नगर ः शहरातील उड्डाणपुलाच्या कामासाठी आता संरक्षण खात्याकडून आठ दिवसांत परवानगी मिळणार आहे. त्यासाठी आपण संरक्षण खात्यातील प्रमुखांना भेटून चर्चा केली. त्यामुळे उड्डाणपुलासाठी असलेली संरक्षणची अडचण दूर झाली आहे. भूसंपादनापोटी लष्कराला पैशांऐवजी त्यांच्या हद्दीत असलेली चार कोटींची कामे करून द्यावी लागणार आहेत. लॉकडाउनमुळे आपण दिल्लीला जाऊ शकलो नाही. दिल्लीला गेलो असतो, तर उड्डाणपुलाच्या कामाची वर्कऑर्डरच घेऊन आलो असतो, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - अवघा तालुकाच होणार क्वारंटाइन जामखेडमध्ये
पत्रकार परिषदेत बोलताना विखे पाटील म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनसंबंधी वेळोवेळी योग्य निर्णय घेतले त्यामुळे देश वाचला आहे. त्यांचा लॉकडाउन करण्याचा उद्देश कोरोना संपविण्याचा नव्हता, तर लांबविण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले होते. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे वेगळी स्थिती होती. ती तयारी लॉकडाउनच्या काळात करून सोयी-सुविधा उभारण्यात आल्या.
के के रेंज प्रश्नी न्यायालयात जाणार
कें के रेंजच्या हद्दीत अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत. या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला हा संरक्षणकडून नव्हे, तर राज्य शासनाकडून मिळणे अपेक्षित आहे. या अगोदर राज्य शासनाने संरक्षणच्या जमिनी घेतल्या आहेत. त्या बदल्यात त्यांना जमिनी उपलब्ध करून देणे ठरलेले आहे. त्यामुळे के के रेंजमध्ये ज्या जमिनी संपादित झालेल्या आहेत, त्याचा मोबदला शासनाने देणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा करून स्वखर्चाने या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहे.
वर्षभरातील कामावर समाधानी
वर्षभरात आपण श्रीगोंद्यासह तीन तालुक्यांतील माळढोक पक्षी अभयारण्याचे आरक्षण उठविले. त्याबरोबरच बायपासच्या कामासाठी 590 कोटींचा निधी मंजूर केला. सध्या या बायपासमुळेच लॉकडाउनही यशस्वी झालेले आहे. बायपासचेही काही काम झाले आहे. वर्षभरात फक्त सहाच महिने कामाची संधी मिळाली. त्यात केलेल्या कामावर समाधानी आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.