अहमदनगर, ता. २९ ः राज्यात सध्या पाच हजार २०० पोलिसांची भरती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लेखी परीक्षा आणि मैदानी चाचणी झाली आहे. पात्र उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात राज्यात सात हजार २०० पोलिसांच्या भरतीसंदर्भातील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या भरतीप्रक्रियेला प्रारंभ केला जाईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
वळसे पाटील यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक कार्यालयात ई-टपाल प्रणालीचे उद्घाटन व वृक्षारोपण करण्यात आले. त्यांनी जिल्हा पोलिसांची आढावा बैठक घेतली. नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक अनिल कटके आदी उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, की जिल्ह्यातील पोलिसांनी सर्वसामान्यांना न्याय कसा मिळेल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करावे. माहिती- तंत्रज्ञानाचा वापर केल्या जाणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या गुन्ह्यांकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा पोलिसांना दिल्या. जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या ई-टपाल प्रणालीचे काम चांगले आहे. भविष्यात राज्यातही हा प्रयोग राबविण्यास त्यांनी सांगितले.
पोलिस ठाणी-वसाहतींना निधी
गेल्या अनेक दिवसांपासून नेवासे, राहुरी आणि पाथर्डी पोलिस ठाण्यांसाठी इमारतीचा विषय प्रलंबित होता. त्याला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाणी, चौक्या व पोलिसांसाठीच्या वसाहतींचे प्रस्ताव आले आहेत. त्यामध्ये लक्ष घालून निधी देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन वळसे पाटील यांनी दिले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.