कमी तापमानातील द्राक्षबागांचे नियोजन

द्राक्षबागेत आच्छादन करावे.
द्राक्षबागेत आच्छादन करावे.

सध्या द्राक्षबागेत वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था दिसतात. लवकर फळछाटणी झाली असल्यास मण्यात पाणी उतरण्याची अवस्था दिसून येईल. उशिरा फळछाटणी झाली असलेल्या बागेत फक्त मण्याचा विकास होत आहे. सध्या कमी झालेल्या तापमानात बागेच्या व्यवस्थापनात बदल करावे लागणार आहेत. 

मण्याची वाढ थांबणे -
    घडाचा विकास होण्याकरिता वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली पूर्ववत सुरू असणे गरजेचे असते. असे असल्यास जमिनीतून मुळाद्वारे उपलब्ध असलेले पाणी व अन्नद्रव्य उचलून वेलीस पोचवले जाते. ही परिस्थिती साधारणः किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानंतरच फायद्याची ठरते.
    सध्याच्या परिस्थितीचा विचार करता बऱ्याच भागांत तापमान १० ते १२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. याचा वेलीच्या विविध हालचालींवर विपरीत परिणाम होताना दिसतो. या परिस्थितीमुळे मण्याचा विकास कमी होताना दिसतो.
    या परिस्थितीवर मात करण्याकरिता बागायतदार संजीवकांची फवारणी करतात. ही फवारणी साधारणतः १२-१५ मिमी मण्याच्या आकारातील द्राक्षघडावर केली जाते. कारण उशिरा फळछाटणी झालेल्या बागेमध्ये अशा कमी तापमानात घडाचा विकास थांबतो. पुढे घडाची परिपक्वता होण्याकरिता वेळ कमी राहतो. या गोष्टींचा विचार करून बागायतदार नेहमीच्या शिफारशीपेक्षा पुन्हा एक किंवा दोन वेळा जीए व सीपीपीयूसारख्या संजीवकांची कमी प्रमाणात फवारणी करतात. त्याचा परिणाम मण्याची साल जाड होणे, मण्यात साखर कमी उतरण्यावर होतो. याच सोबत मण्याची परिपक्वतासुद्धा लांबणीवर जाते. 
    जर कमी तापमानात वेलीची शरीरशास्त्रीय हालचाली मंदावल्या असल्यास बाहेरून फवारलेल्या संजीवकांचा फारसा फायदा होत नाही. 

उपाययोजना -
    जीएची फवारणी करायची झाल्यास १२ मिमी आकाराच्या मण्याच्या अवस्थेपर्यंतच करावी.
    किमान तापमान कमी झाल्यास मण्याची वाढ होण्याकरिता मुळी कार्यरत राहील, याची काळजी घ्यावी. याकरिता बोद मोकळे केल्यास त्यांचे चांगले परिणाम मिळतात. कारण या वेळी काळी पडत असलेली मुळी थोड्या फार प्रमाणात तुटेल किंवा उघडी पडेल. त्यानंतर आपण पाणी  देतो. त्याचा फायदा पुन्हा लवकर नवीन मुळी तयार होण्यास होतो.
    बोदावर मल्चिंग आच्छादन केल्यास मुळीच्या भोवतालच्या तापमानात वाढ होते. त्याचाच परिणाम म्हणजे वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीचा वेग वाढण्यास मदत होईल. जमिनीत उपलब्ध असलेले अन्नद्रव्य व पाणी वेलीवर वाढत असलेल्या घडापर्यंत पोचेल, त्यातून घडाचा विकास होईल.
    बागेत पाणी जास्त उपलब्ध असल्यास मोकळे पाणी देता येईल. असे केल्याससुद्धा बागेतील तापमान वाढवण्यास मदत मिळेल.

मण्यावरील डाग 
    बागेतील किमान तापमान कमी झाले की मण्याची वाढ कमी होताना दिसते. 
    याचवेळी साधारणतः १० मिमी ते १४ मिमी आकाराच्या मण्याची वाढ होत असलेल्या बागेत जर कॅनॉपी दाट असल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येईल. अशा परिस्थितीमध्ये बागायतदार मुळी कार्य करत नाही, असे समजून अन्नद्रव्यांची फवारणी करतात. याचसोबत संजीवके आणि त्यानंतर बुरशीनाशकांची फवारणी सुरू असते. 
    फवारणीचे परिणाम चांगले मिळावेत, याकरिता संजीवकांमध्ये स्टिकर मिसळला जातो. यामुळे मण्यावर डाग दिसून येतात. 
    एकदा मण्यावर डाग आल्यास सहजरीत्या निघत नाहीत. मण्याचा आकार कितीही चांगला असला तरी तो बाजारात विकला जात नाही. तेव्हा  स्टिकरचा वापर टाळावा.
- ०२०- २६९५६०६० (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com