कमी पावसाच्या प्रदेशात रुजल्या अंजिराच्या बागा

Fig
Fig

औरंगाबाद जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांच्या शिवारात अनेक वर्षांपासून अंजीर बागा रुजल्या आहेत. अब्दीमंडी येथील एकाने अफगाणिस्तानातून आणलेल्या रोपट्याचा हा विस्तार झाल्याचे जाणकार सांगतात. पावसावर आधारीत शेती असलेल्या इथल्या शेतकऱ्यांचे अर्थकारण कमी पाणी लागणाऱ्या अंजिराने सक्षम केले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद हे ठिकाण ऐतिहासिक किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथली काही गावांमध्ये अनेक वर्षांपासून रुजलेल्या अंजीर बागांसाठी देखील हा भाग नावारूपाला आला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अब्दिमंडी येथील नसीब खा युसुफ खा पठाण इथल्या अंजीर संस्कृतीचा इतिहास उलगडतात. ते सांगतात की आजोबा आलम खा पठाण यांनी अंजिराचे कलम थेट अफगाणिस्तानातून औरंगाबादेत आणले. विविध फळपिकांची विविधता आपल्या बागेत असावी हा उद्देश होता. वडिलांनी हा वसा जपला. आता ३४ वर्षांपासून तो पुढे चालवीत आहोत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

क्षेत्र विस्तारले
आता दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अब्दीमंडीलसह, दौलताबाद, केसापुरी, रामपुरी, जांभाळा, माळीवाडा, फतियाबाद, वंजारवाडी, शरणापुर, आप्पाचीवाडी आदी गाव, वाड्या, वस्त्यांच्या शेतशिवारात दीडशे हेक्‍टरहून अधिक क्षेत्र विस्तारले असल्याचा अंदाज अंजीर उत्पादक व्यक्त करतात. 

संकटातही जपली अंजिराची गोडी 
या भागातील हवामान अंजीरासाठी अनुकूल आहे. शिवाय पावसावर आधारीत शेती असल्याने कमी पाणी लागणाऱ्या या फळाचा विस्तार होण्यास वेळ लागला नाही. अन्य ठिकाणच्या तुलनेत या भागातील  अंजिराची गोडी, त्याचा भरीवपणा, वजन, गोल आकार ग्राहकांना भूरळ पाडल्याशिवाय राहवत नाही. येथील अंजीर उत्पादकांना फळपीक विम्याचा आधार नाही. एखादा-दुसरा अपवाद वगळता दुष्काळात बागा गेल्या तरी अनुदानरुपी मदत मिळाली नाही. तरीही उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारे दर व अर्थकारणाला मिळत असलेले बळ यातून बागा जपण्याचे शर्थीचे प्रयत्न इथल्या अंजीर उत्पादकांनी केले आहेत.

अंजीर उत्पादकांच्या अपेक्षा

  • नवतंत्रज्ञान उत्पादकांपर्यंत पोचावे 
  • अंजीर क्लस्टर निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावे
  • विमा संरक्षण मिळावे
  • परिसरात जलसंधारणाची कामे व्हावी
  • आर्थिक आधार मिळावा

दौलताबाद अंजीर शेती- ठळक बाबी 

  • पूर्वी १५ बाय १५ फूट लागवड, आता १८ बाय १८ फूट, १० बाय १० फूट असेही प्रयोग 
  • आब्दिमांडी येथे ८ ते १० जण कलम निर्मितीत व्यस्त. सुमारे २० ते २५ रुपये प्रति कलम दर. 
  • जालना, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये इथल्या कलमांना मागणी
  • नसीब खा पठाण यांच्याकडून वर्षाला ३० ते ३५ हजार कलमांची निर्मिती 
  • ते म्हणाले की पूर्वी कलम तयार होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागायचा. काडी कट करून बुरशीनाशकाची प्रक्रिया केली जायची. यात ३० ते ५० टक्क्यापर्यंत कलमांची शाश्वती असायची. आता नवी माहिती घेत व कल्पकतेतून कमी वेळेत कलमे तयार करण्याचं तंत्र अवगत केलं. शिवाय रोपे जगण्याचं प्रमाणही वाढलं आहे. . 
  • खट्टा व मीठा असे दोन्ही बहार घेण्यावर भर.

आमच्या भागातील अंजिराची गोडी अति उत्तम आहे. आतून भरीव असलेल्या या फळाला ज्यूस सेंटर व्यावसायिकांकडून मोठी मागणी असते.
विठ्ठल विष्णूजी धनाईत
- अंजीर उत्पादक, अब्दीमंडी 

माझी ३६ गुंठे बाग आहे. बाग जपण्यासाठी कायम पाणी संकटाला तोंड द्यावे लागते. या पिकातील नवे संशोधन व तंत्रज्ञान आमच्यापर्यंत पोचले तर आम्हाला अजून प्रगती करता येईल. 
- सुनील लिंभारे, अब्दिमंडी 
  
पाच वर्षांपासून अंजिराची शेती करतो. या पिकामुळे  दौलताबाद व अब्दी मंडी परिसरातील अनेकांना रोजगार मिळाला आहे. शेतकरी एवढ्या कष्टातून जपत असलेल्या बागांचे क्लस्टर निर्माण होणे गरजेचे आहे. 
- विलास खंडागळे, ९४०३१२५६१९ , अब्दीमंडी

रोजगार व विक्री व्यवस्था
परिसरातील दीडशे ते दोनशे जणांना विक्रीच्या माध्यमातून रोजगार देण्याचे काम इथली अंजीर शेती करते आहे. औरंगाबाद हे मार्केट आहे. त्याचबरोबर अनेक व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. त्याची औरंगाबाद, नाशिक व अन्य शहरांमध्ये विक्री करतात. किलोला २५, ३५ ते ४० व कमाल ६० रुपये दर मिळतो. खर्च जाऊन वर्षाला सुमारे दोन लाख रुपये हाती येतात. 

- नारायण अप्पा लिंभारे, ९८६०४४७३३५ 
- नसीब खा युसुफ खा पठाण, ८३२९०९८८३९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com