बोंड अळीच्या पंचनाम्यासंबंधी खानदेशात कार्यवाही अपूर्ण

बोंड अळीच्या पंचनाम्यासंबंधी खानदेशात कार्यवाही अपूर्ण

जळगाव - धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या पंचनाम्यासंबंधी कार्यवाही अपूर्ण आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील पूर्वहंगामीसह कोरडवाहू कपाशीचे पीक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या आवाहनानंतर नष्ट केले. सुमारे ९० टक्के पीक नष्ट झाले. शेतात पीक नाही, मग पंचनामे अपूर्ण कसे, हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

बोंड अळीचा प्रकोप ऑक्‍टोबरमध्येच वाढला. नंतर नोव्हेंबरमध्ये रोगग्रस्त पूर्वहंगामी कपाशीचे पीक काढायला सुरवात झाली. आजघडीला कोरडवाहू कपाशीचे पीकही संपले आहे. धुळे व जळगाव मिळून सुमारे सात लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली असून, त्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक चार लाख ७५ हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. सात लाख हेक्‍टरमध्ये जळगाव जिल्ह्यात सुमारे एक लाख २० हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी, तर धुळ्यात सुमारे ५० हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी कपाशीची लागवड झाली होती.

तापीकाठालगतच्या रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, अमळनेर, शिरपूर व शिंदखेडा तालुक्‍यांमध्ये पूर्वहंगामी कपाशी अधिक होती. हे क्षेत्र महिनाभरापूर्वीच रिकामे झाले आहे. या रिकाम्या झालेल्या क्षेत्राचे पंचनामे झाले, की नाहीत याचा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये किंवा कपाशी उत्पादकांमध्ये आहे. कारण कृषी विभागाचे कर्मचारी म्हणतात, जी अर्ज दिला असेल तर चिंता करू नका तर दुसरीकडे पंचनामे गरजेचे आहेत, असे तलाठी कार्यालयातून सांगितले जाते.

महसूल व कृषी विभाग संयुक्तपणे काम करीत नसल्याने पंचनाम्यांचा गोंधळ वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात पंचनामे पूर्ण व्हायला अजून १० ते १२ दिवस लागतील, तर धुळ्यातही अशीच स्थिती असल्याची माहिती मिळाली.

जी व एच अर्ज किती आले?
कपाशी नुकसानीच्या तक्रारीसाठी जी अर्ज व पंचनाम्यांसाठी एच अर्ज भरून कार्यवाही केली जात आहे. अशात शेतकऱ्यांनी मध्यंतरी जी अर्ज भरून ते तालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन कृषी विभागात जमा केले. हे जी अर्ज आता नुकसानभरपाई देताना गृहीत धरतील काय, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. तसेच एच अर्जानुसार किती पंचनामे झाले याची माहितीही कृषी विभागात मिळत नसल्याची माहिती मिळाली. या अर्जांसंबंधीची जबाबदारी जिल्हा गुणवत्ता निरीक्षक यांच्याकडे असून, ते समन्वयक म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली.

गुलाबी बोंड अळीचे पंचनामे सुरूच असल्याचे म्हटले जाते, पण हे कर्मचारी केव्हा व कुठे आले हे समजलेच नाही. आम्ही जे जी अर्ज दिले त्याची दखल घेऊन आम्हाला नुकसानभरपाई मिळावी.
- नाना पाटील, शेतकरी, बोदवड (जि. जळगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com