खंडित वीजपुरवठ्याला कायमचा बाय बाय, नगरच्या शेतकऱ्यांनी शोधला हा पर्याय

Agriculture in Nevasa on solar energy
Agriculture in Nevasa on solar energy

नेवासे : नगर जिल्ह्यात तब्बल एका हजार 309 शेतक-यांनी आपल्या शेतात सौर ऊर्जा निर्मितीचे पॅनल बसविले आहेत. यातून निर्माण होणाऱ्या विजेचा वापर करून विहिरीतील पाण्याचा सौर ऊर्जा पंपाद्वारे उपसा केला जात आहे.

खंडित वीजपुरवठ्याला सौर ऊर्जेचा पर्याय मिळाल्याने शेतीतील उत्पन्न वाढीसही मदत होत आहे. सौरऊर्जा पंपासाठी नगर जिल्ह्यातून तब्बल 7 हजार 365 शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. 

सततची दुष्काळी परस्थिती, सतत खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने जलस्त्रोतांची पाणी पातळी वाढली आहे. रब्बीसाठी पाणी उपलब्ध असले तरी पाणी उपशासाठी खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न ग्रामीण भागात नेहमीच उपस्थित होत असतो. 

बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील रोहित्र जळाल्यानंतर महिना-दोन महीने अनेक कारणामुळे रोहित्र मिळत नाहीत, मोठी थकबाकी असल्याने अशी परिस्थिती पाहायला मिळते. ज्या शेतात रोहित्र आहेत. त्या शेतक-यांना भारनियमानाचा सामना करावा लागतो. 

पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात ठाण मांडावी लागते. अशातच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी योजना सुरू झाल्यापासून (2019) शेतातील विहिरीवर मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून पंप बसविण्यासाठी सुमारे 7 हजार 365 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यातील दोन हजार 145 प्रकरणे मंजूर झाली. एक हजार 450 मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात एक हजार 309 शेतकऱ्यांचे सौर ऊर्जा पंप प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. 
अनेक शेतकर्यांकडून या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करतांना उताऱ्यासवर पाण्याच्या स्त्रोताची नोंद नसणे, सामाईक क्षेत्रासाठीचा ना हरकत दाखला न जोडणे, चुकीचा सात-बारा जोडणे, चुकीचे आधारकार्ड जोडणे अशा अनेक चुका होत असल्याने सुमारे तीन हजार 608 प्रकरणे नामंजूर झाली आहेत. 

1720 शेतकऱ्यांनी पैसे भरले 
मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप योजनेंतर्गत 1720 शेतकयांनी सौर ऊर्जा पंपासाठी ऑनलाईन अर्ज करून पैसे भरले आहेत. टप्प्या-टप्याने पंप वाटप केले जात आहेत. 3 एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील 10 टक्के म्हणजे 16 हजार 880 रुपये भरावे लागतात. तर मागासवर्गीय व एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना 5 टक्के रक्कम भरावी लागते. अहमदनगर


"मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या सौरऊर्जा पंपाला शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे. वीजवितरणही तत्काळ सेवा देते. मात्र, ऑनलाईन अर्ज भरतांना शेतकऱ्यांकडून होणाऱ्या अनेक त्रुटींमुळे प्रकरण मंजुरीस अडथळा येतो. शेतकऱ्यांनी अर्ज भरतांना संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्याची काळजी घ्यावी. 
- संतोष सांगळे, अधीक्षक अभियंता, वीज वितरण, नगर जिल्हा. 


"एक वर्षापूर्वी मी शेतात सौरऊ्जा पंप बसविला आहे. पाणी टंचाई वगळता इतर काळात सकाळपासून सायंकाळपर्यंत पंपाद्वारे पिकांना पाणी दिले. त्यामुळे उत्पन्न वाढीस मदत झाली असून, भारनियमनातून मुक्तता झाली आहे. 
- मुकुंद दरंदले, युवा शेतकरी, तेलकूडगाव, ता. नेवासे 
 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com