कमी खर्चिक देशी कुक्कुटपालनाने उंचावले शेती अर्थकारण

Poultry-Farm
Poultry-Farm

वाशीम जिल्ह्यात रिसोड येथील डिगंबर (खंडूभाऊ) मोतीराम इरतकर यांनी सोयाबीन, भाजीपाला शेतीतून उत्पन्नाचा मार्ग शोधला. मात्र एवढ्यावरच न थांबता गायी-म्हशींचे पालन, जागेवरच दूध विक्री यातून उत्पन्नाचा पर्याय वाढवला. त्यात अजून भर टाकताना दोनशे गावरान व त्यातही कडकनाथ कोंबडीचे पालन करून अंडी व कोंबडी विक्रीतून ताजे उत्पन मिळवण्यास सुरवात केली आहे.

वाशीम जिल्ह्यातील रिसोड हे महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण आहे. सोयाबीन हे भागातील मुख्य पीक. येथील डिगंबर (खंडूभाऊ) मोतीराम इरतकर यांची केवळ चार एकर शेती आहे. त्यात ते पारंपरिक सोयाबीन-तूर या पिकांसोबतच भाजीपालावर्गीय पिके घेतात. अल्पभूधारक असले तरी उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत उभे करून आपली शेती अधिकाधिक नफ्याकडे नेण्याचा प्रयत्न त्यांचा सतत सुरू असतो. 

गावरान कुक्कुटपालन
इरतकर कुटुंब  अनेक वर्षांपासून परसबागेत गावरान कोंबड्यांचे पालन करीत अाहेत. पाच वर्षांपूर्वी त्यांचा जवळच्या करडा कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क अाला. येथील तज्ज्ञांनी त्यांना कडकनाथ कोंबडीपालन व त्याचे फायदे, अर्थकारण समजावून दिले. मग या कोंबड्याची २० अंडी अाणून व्यवसाय सुरू झाला. कोंबड्यांची पैदास सुरू झाली. आज त्यांच्या कुक्कुटपालनाचा प्रमुख जोर कडकनाथ कोंबडीवरच अाहे. वीस कोंबड्यांच्या आज २०० कोंबड्या झाल्या अाहेत. कडकनाथसह गिरीराज, वनराज, गावरानी आदींची मिळून त्याहून अधिक संख्या अाहे. 

दररोज ताजा पैसा 
छोट्याशा कुक्कुटपालनातूनही पैसा खेळता राहू शकतो हे इतरकर 
यांच्या शेताला भेट दिल्यानंतर दिसून येते. त्यांना या व्यवसायात दररोज सातशे ते एक हजार रुपये व काही वेळा त्याहून अधिक रक्कम मिळवण्याची संधी प्राप्त होते. 

जागेवरच मिळते उत्पन्न 
विशेष म्हणजे इतरकर यांना जागेवरच उत्पन्न मिळते. विक्रीसाठी बाहेर जाण्याची गरज पडत नाही. दररोज सुमारे ९० ते १०० अंड्यांचा खप होतो. ग्राहक शेतावर किंवा घरी येऊन अंडी वा कोंबड्या घेऊन जातात. 

दर
कडकनाथ कोंबडीचे अंडे नगाला ३५, ४० ते ५० रुपयांना तर अन्य गावरान अंडे १५ रुपयांना विकले जाते. कडकनाथ जातीला मागणी व दरही चांगला असल्याने जास्त फायदा होतो. सहा महिने वयाची कडकनाथ जोडी ४००० रुपये दराने दिली जाते. 

देखभाल खर्च कमी 
रिसोड शहरापासून दोन किलोमीटरवरच इतरकर यांचे शेत अाहे. त्यातच उपलब्ध स्रोतांचा वापर कोंबडीपालनात केला आहे. कुठलाही अधिकचा खर्च केला नाही. कोंबड्यांना खाद्यासोबतच हंगामानुसार मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर, टोमॅटो असा घरचा भाजीपाला दिला जातो. इतरकर यांचे रिसोडमधील अडतीव्यतिरिक्त भाजीपाला विक्री केंद्रही अाहे. भाजीपाला स्वस्त असेल त्या वेळी तसेच दररोजच्या विक्रीतून शिल्लक भाजीपालादेखील कोंबड्यांना दिला जातो. भाजीपाल्यातून कोंबड्यांना भरपूर पोषणमूल्ये मिळत असल्याने फायदाच होतो. बाहेरून खाद्य आणण्याच्या खर्चातही यामुळे बचत होते. 

कडकनाथ संगोपनाचा फायदा 
    इतरकर म्हणाले की कडकनाथ कोंबडी काटक असते. तिची मरतूक अत्यंत कमी होते. रोगांचे प्रमाण अत्यंत कमी असते. 

चार एकरांतील पद्धतशीर नियोजन 
इरतकर यांचे रिसोड येथे अडतीचे दुकानही आहे. त्यामुळे उत्पन्नाचा तो स्रोत आहेत. शिवाय स्वतःला भाजीपाला पिकविण्यातून दररोज ताजे उत्पन्न घरी यायलाही त्यामुळे मदत होते. मात्र केवळ शेतीवर अवलंबित्व न ठेवता मुख्य भर अाता पूरक व्यवसायांवर स्थिरावला अाहे. शेतीला दुग्ध व्यवसाय व गावरान कुक्कुटपालन अशी जोड देत इरतकर यांची घौडदौड सुरू अाहे.

शेती, पूरक व्यवसाय आणि फायदे 
 इतरकर यांच्याकडे दोन गीर गायी, तसेच म्हशी आहेत. दररोज २० ते २५ लिटर एकूण दूध संकलन होते. देशी गायीच्या तसेच म्हशीच्या दुधाची विक्री ६० रुपये प्रतिलिटर दराने होते.
 ग्राहक घरी येऊनच दूध घेऊन जातात.
 कोंबडीखत, शेणखताचा वापर शेतीत होतो. त्यामुळे शेतीचा दर्जा सुधारला आहे. 
 गोमूत्राचे दररोज संकलन करून पिकांवर फवारणी घेतली जाते. 
 खरिपात सोयाबीन, तूर अाणि रब्बीत गहू, मका, ज्वारी ही पिके घेतली जातात. त्यामध्ये सेंद्रिय घटकांचा वापर होत असल्याने रासायनिक निविष्ठांच्या खर्चात बचत झाली आहे. 
 वर्षभर भाजीपाला पिकवला जातो. मेथी, शेपू, पालक, कोथिंबिरीचे दर्जेदार उत्पादन घेतले जाते. त्यातून सतत उत्पन्न मिळते. 
 येत्या काळात शेड उभारून कुक्कुटपालनाचा विस्ताराचे नियोजन. 
 उपलब्ध साधनांचा वापर करीत कमी खर्चात व्यवस्थापन.
 शेतीच्या कामासाठी खिलार बैलजोडी.
 बदक जोड्यांचेही पालन .

तज्ज्ञांची प्रतिक्रिया 
परसबागेतील कुक्कुटपालन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. दररोज अंडी मिळाल्याने अाहारात त्यांचा वापर होतोच. शिवाय पैसेही मिळतात. आरोग्य पोषणाची गरज पूर्ण होते. कोंबड्यांना भाजीपाला खाऊ घातल्याने बाजारातील खाद्यावरील खर्च कमी होतो. शिवाय कोंबड्यांना भाजीपाल्यातील पोषकघटक नैसर्गिकरीत्या मिळतात. 
- डॉ. डी. एल. रामटेके, विषय विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, करडा, जि. वाशीम

भाजीपाला अडत, विक्री, दूध, कोंबडीपालन या पूरक व्यवसायांमुळे केवळ शेतीवर अवलंबून राहावे लागत नाही. दररोज ताजे उत्पन्न हाती येते. पूर्वी केवळ शेतीतील उत्पन्न जेमतेम होते. अाता शेतीतील उत्पन्नातही वाढ झाली आहे. 
-  डिगंबर इरतकर,  ९४२३३७४४३५ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com