लोकसहभागाच्या बळावर मुळेगाव बनले स्मार्टग्राम

लोकसहभागाच्या बळावर मुळेगाव बनले स्मार्टग्राम

पाणी, वीज, रस्ते या मूलभूत सोई-सुविधा ग्रामस्थांना पुरवण्यासह मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव, स्वच्छ भारत मिशन यांसारख्या शासनाच्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत विविध बक्षिसे पटकावली. संगणकीकृत कामकाजासह आयएसओ मानांकन प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला मिळाले आहे. ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक करणारे गाव म्हणूनही मुळेगावची वेगळी ओळख आहे. 

सोलापूरपासून दहा किलोमीटरवर दक्षिण सोलापुरातील मुळेगाव हे ३,८०० लोकसंख्येचं गाव. सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर गाव असल्याने गावातील बहुतांश लोकांचा शहराशी अधिक संपर्क आहे. असे असले, तरी शेती ही गावाची प्रमुख ओळख आहे. गावाचे शिवार ७०० हेक्टरपर्यंत आहे. त्यापैकी बहुतांश जिरायत आहे. बागायत क्षेत्र कमी असले, तरी सोलापूरची बाजारपेठ जवळ असल्याने भाजीपाला, कांदा यांसारखी पिके घेण्यात गावाची आघाडी आहे. विशेषतः भाजीपाला सर्वाधिक होतो. मूळगाव छोटं असलं, तरी परिसरात गावच्या अखत्यारित ५२ छोट्या-मोठ्या वस्त्या, नगरे आहेत. त्यामुळे विकासकामांचा असा विस्तृत आराखडा गावाला आखावा लागतो. 

सरपंच ब्रह्मनाथ पाटील, उपसरपंच राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायत सदस्य अशोक काकडे, मलप्पा म्हेत्रे, माणिक चव्हाण, सौ. संगीता नागटिळक, सौ. सविता भोसले, सौ. कांताबाई बंडगर, सौ. मंगल खरात, सौ. माधुरी बनसोडे, सौ. जुलैखा शेख यांच्यासह ग्रामविकास अधिकारी नागसेन कांबळे यांनी आखीव रेखीव काम उभे केले आहे. 

सिमेंट रस्ते, घंटागाडी, भूमिगत गटार
गावातील प्रमुख सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. संपूर्ण गावात भूमिगत गटार तयार केलेली आहेत. या गटारातील पाणी गावाच्या ओढ्याला सोडण्यात आले आहे. गावातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची सोय करण्यात आली आहे. त्यावर एक स्पीकरही बसवला आहे. त्यातून विविध संदेश, दवंडीही लोकांना देण्यात येते.  

हायमास्टसह सौरपथदिवे 
गावातील दोन प्रमुख चौकांत हायमास्ट दिवे बसवण्यात आले आहेत. तसेच गावातील काही चौकात आणि वाड्यावस्त्यांवर सौरपथदिवेही आवर्जून लावण्यात आले आहेत. गावपरिसरात ९६ सौरपथदिवे आहेत. त्यामुळे वीजबचतीसह कायमस्वरूपी वीजपुरवठा या भागाला होतो.

संगणकीकृत कामकाज 
ग्रामपंचायतीची स्वतःची सुसज्ज अशी इमारत असून, याच ठिकाणी तलाठी, कृषी कार्यालयाचे कामकाज चालते. याशिवाय सर्व कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड आहे. संपूर्ण कामकाज संगणकीकृत आहे. गावकऱ्यांना रहिवासी, उत्पन्न तसेच अन्य प्रकारचे सर्व दाखले संगणकीकृत मिळतात. त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यासह ग्रामपंचायतीचे सात कर्मचारी इथले कामकाज पाहतात.

ओढ्याचे खोलीकरण, वृक्षलागवडीची चळवळ 
ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वी गावच्या बाजूने वाहणाऱ्या कुंभारी ते मुळेगाव या दोन किलोमीटरच्या ओढ्याचे खोलीकरण, सरळीकरण केले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या विहिरींसह गावातील विंधन विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे ओढा दुथडी भरून वाहिला. त्यामुळे यंदा पुन्हा पाणीपातळी वाढण्यासह टिकून राहणार आहे. याशिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावातील रस्ते, स्मशानभूमी आणि मोकळ्या जागांवर एक हजार वृक्षांची लागवड आणि जोपासनाही केली आहे. 

‘आयएसओ’ मानांकन  
ग्रामविकासाच्या कामाबरोबरच ग्रामपंचायतीने पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सोईसुविधांवर लक्ष केंद्रित करत कामे केली, त्याचबरोबरीने आरोग्यसेवा, शुद्ध पाणीपुरवठा, संगणकीकृत कामकाज, जलयुक्तशिवार, महिला बचत गट आणि शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा पुरवण्यासह स्मार्टकामे केली आहेत. या सर्व कामाची दखल म्हणून ग्रामपंचायतीच्या ग्रामविकासाच्या या मॅाडेलला आयएसओ मानांकनाचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

‘अॅग्रोवन सरपंच परिषदे’तून  मिळाली शिदोरी  
‘सकाळ- अॅग्रोवन’च्या वतीने राज्यातील सरपंचांसाठी दरवर्षी दोनदिवसीय सरपंच परिषद आयोजित केली जाते. ग्रामविकासाच्या कामाविषयी मार्गदर्शन आणि विविध विषयांवरील तज्ज्ञ, मान्यवरांशी चर्चेची ही परिषद सरपंचांसाठी माहितीपूर्ण आणि ज्ञानाची शिदोरी देणारी असते. मुळेगावचे सरपंच ब्रह्मनाथ पाटील हे या परिषदेमध्ये सहभागी झाले होते. याचा त्यांना ग्रामविकासाच्या आखणीमध्ये चांगला फायदा झाला आहे.

जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत,  ७५ वर्षे बिनविरोध निवडणुका
मुळेगाव ग्रामपंचायतीची स्थापना ब्रिटिशकाळात १९२० मध्ये झाली. त्या काळात या गावामध्ये ज्वारीची बाजारपेठ होती. १९३४-३५ काळात मुंबई इलाक्यामध्ये ब्रिटिशांनी ग्रामसुधारणा चळवळ सुरू केली होती. त्या वेळी मुळेगावने पहिला क्रमांक मिळवला होता. गावकऱ्यांची ही चिकाटी पाहून गावात ब्रिटिशांनी शेती अवजारे बँक सुरू केली होती. तसेच नालाबांध, कंपार्टमेंट बंडिग अशी विविध कामे त्या काळात करण्यात आली. गावकऱ्यांच्या या सहभागामुळेच १९३३ मध्ये कोरडवाहू कृषी संशोधन केंद्राची येथे सुरुवात झाली. पहिल्यापासूनच गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग हे गावाचे वैशिष्‍ट्य राहिले आहे. तेव्हापासून आतापर्यंत काही किरकोळ अपवाद वगळता गावची ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होते.

पाणी शुद्धीकरण प्रकल्प
गावामध्ये पाणीपुरवठ्यासाठी सार्वजनिक नळपाणी पुरवठा योजना आहे. याशिवाय नव्याने प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनाही सुरू होत आहे. तीन वर्षांपूर्वी गावात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्रकल्प (आरओ) सुरू करण्यात आला. २००० लिटर क्षमेतेच्या या प्रकल्पातून एटीएम पद्धतीने पाच रुपयाला घागरभर पाणी ग्रामस्थांना दिले जाते. याशिवाय पाण्याच्या दोन टाक्या आहेत. गावात सात ठिकाणी सार्वजनिक विहिरी आहेत. तसेच ४० हातपंप आहेत. त्याद्वारेही वापरण्यासाठी पाण्याचा पुरवठा होतो. 

सक्रिय लोकसहभाग हेच आमच्या गावचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच शासनाच्या प्रत्येक स्पर्धेत आम्ही सहभाग घेऊ शकतो. लोकांच्या सहकार्यावर गावामध्ये विकासकामेही झाली, तसेच विविध बक्षिसेही मिळवली. गावातील काम कोणा एकट्याचं नाही. गावाचं, गावातील प्रत्येकाचं आहे.   
-ब्रह्मनाथ पाटील, (सरपंच) ९४२१०६७७८७

लोकांच्या गरजा ओळखून काम केले. सर्वस्तरातील लोकांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न केला. अगदी रस्ते, वीज, पाणीपुरवठ्यासह मूलभूत सुविधांवर अधिक भर दिला आहे.
- राहुल बनसोडे, (उपसरपंच)

शासनाच्या सर्वच स्पर्धांत आम्ही सहभाग घेतला आणि त्यात यशस्वीही झालो. लोकसहभागाचं उत्तम उदाहरण गावानं घालून दिलं आहे, याचं श्रेय लोकांनाच आहे.
- नागसेन कांबळे, (ग्रामविकास अधिकारी)

लॉकडाउनमधला अनोखा उपक्रम  
कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाउन जाहीर झाले. या काळात केंद्र सरकारने स्वस्त धान्य दुकानावर लोकांना तांदळाचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला. गावातील चांगली परिस्थिती असणाऱ्या कुटुंबांनी हा तांदूळ गरजूंना देण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळाला. त्यानुसार ग्रामपंचायतीने या लोकांकडून सुमारे ८० पोती तांदूळ गोळा केला आणि तो गावातील गरीब, गरजूंना वाटप केला. याचबरोबरीने गहू आणि भाजीपालाही जमवत जवळपास ३०० कुटुंबांना वाटप केले. 

गावावर  सीसीटीव्हीची नजर  
गावातील प्रमुख चौकांसह परिसरातील वस्त्यांवर ग्रामपंचातीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याचे संपूर्ण नियंत्रण ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून होते. आतापर्यंत आठ ठिकाणी हे कॅमेरे बसवले आहेत. आणखीन तेवढेच कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे गावाच्या सुरक्षिततेलाही ग्रामपंचायतीने प्राधान्य दिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com