नागपूर : राज्यात यावर्षी बीजी-२ तंत्रज्ञानावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या तक्रारी वाढीस लागल्या आहेत. बोंडअळीची प्रतिकारशक्ती वाढीस लागल्याने हे घडल्याचा दावा केला जात आहे. सरकारने याची गंभीर दखल घेत असे वाण बाजारात आणणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाईची तयारी चालविली आहे. त्याकरिता कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांकडून एका प्रपत्रात माहिती भरून घेतली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यात बीटी वाणांवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी फवारणी केली. त्यामुळे विषबाधा होत २२ जणांचे बळी गेले तर ४०० पेक्षा अधिक बाधित होत; त्यांच्यावर उपचाराची वेळ आली. त्यानंतरही बोंडअळी नियंत्रणात आली नाही. याची सरकारने गंभीर दखल घेत बोंडअळीला लवकर बळी पडणारे वाण विकसित करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाईची तयारी चालविली आहे. सोमवारी (ता. १३) मुंबईत झालेल्या बैठकीत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी या संदर्भाने निर्देश दिल्याची माहिती आहे.
या बैठकीला राज्यातील विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते. कृषी विभागदेखील दुकानातून विकल्या गेलेल्या बीटी बियाण्यांविषयी माहिती संकलनाचे काम आपल्या स्तरावर करणार आहे. या माध्यमातून बीटी बियाणे कंपन्यांची चौफेर घेराबंदी करण्याच्या विचारात सरकार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कृषी सहायक प्रपत्र भरून घेणार
ज्या शेतकऱ्यांच्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यांच्याकडून कृषी सहायक नमुना जी (नियम १२ (१) नुसार प्रपत्र) भरून घेणार आहेत. बियाणे कोठून खरेदी केले, लॉट क्रमांक, किती एकरावर लावले, उगवणशक्ती अशी माहिती त्यावर शेतकऱ्याला द्यावी लागेल. पिकाच्या झालेल्या हानीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि योग्य अशा नुकसानभरपाईची व्यवस्था करण्यासाठी माझ्या शेताचे निरीक्षण करावे, अशी विनंतीदेखील या प्रपत्रातून केली जाणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.