नगर ः कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना राज्य सरकारकडून सुरू आहेत. यामध्ये सरकारने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतील तिसऱ्या टप्प्यात आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार असून, प्रायोगिक तत्त्वावर पाच केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेत लसीकरण महत्त्वाचे आहे. राज्यात लसीकरणाने वेग घेतला असला, तरी लस पुरेशी उपलब्ध नसल्याने मोहीम राबविताना प्रशासनाला मर्यादा येत आहेत. पहिल्या टप्प्यात "फ्रंटलाइन वर्कर' यांना लसीकरण करण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात 45 ते 60 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. आता तिसऱ्या टप्प्यात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार आहे. हा टप्पा महाराष्ट्र दिनापासून (एक मे) सुरू होत आहे. हे लसीकरण पाच ठिकाणी करण्यात येणार आहे. ही सर्व केंद्रे सुरवातीला शहरी भागात राहणार असून, लसींचा जसजसा पुरवठा वाढेल, तसतसा केंद्रांचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या जिल्हा रुग्णालय व महापालिका हद्दीत केंद्रे राहणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
सात दिवसांचा साठा उपलब्ध
जिल्ह्यात पाच लसीकरण केंद्रांवर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी दहा हजार लसींचा पुरवठा झाला असून, तो सात दिवस वापरता येणार आहे.
नोंदणी करणाऱ्यांचे लसीकरण
अठरा ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. ज्यांची नोंदणी होणार आहे, अशांनाच या मोहिमेत प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.