माल मिळावा, यासाठी ते परिसरातील शेतकरी व व्यापारी यांच्यातील समन्वयकाची भूमिका बजावतात. परिसरातील १० ते १५ शेतकऱ्यांकडील मालाचे संकलन करायचे. म्हणजे व्यापाऱ्यांना ते घेऊन जाणे सोपे होते. या माध्यमातून २०१६ मध्ये व्यापाऱ्यांना एकूण ७० हजार क्रेटची, तर यंदा २५ हजार क्रेटची खरेदी करणे शक्य झाले. या उपक्रमामुळे सुरतला टोमॅटो पाठवण्यासाठी क्रेटमागे ६० रुपयांची चांगली बचत होते. दरही चांगला मिळतो, असे संदीप म्हणाले.    

जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय घटकांचा वापर
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेणखत व कोंबडी खताच्या वापराला प्राधान्य दिले आहे. प्रत्येक वर्षी किमान ३५ ट्रॉली शेणखत व दोन ट्रक कोंबडीखत वापरण्याचे काम केले जाते. अर्थात खत बाहेरून विकतही आणावे लागते. त्यासाठी प्रत्येक वर्षी दोन ते अडीच लाख रुपये खर्च करावे लागतात; मात्र हा खर्च जमिनीच्या सुपीकतेसाठी महत्त्वाचा असल्याचे गवळी सांगतात. 

हळद प्रक्रिया 
यंदाचे वर्ष वगळता जवळपास चार वर्षे दीड एकरांवर हळद घेतली. प्रत्येक वर्षी चांगले उत्पादन मिळाले. कच्च्या हळदीला सांगलीच्या बाजारपेठेत ८०० ते एक हजार रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. चार वर्षांत दोन वेळा हळदीवर प्रक्रिया करून जवळपास तीस क्‍विंटल हळद या बाजारात विकली. त्यास साडेसात ते आठ हजार रुपये दर मिळाला. 

पीकपद्धती व नियोजन 
कपाशी- साधारणत: सहा एकर-दरवर्षी 
मका व स्वीट कॉर्न- किमान दीड ते दोन एकर- घरच्यांसाठी व चाऱ्यासाठी 
डाळिंब- सहा एकर- 
टोमॅटो- दीड ते तीन एकर 
अाले- तीन ते पाच एकर 
संपूर्ण पंचवीस एकर शेती ठिबक सिंचनावर  
पाण्याच्या कमतरतेमुळे त्याचा कार्यक्षम वापर करण्यावर कटाक्ष 
शेतीकामासाठी दोन ट्रॅक्‍टर  
पाणी असल्याने मागील वर्षी पाऊण एकरात बटाटे पिकाचा पहिलाच प्रयोग केला. त्यातून ३० क्‍विंटलचे उत्पादन मिळाले. यंदा मात्र पाण्याअभावी हा प्रयोग घेतला नाही.   
कुटुंबातील सुमारे आठ सदस्य शेतीत राबतात. त्याचबरोबर मध्य प्रदेशातील सहा मजूर कायम असतात. 
आले पिकाचे दीड एकरात १०० क्विंटल उत्पादन मागील वर्षी झाले. त्यास २२५० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. बीटी कपाशीचे दरवर्षी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते. 
प्रत्येकी दोन संकरीत गायी व बैलांचे संगोपन 
फ्लाॅवर व कोबीचीही होते शेती  
पीक फेरपालट करताना हरभरा, गहू आदी पिकांना प्राधान्य 

- संदीप गवळी, ९४२०४९१६४८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com