श्रीरामपूर (अहमदनगर) : कोरोना संकटात महागाईचा भडका उडाला असून, पेट्रोल- डिझेलपाठोपाठ आता खाद्यतेलांचेही दर वाढले आहेत. यामुळे सामान्यांचे जीवन आणखी खडतर होऊ पाहत आहे.
लॉकडाउनमुळे व्यवसायांची घडी विस्कळित झाल्याने परदेशी खाद्यतेलांची आयात मंदावली आहे. देशभरात महिन्याला सरासरी दोन लाख टन खाद्यतेल लागते. स्थानिक उत्पादनासह युक्रेन, मलेशिया, अर्जेंटिना आदी प्रमुख देशांतून सूर्यफूल, सोयाबीनसह पामतेलाची आयात होते. यंदा परदेशातील सूर्यफूल तेलाचे उत्पादन घटल्याने सोयाबीन तेलाला मागणी वाढली. त्यात कोरोनामुळे परदेश व्यापार विस्कळित झाल्याने दर कडाडले आहेत.
गेल्या काही दिवसांत सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा, सरकीसह पामतेल यांच्या दरात दहा टक्के वाढ झाल्याची माहिती येथील रामदेव रिफायनरीचे संचालक मुकेश न्याती यांनी दिली.
सोयाबीन तेलाचा किरकोळ बाजारातील दर सध्या प्रतिकिलो 112 रुपये, तर 15 लिटरच्या डब्याचा दर एक हजार 500 रुपये आहे. दहा दिवसांपूर्वी प्रतिकिलो 95 रुपयांनी मिळणाऱ्या खाद्यतेलासाठी आता 110 रुपये मोजावे लागतात. चांगल्या आरोग्यासाठी सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन तेल फायदेशीर ठरते. शहर परिसरात शंभराहून अधिक वडा-पाव स्टॉल, तसेच नाश्ता सेंटर आहेत. तेलांचे दर वाढल्याने खाद्यपदार्थांसाठीही अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
सण-उत्सवांत खाद्यतेलांचा खप वाढतो. आगामी काळातील नवरात्र, दिवाळी आदी सण-उत्सव लक्षात घेता, दर आणखी वाढण्याची शक्यता मुकेश न्याती यांनी वर्तविली.
संपादन : अशोक मुरुमकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.