इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रयोग

इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रयोग

सन १९७८ च्या सुमारास उजनी धरणात पाणी अडविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर इंदापूरसह दौंड, करमाळा आदी तालुक्यांतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले. त्यामुळेच बहुतांश शेतकरी ऊसपिकाकडे वळले. त्यात स्थिरही झाले. पण, पुढे काळ व बाजारपेठ बदलू लागली. वेगवेगळ्या पिकांचे महत्त्व वाढले. औद्योगिकदृष्ट्याही महत्त्वाची पिके शेतकऱ्यांना खुणावू लागली. त्यातच माती, पाणी, दर या सर्वच बाबतीत ऊसशेती परवडेनाशी झाली.

शतावरीचा प्रयोग
इंदापूर तालुक्यातील कांदलगाव येथील वसंत किसन जाधव हे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. हे गाव उजनी धरणाच्या काठावरच आहे. त्यामुळे तेथे पाण्याची मोठी उपलब्धता आहे. जाधव यांची १२ एकर शेती आहे. त्यात प्रामुख्याने ते ऊस घेत. सन २०१० मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ शेती करण्यास सुरुवात केली. उसातून एकरी पन्नास टन उतारा, तर उत्पन्न सुमारे पन्नास हजार रुपये मिळायचे. मग त्यांनी उसाला पर्यायी पिकाचा शोध सुरू केला. त्यासाठी कृषीसंदर्भातील पुस्तकांचे वाचन, चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतला. सन २०१६ मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना शतावरी पिकाबद्दल माहिती मिळाली. पुणे येथील एका कंपनीशी त्यासंबंधाने संपर्कही झाला. कंपनीविषयी सर्व खात्री, या पिकाचे अर्थकारण आदी सर्व माहिती घेतली. त्यानंतर कंपनीसोबत करार करून सुमारे साडेचार एकरांवर लागवडही केली. 

जोखीम...
जाधव म्हणाले की, कंपनीशी लेखी करार केला आहे. कंपनीचा प्लॅंटही मी पाहिला आहे. शतावरीची काढणी त्यांच्याकडेच असते. हमीभावही देतात. हे सगळे असले, तरी कोणत्याही शेतकऱ्याने शतावरीचा प्रयोग करण्यापूर्वी लागवड, विक्री, मार्केटिंग, व्यापारी असा सर्वांगीण विचार करावा. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्याशिवाय पुढे जाऊ नये. जाधव पुढे म्हणाले की, मीदेखील शतावरीच्या विक्रीसाठी विविध व्यापाऱ्यांच्या संपर्कात आहे. पर्यायी बाजारपेठ आपल्याला माहीत हवीच.  

  रक्तचंदन व थायलंड चिंच
शतावरीच्या प्रामुख्याने मुळांचे उत्पादन घेतले जाते. त्यात जाधव यांनी योग्य नियोजन करून रक्तचंदन व थायलंडची चिंच यांचे आंतरिक पीक घेतले आहे. चिंचेपासून सुमारे पाच वर्षांनंतर उत्पादन सुरू होईल. रक्तचंदन हे संबंधित कंपनीलाच देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जाधव यांना पत्नी आशालता, मुलगा पद्मसिंह, सून अर्चना यांची शेतीत मोठी मदत होते. 

शतावरी प्रयोगातील ठळक बाबी
जाधव म्हणाले की, ज्या कंपनीसोबत करार केला आहे; त्यांनी प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. आमच्या दोघांमध्ये ऑनलाइन लेखी करार झाला आहे. प्रतिकिलो ५० रुपये असा हमीभाव ठरला आहे. रोपे कंपनीनेच पुरवली आहेत. पांढरी व पिवळी शतावरी, असे दोन प्रकार माझ्याकडे आहेत. पैकी पांढऱ्या शतावरीची दोन हार्वेस्टिंग पूर्ण झाली आहेत. पहिल्या वेळी एकरी साडेपाच टन, तर दुसऱ्या वेळी सहा महिन्यांनी आठ टनांपर्यंत उत्पादन मिळाले. कंपनीने जागेवरच त्याचे पेमेंट केले आहे.

या पिकास आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते. पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. ठिबकद्वारे पाणी देण्यात येते. एकरी सुमारे ५० हजार रुपये उत्पादन खर्च आला आहे. या पिकापासून सुमारे वीस वर्षांपर्यंत उत्पादन मिळत राहते. एकरी सुमारे हजार झाडे आहेत. प्रतिझाड सुमारे सहा किलोपर्यंत उत्पन्न मिळते. शतावरी ही औषधी वनस्पती आहे. त्यामुळे त्यास वैद्यकीयदृष्ट्या व औद्योगिकदृष्ट्या मागणी आहे. 

रांधवन यांनी निवडला लिंबाचा पर्याय 
भिगवण स्टेशन (ता. इंदापूर) येथील रांधवन कुटुंबीयांची वडिलोपार्जित पन्नास एकर शेती आहे. विजय व संजय या रांधवन बंधूंनी पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करण्यापेक्षा पूर्णवेळ शेतीच करण्याचा निर्णय घेतला. प्रामुख्याने उसाचीच लागवड केली जायची. हवामान, दरांमधील चढउतार, याचा सातत्याने शेतीला फटका बसायचा. यावर सखोल चर्चा करून विविध पिकांचा विचार केला. त्यात लिंबाची निश्‍चिती केली. ही बाब विचारात घेऊनच शाश्वत व नियमित उत्पन्नासाठी लिंबाचे पीक त्यांनी निवडले. शेतीत नियमित भांडवलाची गरज असते. हे पीक नियमित उत्पादन व उत्पन्न देऊ शकते. त्याला वर्षभर मागणी असते. त्यादृष्टीने तीन वर्षांपूर्वी अडीच एकरांत लिंबांची लागवड केली. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून साई सरबती जातीची रोपे आणली. पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा अवलंब केला आहे.  

आश्‍वासक पीक 
शेती उजनी धरणापासून जवळ असल्यामुळे शाश्वत पाणी उपलब्ध आहे. सुरवातीला पारंपरिक ऊस तसेच रब्बी व खरिपाची पिके घेतली जायची. आता मात्र लिंबाचे पीक त्या तुलनेत आश्‍वासक वाटू लागले आहे. योग्य व्यवस्थापनातून हे पीक सुमारे तीस वर्षांपर्यंत चालते. उसापासून उत्पन्न मिळण्यास किमान पंधरा ते अठरा महिन्यांचा कालावधी लागतो. त्या तुलनेत लिंबू वर्षातून दोनवेळा उत्पन्न देऊ शकतो. आठवडयास अडीच ते तीन क्विंटलपर्यंत तर महिन्याला दहा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत आहे. सध्या उन्हाळ्यामुळे दरही चांगले म्हणजे किलोला ४० ते ६० रुपयांपर्यंत आहेत.  

आंतरपिकांचा आधार 
लिंबाचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होण्याच्या कालावधीपर्यंत कांदा, हरभरा, भुईमूग, मूग, मटकी आदी आंतरपिके घेतली. त्यापासून बराचसा खर्च निघून गेल्याचा अनुभव आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com