अवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून प्रयोगशीलता

अवर्षणग्रस्त भागात जपली फळबागांमधून प्रयोगशीलता

नगर जिल्ह्यात सैदापूर-हत्राळ (ता. पाथर्डी) शिवारात सुभाष आणि संजय या केदार बंधूंचे एकत्रित कुटुंब  आहे. दोघे भाऊ नोकरी करतात. सुभाष जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागात वरिष्ठ सहायक, तर संजय हे रायगड जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आहेत. सुभाष यांचा मुलगा सौरभ हा जैवतंत्रज्ञान विषयात बीएसस्सी करीत आहे. केदार बंधूंची वडिलोपार्जित ४२ एकर शेती आहे. अवर्षणग्रस्त या भागात शेतजमीन खडकाळ, सिंचनाचा अभाव असलेली होती. या परिसरात कापसू, बाजरी, ज्वारी, अशीच पारंपरिक पिके घेतली जातात. केदार परिवारही अशीच पिके घेत.

प्रयोगशील वृत्ती जपली 
प्रतिकूल परिस्थितीतही केदार बंधूंनी प्रयोगशीलता जपली. सन २००० मध्ये दोन एकरांवर केळी उत्पादनाचा प्रयोग केला. तीस टन उत्पादनासह ते यशस्वीही झाले. नगरमधील व्यापाऱ्यांना विक्री केली. तीस टन केळीचे उत्पादन निघाले.
सन २००५ मध्ये तीन एकरांत तैवान पपईची लागवड केली. पाथर्डी, बीड, शेवगाव भागांतील बाजारात नगावर विक्री केली. मोठ्या नगाला ३५ ते ४० रुपये, तर लहान नगाला १५ ते २० रुपयांपर्यंत दर मिळवला. या भागातील हा पहिलाच प्रयोग होता.
सन२०१३ मध्ये सहा एकरांवर एरंडी घेण्याचाही या भागातील पहिलाच प्रयोग केला. 

तलावातील गाळ टाकून आंबा लागवड 
फळपिकांतून यश मिळाले. पण, पाण्याची व मजूरबळाची मोठी समस्या होती. अखेर पीकपद्धतीत बदल करावा लागला. केदार बंधू सन २००६ मध्ये आंबा पिकाकडे वळले. सहा एकर क्षेत्र निवडले. जमीन खडकाळ असल्याने त्यात तलावातील माती आणून वापरली. त्यानंतर लागवड केली. खते, पाणी आणि अन्य नियोजनातून उत्पादनात वाढ केली. 

आंब्याची झाडे 
 एकूण क्षेत्र- सहा एकर
 त्यात केशर- ३२० 
 तोतापुरी-१५ 
 हापूस- ६०
 सदाबहार (कायम उत्पादन देणारा, लोणच्यासाठीचा)-१५ 

आश्वासक उत्पादन 
आंब्याचे दोन वर्षांनंतर पहिले पीक हाती आले. सुमारे ३० ते ३५ झाडांमधून पहिल्या वर्षी केवळ तीन क्विंटल उत्पादन मिळाले. जागेवर शंभर रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. दुसऱ्या वर्षी ४० झाडांमधून पाच क्विंटल उत्पादन निघाले. हळूहळू उत्पादनक्षम झाडांची संख्या वाढू लागली. तसे उत्पादन वाढू लागले. यंदा दहा वर्षांनंंतर सुमारे २५० ते ३००  झाडांपासून एकूण सहा टनांपर्यंत उत्पादन मिळाले. आंब्याचा दर्जा, स्वाद दर्जेदार असल्याने मागणीही चांगली राहिली. केशर व हापूसला आत्तापर्यंत ७०, ८०,९० रुपये प्रतिकिलो असेच दर राहिले. यंदा औरंगाबादच्या व्यापाऱ्याला जागेवरच २९ रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली. 

 आंतरपीक 
आंब्याच्या नव्या बागेत पहिली दोन वर्षे आंतरपिके घेतली. त्यात पहिल्या वर्षी मटकी व त्यानंतर दुधी भोपळ्याची लागवड केली. तिसगाव, पाथर्डी, शेवगाव बाजारात हातविक्री केली. दोन्ही पिकांमुळे आर्थिक हातभार चांगला लागला. 

ठिबकमुळे झाला फायदा 
सन २००० पासून शेतीत ठिबकचा वापर सुरू केला. केळी, पपईला त्याचा उपयोग झालाच. शिवाय सध्या सहा एकर क्षेत्रालाही तो होतो आहे. ठिबकमुळे अल्प पाण्यावर दुष्काळात झाडे जगवता आली. हळूहळू जास्तीत जास्त क्षेत्र ठिबकखाली आणण्याचा मानस  आहे.

रासायनिकपेक्षा सेंद्रिय शेतीवर भर  
आंबा बागेत सुरुवातीला रासायनिक खतांचा वापर व्हायचा. मात्र, अलीकडील काही वर्षांत जैविक खत व सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. प्रतिझाडाला चार किलो जैविक, तर दोन किलो शेणखत वर्षातून एकदा दिले. गरजेनुसार शेणखत विकत आणले जाते. सें.िद्रय पद्धतीच्या वापरामुळे आंब्याची गुणवत्ता, स्वाद, तसेच टिकवणक्षमताही वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांकडूनही मागणी वाढली आहे. काही वर्षांपूर्वी शेणखतावर भर देत केळीचे पीकही यशस्वी केले होते. अन्य पिकांत बाजरी, तूर, कापूस आदींचा समावेश आहे. 

केदार बंधूंच्या  शेतीची वैशिष्ट्ये
नोकरी सांभाळूनही शेतीची जबाबदारी सांभाळली. 
सेंद्रिय पद्धतीवर दिला अधिक भर 
दुष्काळातही सातत्याने प्रयोगशीलता जपली 
सिंचन व्यवस्था बळकट केली
पडीक जमिनीवर डाळिंब लागवडीचे नियोजन

विहिरीच्या पाण्याचा आधार
पाथर्डी तालुक्‍यातील बहुतांश भागात पाणीटंचाई सातत्याने असते. सन १९७२ च्या दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांना रोजगार मिळण्यासाठी झालेल्या पाझर तलावाचा सैदापूर-सात्रळसह परिसराला आधार आहे. केदार यांची एक विहीर तलावानजीक आहे. शिवाय अन्य एक विहीर आहे. त्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन करून ते शेतीला देतात. तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणले आहे.
 
शेततळ्याने दुष्काळात तारले
सन २०११ मध्ये पन्नास लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे. सन २०१३-१४ मध्ये दुष्काळाने पाथर्डी तालुक्‍यातील बहुतांश डाळिंब, आंबा व अन्य बागा वाया गेल्या. परंतु, शेततळे असल्याने त्याच्या जोरावर दुष्काळात सहा एकर आंब्यांची बाग केदार यांना जगवता आली. 

अवर्षणग्रस्त भाग असूनही प्रयत्नपूर्वक केलेल्या शेतीने आम्हाला आत्मविश्‍वास दिला आहे. दर्जेदार उत्पादन घेऊन त्याला बाजारपेठ मिळवून दिली आहे. येत्या काळात ‘अॅग्रो टुरिझम'' उभारण्याचे नियोजन आहे. 
- सुभाष केदार, ९७६३५३११६२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com