वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार पद्धतीने शेती; मिळवली थेट ग्राहक बाजारपेठ

veer-family
veer-family

अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि. नगर) येथील संतोष व काकासाहेब या वीर बंधूंनी दीड एकरात वर्षभरात दहाहून अधिक विविध भाजीपाला उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेण्याचा पॅटर्न राबवला आहे. नजीकच शेवगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. साहजिकच आपल्या दर्जेदार, ताज्या शेतमालाला हमीची व खात्रीशीर थेट ग्राहक बाजारपेठ वीर बंधूंनी विकसित केली आहे. 

नगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातील बहुतांश भागात 
दुष्काळी परिस्थिती आहे. सालवडगाव परिसरही त्यास अपवाद नाही. येथील संतोष आणि काकासाहेब या वीर बंधूंची सहा एकर शेती आहे. दोघेही भाऊ शेतीतच राबतात. खरीप, रब्बी हंगामी पिकांबरोबरच दोन वर्षांपासून दीड एकरांत सेंद्रिय पध्दतीने  त्यांनी भाजीपाला शेती सुरू केली आहे. 

दीड एकरात बारमाही भाजीपाला 
पाण्याचे प्रमाण या भागात अल्प असल्याने भाजीपाला क्षेत्र वाढवण्यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही दीड एकर जागेचा पुरेपूर विनियोग करून दहापेक्षा अधिक भाज्यांची शेती वर्षभरात केली जाते. यात वांगी, दोडका, मिरची, भेंडी, कारली, दुधीभोपळा कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, कारली, घोसाळे तर पालेभाज्यांत शेपू, अंबाडी, कोथिंबीर, पालक, मेथी, काकडी, मुळा अशी विविधता दिसून येते. दीड एकरांत एवढ्या प्रकारच्या भाजीपाल्यांचे उत्पादन घेणारे वीर हे या भागातील एकमेव शेतकरी असावेत. 

कुटुंबाच्या मदतीने मजूरटंचाईवर मात
 इतरांप्रमाणे वीर यांनाही अलीकडील काळात सातत्याने मजूरटंचाई जाणवते. मात्र दोघे बंधू, आई साखरबाई व वडील पंढरीनाथ असे सर्वजण मिळून शेतीत काम करतात. त्यामुळे मजुरांवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी केले आहे. दोन कायमस्वरूपी मजूरही आहेत. येत्या काळात तीन एकरांवर आंबा, सीताफळ, मोसंबी, शेवगा व पपई आदींचीही लागवड करण्याचे नियोजन आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुष्काळात शेततळ्याने तारले 
दोन वर्षांपूर्वी तीन लाख रुपये खर्च करून २५ गुंठे क्षेत्रात शेततळे उभारले आहे. त्यासाठी कृषी विभागाची मदत झाली. या भागात सिंचनाचा अभाव असल्याने सातत्याने पाणी टंचाई समस्येला सामोरे जावे लागते. भाजीपाला लागवड सुरू केली त्यावर्षी पाणीटंचाई निर्माण झाली. मात्र शेततळ्यातील पाण्यामुळे ही शेती वाचवता आली. विहिरीतून पाण्याची काही प्रमाणात उपलब्धता होते.

सेंद्रिय किंवा नैसर्गिक भाजीपाल्याला चांगली मागणी आहे. अशा प्रकारचे उत्पादन शेतकऱ्यांना तारू शकते. त्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. शेतीत परवडत नाही असे म्हणणाऱ्या तरुणांनी भाजीपाला उत्पादनासोबत  विक्रीचेही व्यवस्थापन केल्यास नक्कीच यशस्वी होता येते. 
- संतोष वीर, ९८२२६६९७६२

लॉकडाउनमध्ये नुकसान टळले
कोरोना संकटाच्या काळात शेतमाल विक्रीचा मोठा प्रश्न तयार झाला. अनेक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला. वीर बंधूंनी मात्र आपले ग्राहक तयार केलेले असल्याने या काळात आपले नुकसान टाळणे त्यांना शक्य झाले. दरांमध्येही त्यांनी फरक केला नाही.
ग्राहक आणि दरही निश्चित
दर महिन्याला एकूण मिळून सुमारे १०० किलो उत्पादन 
शेवगाव हे तालुक्याचे ठिकाण वीर बंधूंच्या शेतापासून काही किलोमीटरवरच आहे. 
 त्यामुळे ते उत्पादित करीत असलेला शेतमाल सेंद्रिय असल्याची खात्री इथल्या ग्राहकांना झाली आहे. त्यामुळे बहुतांश ग्राहक निश्चित आहेत. त्यांची संख्या सुमारे ५० ते ६०.  
अनेक ग्राहक थेट शेतातून खरेदी करतात. 
मोबाईलवरून मागणी नोंदवल्यास घरपोच भाजीपाला दिला जातो. वर्षाला निश्‍चित केलेले दर- (त्यात फारसा फरक होत नाही.)
फळभाज्या- प्रति किलो ६० रुपये. 
पालेभाज्या- प्रति जुडी- १० ते १५ रुपये 
वर्षभरात उत्पादन खर्च जाऊन विक्रीच्या सुमारे पंचवीस टक्के नफा  
त्यातून आर्थिक प्रगतीला साह्य झाले आहे.

Edited By - Kalyan Bhalerao

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com