अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा

अवकाळी पावसाचा पिकांना तडाखा

पुणे  - गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तर हवामानात अचानक बदलही होत आहे. शनिवारी (ता. १३) दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद भागात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीट झाली. यामध्ये कांदा, गहू, बाजरी, डाळीब, आंबा पिकांचे नुकसान झाले. तर जनावरांसाठी साठवलेला चाराही भिजला. 

वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली असून आंब्याच्या कैऱ्या, कांदा, गहू पिकांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले. पुणे जिल्ह्यातील पुणे शहर व परिसरात, पिंपरी-चिंचवड, खेड, भोर, आंबेगाव, जुन्नर या भागांत अवकाळी पावसाने हजेरी लागली. 

वाऱ्यांमुळे पुणे शहराजवळ असलेल्या मांजरी परिसरात झांडाच्या फांद्या तुटल्या. तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेली. लोणी काळभोर येथे एका व्यक्तीवर वीज कोसळली. त्यामुळे किरकोळ दुखापत झाली असून, खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आंबेगावच्या पूर्व भागातील लोणी, धामणी परिसरांतही अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बाजरी, मका, कडवळ या पिकांचे नुकसान झाले.  पिंपरी चिंचवड भागात गारा पडल्या असून, भोर तालुक्यातील कापूरहोळ, नसरापूर, खेडमधील चिंबळी या भागात वळीव पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आंबा, कांदा पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले.  
 
सांगली जिह्यातील इस्लामपूर, शिराळा या तालुक्यांत पाऊस झाला. तर शिराळा तालुक्यात गारपीठ झाली. त्यामुळे आंब्याच्या बागांचे नुकसान झाले. जनावरांसाठी ठेवलेला चाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्न भविष्यात चांगलाच उद्भवण्याची शक्यता आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील पश्चिम भागात वादळी वाऱ्यांने तीन ते चार घरांचे पत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले. सातारा जिल्ह्यातही कराड, वाई, महाबळेश्वर, ओझर्डे, खानापूर, पांडे, बोपेगाव, जोशीविहीर, शिरगाव, किकली, जांब, पाचवड या भागांत दुपारी वादळी वारे व विजांच्या गडगडासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सायंकाळी हवेत काही प्रमाणात गारवा तयार झाला होता. झालेल्या पावसामुळे आंब्याच्या झाडांना नुकतेच लागलेले आंबे, मोहर खाली झडून गेला. तसेच जनावरांसाठी ठेवलेला चाराही काही प्रमाणात प्रमाणात भिजला आहे. 

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव, औरंगाबाद शहर, आडूळ, देवगाव परिसरात वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. त्यामुळे आंब्याची फळे मोठ्या प्रमाणात खाली पडून नुकसान झाले. काही ठिकाणी जोरदार वादळी वारा होता. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.  


अवकाळी पावसाची शक्यता
कर्नाटकाच्या परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र, मध्य महाराष्ट्रातील परिसरात असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती विदर्भाकडे सरकण्याची शक्यता आहे. तसेच अरबी समुद्रावरून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका, मराठवाडा व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. येत्या बुधवारपर्यंत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर आकार निरभ्र राहणार असून उन्हाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे.   


पावसामुळे झालेले नुकसान
मका, कडवळ, कांदा, गहू, बाजरी, डाळिंब, आंबा पिकांचे नुकसान
वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली, फांद्या तुटल्या, घरांवरील पत्रे उडाली
पुणे जिल्यातील लोणी काळभोर येथे वीज पडून एक जखमी
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात गारपिटीने आंबा बागांचे नुकसान
जनावरांसाठी ठेवलेल्या चाऱ्याचे नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com