एकात्मिक शेती, एकत्रित कुटुंब

एकात्मिक शेती, एकत्रित कुटुंब

एकत्रित कुटुंबपद्धती व एकात्मिक शेती या दोन मुख्य बाबी शेतीला प्रगत करण्यास मोठी कामगिरी बजावतात. शेरी (चिखलठाण), जि. नगर येथील सुमारे ४५ एकरांवरील गायकवाड कुटुंबाने याच जोरावर आपल्या शेतीची आर्थिक पाळेमुळे घट्ट केली आहेत. नगदी पिके, आंतरपिके व जोडीला शेळी व कोंबडीपालन अशी प्रभावी शेतीपद्धती त्यांना प्रगतीकडे घेऊन गेली आहे. 
 

नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील शेरी (चिखलठाण) येथील गायकवाड यांचे सहा भावांचे एकत्रित कुटुंब आहे. पैकी तीन भाऊ नोकरी व तीन भाऊ शेती व पूरक व्यवसाय सांभाळतात. यात माउली व अशोक हे सख्खे भाऊ आहेत. सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या असल्याने कामांची पद्धती सुलभ झाली आहे. 

कामांची जबाबदारी 
शेती    माउली 
कुक्कुटपालन    तुकाराम
शेळीपालन     मच्छिंंद्र

गायकवाड यांची संयुक्त कुटुंबाची ४५ एकर शेती 
आहे. डाळिंब, कलिंगड, खरबूज व मिरची ही सध्याची त्यांची मुख्य पिके आहेत. रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर कमी करून नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीच्या शेतीवर त्यांनी भर दिला आहे. त्यातून उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे.  

पूर्वी जिथे एकरी दहा गोण्या रासायनिक खतांचा वापर व्हायचा, तिथे आता दोन गोणीच होतो. दर आपल्या हातात नाहीत. मात्र, उत्पादकता वाढविणे व खर्चात बचत केली तरी शेती तोट्यात नाही, असे गायकवाड यांचे तत्त्वज्ञान आहे. 

पूरक व्यवसाय

शेळीपालन
सुमारे सात वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे. बीटल, आफ्रिकन बोअर, सोजत आदी शेळ्या आहेत. शेड साठ बाय तीस फूट आकाराचे आहे. जमिनीपासून शेडची उंची साडेचार फूट उंच आहे. चार शेळ्यांपासून शेळ्यांची संख्या ७० वर नेली आहे. शेळ्यांची खरेदी- विक्री वर्षभर सुरूच असते.  बोअर जातीला हजार रुपये प्रतिकिलो दर मिळतो. अन्य जातींतील शेळीला किलोला ४०० ते ५०० रुपये दर मिळतो. स्थानिक बाजारपेठेत विक्री होते. तसेच, व्यापारी जागेवर येऊन वजन करूनही घेऊन जातात. 

कोंबडीपालन  
सुरवातीला कडकनाथ जातीच्या दहा कोंबड्या पाथर्डीहून आणल्या. सध्या संख्या २५० पर्यंत आहे. घरच्या शेतात उत्पादित बाजरी व गहू त्यांना दिला जातो. प्रतिअंड्याची किंमत तीस ते चाळीस रुपये असून, आठवड्याला सुमारे १०० ते १५० अंडी विकली जातात. शेळीपालन शेडमध्ये वरच्या ‘फ्लॅटफाॅर्म’वर शेळी, तर त्याखालील प्लॅटफॉर्मवर (जमिनीवर) कोंबडीपालन केले जाते. शेळ्यांच्या लेंड्या लाकडांच्या फटीतून खाली पडतात. हे खाद्य कोंबड्यांना मिळते, त्यामुळे खाद्यात बचत होते. स्वच्छ वातावरणामुळे शेडमध्ये दुर्गंधी येत नाही. कोंबडीची विक्री एक हजार रुपयांप्रमाणे होते. कडकनाथ कोंबडीच्या मांसाला व अंड्यांनाही मोठी मागणी आहे.

आगामी नियोजन - सोळा गुंठे जागेत देशी तूर, शेवरी, मका आदींचे परिपूर्ण नियोजन व कुंपण. त्यात त्या वातावरणात दिवसभर कोंबड्या सोडल्या जातील. केवळ संध्याकाळनंतर त्या शेडमध्ये येतील.  त्यांची संख्या पंधराशेपर्यंत वाढविली जाणार आहे.  

सध्या उपलब्ध यंत्रे - पेरणी यंत्र, धशा, नांगर, कल्टिव्हेटर, सरी काढण्याचे यंत्र, गवत काढणी यंत्र, रोटाव्हेटर, ट्रॅक्टर व फवारणीसाठी ब्लोअर

पीकपद्धतींविषयी

डाळिंब 
या पिकाचे आठ एकर क्षेत्र आहे. यात जिवामृताचा वापर जास्त प्रमाणात होतो. भगवा वाण आहे. एकरी सुमारे ४०० झाडे आहेत. उत्पादन प्रतिझाड १०० ते १५० फळे, तर एकरी सात ते आठ टन मिळते. सेंद्रिय पद्धतीने गुणवत्तापूर्ण उत्पादन घेत असल्याने रंग गडद, चमक जास्त, आकार मोठा अशी फळांची वैशिष्ट्ये आहेत. तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव शक्यतो नाही. ए ग्रेडच्या फळांची संख्या चांगली असल्याने जागेवरच ५३ रुपये व कमाल यापूर्वी ७० ते ९० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. अलीकडील काळात मात्र दर घटत चालल्याचे माउली म्हणाले. पंजाब,  हरियाना, दिल्लीपर्यंत त्यांचा माल जातो.

पपई
तैवान वाण असून, पॉलिमल्चिंगवर पीक घेतले जाते. दोन एकरांत लागवड असते. प्रतिझाड उत्पादन ५०, ७० व त्याहूनही अधिक किलोपर्यंत, तर एकरी ५० ते ६० टनांपर्यंत मिळते. दर किलोला पाच रुपयांपासून ते कमाल १५- १६ रुपयांपर्यंत मिळतो. पपई नैसर्गिकरीत्या झाडावरच पिकविली जाते. तिचा स्वादही अत्यंत गोड आहे. राहुरीसह वाशी मार्केटला माल पाठवला जातो. व्यापारी जागेवरदेखील खरेदी करतात. 

टरबूज (कलिंगड) व खरबूज 
उन्हाळ्यात घेतल्या जाणाऱ्या कलिंगडाचे एकरी २५ टन, तर खरबुजाचे १२ ते १५ टन उत्पादन मिळते. यात सापळा पीक म्हणून मका घेतला जातो. आंतरपिके - पपईतही कलिंगड, झेंडू, मिरची आदी पिके घेतली जातात. सूर्यफुलाचे पीकही किडींसाठी सापळा म्हणून ठरते. दोन एकर पपईतील कलिंगड सुमारे एक- दीड लाख रुपयांचे, तर मिरची ७५ हजार ते एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून देते. त्यामुळे पपईचे उत्पन्न हे बोनसच ठरते. 
झेंडूची घारगाव व स्थानिक बाजारपेठेत विक्री होते. त्याचे आठ ते दहा टन उत्पादन मिळते. काकडीचे एकरी १५ ते २० टन उत्पादन मिळते. सेंद्रिय पद्धतीच्या वापरातून उत्पादन खर्च ५० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य झाले आहे. 

जिवामृत व दशपर्णी अर्काचा वापर 
एका वेळेस सुमारे दहा हजार लिटर जिवामृत जमिनीत खोलवर असलेल्या टाकीत तयार होते. विद्युत मोटारीने ते फिल्टरसाठी साडीच्या झोळीत पडते. ‘फिल्टर’ झालेले जिवामृत जवळच बांधलेल्या टाकीत येऊन पडते.

गरजेनुसार ठिबकद्वारेही दिले जाते. दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी कडुनिंब, वेडीबाभूळ, पपई, करंज, धोत्रा, बोर, एरंड, शेवगा, रामकाठी, हळद, लसूण व गोमूत्र यांचाही वापर होतो. नीमतेल, करंजतेल यांचीही फवारणी होते.

- माउली गायकवाड - ९७६७२३७६८२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com