लोकसहभागातून नागरी पर्जन्य जलसंधारण शक्य 

लोकसहभागातून नागरी पर्जन्य जलसंधारण शक्य 

जलसंधारण ही केवळ शेतात किंवा गावामध्ये करायची गोष्ट नव्हे, तर ती शहरांमध्येही करणे आवश्यक आहे. शहरांमध्ये बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा हा पूर्णपणे सरकारमार्फत होत असल्याने लोकांना त्याची निकड वाटत नाही. पाणी मिळविण्यासाठी काही करावे लागते, हेच मुळी समजत नाही आणि थोड्याशा जागरूक लोकांना जाणवले तरी आमच्याकडे कुठेही जागाच नाही अथवा अगदी मर्यादित असल्याने जलसंधारण कुठे आणि कसे करणार, याविषयी शहरी लोकांना प्रश्न पडतात. 

पर्जन्य जलसंधारण  म्हणजे काय करायचं? 
आपल्या इमारतीच्या, आवाराच्या परिसरात पडणारे पावसाचं पाणी केवळ जमिनीत मुरवणं म्हणजे पर्जन्य जलसंधारण असा एक गैरसमज रुजलेला दिसतो. मात्र, हे केवळ भूजल पुनर्भरण झाले. पावसाचे पाणी पावसाळा संपल्यावर आपल्याला वापरता यावे, या हेतूने अडवतो, जिरवतो आणि स्रोतांचे पुनर्भरण करणे याला खऱ्या अर्थाने पर्जन्यजल संधारण म्हणता येईल.            

पावसाचं पडलेलं पाणी त्याच परिसरात योग्य जागी, शास्त्रीय पद्धतीने अडवून जिरवून नंतरच्या काळात वापरण्यासाठी उपलब्ध करून ठेवणे म्हणजे पर्जन्य जलसंधारण.  त्याचे वापरानुसार दोन प्रकार आहेत.  

१. तात्पुरता वापर - पावसाळा चालू असताना, पावसाचे पाणी (साधारण ४-५ दिवस पुरेल इतकं) साठवून ठेवून ते वापरत राहणं.

२. पावसाळा संपल्यावर वापर - पावसाचं पडलेलं पाणी टाकीत, विहिरीत, बोअरवेलमध्ये किंवा इतर ठिकाणी साठवून ठेवून ते पावसाळा संपल्यावर वापरणे.

पर्जन्य जलसंधारण हे शहरात आणि खेड्यांत दोन्हीकडे उत्तम प्रकारे करता येते. 

शहर, नागरी वस्तीतील  जलसंधारण आणि संवर्धन
शहरात पडलेल्या पावसाचे पाणी इमारतींच्या छतावरून पाइपद्वारे खाली असलेल्या (बहुसंख्य ठिकाणी) फरशी किंवा काँक्रीटवरून वाहून पालिकेच्या नाल्याला मिळते. तिथून ते एकत्र होत जवळच्या ओढा, नाले, नदी, खाडी किंवा समुद्र यांना जाऊन मिळते.

पृष्ठभागानुसार पाणी जिरेल की वाहील आणि किती जिरेल किंवा वाहणार हे ठरते. जर मोकळं मैदान किंवा माती असलेली जागा असेल तर पडणाऱ्या पाण्याच्या ५०% जमिनीत मुरते. मात्र, काँक्रीट असल्यास १०% ही पाणी मुरत नाही.  

पूर्वी इमारतीच्या आवारात माती असायची. खूप मैदानं आणि माती असलेल्या मोकळ्या जागा असायच्या. तिथे पाणी जमिनीत मुरल्यानंतर आणि मग आवाराबाहेर जाई. पाणी हळूहळू बाहेर नाल्यापर्यंत पोचायचे. नाले भरून वाहण्यास वेळ लागे. माती कमी किंवा नाहीशी झाल्याने पाणी त्वरित आणि पूर्णपणे नाल्यांत येते. परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. ही स्थिती सध्या शहरभर झाली आहे. त्याला अनधिकृत बांधकामे, रस्ते आणि फुटपाथ, रस्ता दुभाजक करतेवेळी झालेले दुर्लक्ष याबरोबरच नालेसफाईमधील अनियमितता, कचऱ्याची विल्हेवाट लावण्यातील गैरप्रकार वगैरे गोष्टींचा हातभार लागतो. बहुतांश शहरात पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण होते.

याचं दुसरे टोक म्हणजे, पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब अडवायचा आणि जिरवायचा. अगदी समुद्रात पाणी वाया जाऊ द्यायचे नाही इथपर्यंत लोकांचे गैरसमज पसरले आहेत. एकदम दुसरे टोक. निसर्गामध्ये जलचक्र अस्तित्वात असून, त्यातील फेरफारामुळे मोठे नुकसान होऊ शकते. एकीकडे आपल्या कृतीने पृथ्वीचे तापमान वाढवत आहोत. दुसरीकडे, ज्या पाण्यामुळे आणि समुद्रामुळे पृथ्वी थंड राहण्यास मदत होते, त्या समुद्राला पाणी पोचणे म्हणजे वाया जाणे असेही आपण समजतो. पुरेसे गोड पाणी समुद्रात गेले नाही तर जलचक्र बिघडून त्याचा तोटा भविष्यात आपल्यालाच होणार आहे.

काय करता येईल?
    विहीर, बोअरवेल, रिंगवेल यांसारखे स्रोत असतील शक्य तिथे ते वापरा. अगदीच गरज असेल तर नवीन तयार करा. समुद्रसपाटीजवळ शक्यतो कूपनलिका टाळा. प्रत्येक स्रोताचे योग्य पद्धतीने पुनर्भरण नक्की करा.

    जर इमारतीच्या आवारात माती असेल तर किंवा उताराच्या कोपऱ्यात एक तरी शोषखड्डा (recharge pit) बांधून काढा आणि छतावरील पावसाचं पाणी तिकडे वळवा. ते भरल्यानंतर अतिरिक्त होणारे पाणी नाल्यात सोडा.

    आपल्या भागातील भूगर्भ आणि भौगोलिक परिस्थिती जाणकार व्यक्तीकडून जाणून घ्या. (geology & topography). माती किती आहे, उतार कसे आणि कुठे आहेत, रस्ता कुठे आहे, विहीर योग्य की बोअरवेल, आपल्याला पाणी फक्त जिरवायचं आहे की परत वापरायचं आहे अशा गोष्टींचा विचार करा. अनुभवी तज्ज्ञांकडून  उपाययोजना ठरवून त्याप्रमाणे ऐका. आपली स्वतःचे लॉजिक कितीही असले तरी त्यावर विश्वास ठेवू नका.  कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. 

    फक्त बोअरवेल करणं किंवा आलेलं सगळे पाणी त्यात टाकणे हा काही उपाय नाही. आपण समुद्राजवळ आणि साधारण त्याच पातळीवर असल्यास कोणतेही उपाय केले तरी वर्षातून एकदा पाणी काही काळ तरी पाणी साचणार हे लक्षात घ्या.

    आपण करत असलेले उपाय हे पाणी लगेच वाहून जाऊ नये म्हणून आहेत. आपल्याला दिसलं नाही तरी पाणी उताराने जात राहणार ते समुद्राकडेच, हे लक्षात घ्या.  

सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळायचा प्रयत्न करा. आपली ७०% समस्या प्लॅस्टिकची विल्हेवाट करताना होणाऱ्या गैरव्यवस्थापनामुळे आहेत हे लक्षात ठेवा. 

शहरातील बहुतांश भागामध्ये काँक्रिटीकरणावर भर असल्यामुळे जमिनीत पाणी जिरण्यामध्ये अडचणी येतात. त्यातच, पडलेलं पावसाचं पाणी जिरविण्याऐवजी नाल्यांद्वारे पाण्याच्या स्रोतांकडे, शेवटी समुद्राकडे कसे जाईल हेच पाहिले जाते. परिणामी, पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या तर उन्हाळ्यात पाण्याची टंचाईला सामोरे जावे लागते. प्रत्येक इमारतींमध्ये पर्जन्य जलसंधारण केल्यास, परिसरातील विहीर, बोअरवेल  इत्यादी स्रोतांचे पुनर्भरण केल्यास दोन्ही समस्यांवर काही अंशी मार्ग निघू शकेल. लोकसहभागातून पाण्यासाठी स्वयंपूर्ण होता येईल. 

पर्जन्य जलसंधारणाचे फायदे 
अस्तित्वात असलेल्या पाण्याच्या स्रोताचे बळकटीकरण शक्य. 
पाण्याचा दर्जा सुधारतो.
विहीर किंवा बोअरवेल यांचं आयुष्य वाढते.
परिसरात पाणी तुंबणे, पूर परिस्थिती इत्यादी गोष्टी टाळता येतात.
बोअरवेलच्या पाण्यामधील क्षार कमी करता येतात आणि पाणी पिण्यायोग्य होऊ शकते. 
पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत होते. सरकारी यंत्रणेवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागत नाही.

 डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०, (लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com