सेंद्रिय शेती आरोग्याची गरज!

सेंद्रिय शेती आरोग्याची गरज!

बदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके तसेच खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत गेला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीचा पर्याय पुढे येत आहे. विशेषतः युरोप व संयुक्त राष्ट्रसंघातील देश हे सेंद्रिय शेतीविषयी अधिक जागरूक असल्याचे दिसून येते. कारण तेथील शेतकऱ्यांची, ग्राहकांची व सरकारी राज्यकर्त्यांची सेंद्रिय शेतीविषयी असलेली सकारात्मक मानसिकता आदर्शवत आहे. पर्यावरणीय व आर्थिक अशा दुहेरी हेतूने सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. हे लक्षात घेता सेंद्रिय शेतीचे संशोधन, प्रशिक्षण, प्रमाणीकरण, शेतमालाचे मूल्यवर्धन, विकास या बाबींना प्राधान्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांत रासायनिक कीटकनाशकांच्या सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये दिसू लागले आहेत. त्याचा परिणाम मानवी आणि पाळीव प्राण्यांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. दुसऱ्या बाजूला मित्रकीटक, परागीभवन करणाऱ्या मधमाशांची संख्यासुद्धा कमी होत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या माध्यमातून घेतलेल्या पिकांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याची बाब काही सर्वेक्षणानंतर पुढे आली आहे. यासर्व प्रकाराला पायबंद घालण्यासाठी सेंद्रिय आणि रासायनिक अवशेषमुक्त शेती करण्याचे आवाहन केले जात आहे. ही बाब आता शेतकऱ्यांनासुद्धा पटू लागल्याने ते देखील सेंद्रिय शेतीच्या लागवडीकडे वळू लागल्याचे चित्र आहे. 

१९६० च्या दशकात जी हरित क्रांती झाली त्यात अन्नधान्यात देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु त्यात रासायनिक खते तसेच कीडनाशकांचा वापर किती करावा हे ज्ञान मात्र शेतकरी वर्गाला मिळालेले नाही. त्यामुळे यांचा बेसुमार वापर देशात होत असून पाणी, हवा, शेतमाल उत्पादने स्वच्छ राहिली नाहीत. या सर्व बाबींचा विचार करता सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे हाच एक मार्ग आहे.

बदलत्या काळात शेतीमध्ये नवनवे प्रयोग होत आहेत. अनेकदा संकरित बियाणे, रासायनिक कीडनाशके, खतांची निर्मिती झाली. उत्पादन वाढविण्यासाठी खतांचा तसेच कीटकनाशकांचा अमर्याद वापर होत गेला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. शिवाय रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. या सर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीचा पर्याय पुढे येत आहे. शेतकऱ्यांनी स्वत:च्या तसेच राष्ट्राच्या हिताचा विचार करून सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आणि सर्वांच्याच फायद्याचे आहे. 

संपूर्ण जगभरातूनच आता सेंद्रिय पद्धतीने पिकविलेले अन्नधान्य, फळे, भाजीपाला औषधी वनस्पती, सेंद्रिय दूध आदी खाद्य पदार्थांना मागणी वाढत आहे. कारण रासायनिक खते, कीटकनाशके व अन्य औषधे यांचा अतिवापराने शेतमाल दिसण्यास आकर्षक असला तरी प्रकृतीस हानिकारक ठरतो हे ग्राहकांच्या लक्षात येत आहे. तसेच या रसायनांचा वापर शेतजमीन, पाणी, हवा परिसर यांनाही खराब करतो. प्रदूषणांच्या या दोषांमुळे रसायनाचे उर्वरित अंश नसलेला शेतमाल व दूध वापरावे असा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि अन्न व कृषी संघटना (एफएओ) यांनीसुद्धा यात लक्ष घातले आहे. परंतु, अजून आपल्याकडे स्वास्थ व आरोग्यविषयाबाबतची जागरूकता म्हणावी इतकी आलेली दिसत नाही. त्यामुळे स्थानिक स्तरावर सेंद्रिय मालाला जो मोबदला मिळायला हवा आहे, तो मिळत नाही. सेंद्रिय भाजीपाला व फळे रासायनिक मालाच्या तुलनेत कमी आकर्षक असल्याने सामान्य व मध्यम ग्राहकवर्ग रासायनिक निविष्ठांचा वापर केलेल्या शेतीमालाला पसंती देताना दिसतो. राज्यात सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती मिळत नाही. दर्जेदार, प्रमाणित सेंद्रिय निविष्ठांची सर्वत्र वानवा असून, यात शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक होत आहे. अशा निविष्ठांच्या वापरामुळे शेतमालाचे उत्पादन आणि दर्जाही घटत आहे. 

भारत सरकारनेही याविषयी शेतकरी, व्यापारी यांना साह्यकारी ठरेल अशा उपाययोजना सुरू केल्या आहेत. राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. या मिशनच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासोबतच त्यातील शेतमालाच्या वितरणासाठी व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचेही ठरले आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतून योजना अंमलबजावणीस सुरवात करून त्यानंतर राज्यांतील इतर जिल्ह्यांत सेंद्रिय शेतीच्या व्याप्तीचे नियोजन आहे. भारताला या क्षेत्रात मोठा वाव आहे मात्र युरोप, अमेरिका आदी प्रगत देशांतून प्रचंड मागणी असली तरी तेथील तपासणी ही कडक आहे. सेंद्रिय पदार्थांचे परिक्षण करणे व त्यांना तसे प्रमाणपत्र मिळवून देणे, त्यांचे वर्गीकरण, निरीक्षण करणे याची काही कार्यपद्धती व मानके निश्चित केली आहेत. येथील वेगवेगळ्या प्रकारच्या हवामानामुळे सर्व प्रकारची सेंद्रिय उत्पादने घेता येणे शक्य आहे. तसेच पूर्वापार शेतीची पद्धत सेंद्रियच राहिली आहे. त्यामुळे घरगुती व निर्यात बाजारपेठेतून मोठ्याप्रमाणात फायदा घेता येईल. जगात सेंद्रिय शेती करणाऱ्या मोठ्या देशांच्या क्रमवारीत भारत दहाव्या स्थानावर आहे. विशेषतः युरोप व संयुक्त राष्ट्रसंघातील देश हे सेंद्रिय शेतीविषयी अधिक जागरूक असल्याचे दिसून येते. कारण तेथील शेतकऱ्यांची, ग्राहकांची व सरकारी राज्यकर्त्यांची सेंद्रिय शेतीविषयी असलेली सकारात्मक मानसिकता आदर्शवत आहे. सेंद्रिय शेती ही संकल्पना पर्यावरणीय बाबीशी निगडित असणारी आहे. त्यामध्ये चालू व भविष्यकालीन पिढीला शाश्वत जीवन देणे हा सामाजिक जबाबदारीचा हेतू आहे. पर्यावरणीय व आर्थिक अशा दुहेरी हेतूने सेंद्रिय शेतीचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे. हे लक्षात घेता सेंद्रिय शेतीचे संशोधन, प्रशिक्षण, प्रमाणीकरण, शेतमालाचे मूल्यवर्धन, विकास या बाबींना प्राधान्य देऊन सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे.

९७३०४७३१७३
(लेखक शेती अर्थशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com