नगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारतर्फे लॉकडाउन करण्यात आले आहे. या काळात संघटना, संस्था व व्यक्तींनी सोशल माध्यमातून ऑनलाइन स्पर्धा घेण्यास सुरवात केली आहे. या स्पर्धेत काहींकडून व्यक्तिगत माहिती संकलन केली जात आहे. सोशलच्या माध्यमातून होणाऱ्या लुटीच्या घटना वाढल्याने स्पर्धेत सहभागी झालेल्यांनी त्याचा धसका घेतला आहे.
लॉकडाउनच्या काळात एकमेकांचा विरंगुळा व प्रत्येक जण गुंतून राहावा, यासाठी काही संघटना, संस्था व व्यक्तींनी उदात्त हेतू ठेवून सोशल माध्यमातून चित्र रंगवा, प्रश्नमंजूषा, उखाणे, काव्य, भाषण आदी प्रकारच्या स्पर्धा घेतल्या आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या साहित्याची माहिती संकलनासाठी तालुक्यासह गावागावांमध्ये काही जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून संकलन झालेल्या स्पर्धकांच्या प्रवेशिका स्वीकारून त्यातून विजेत्यांना निवडले जात असून, विजेत्यांची घोषणा केली जात आहे.
हेही वाचा ः लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कामांना विरोध
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आदी माहिती प्रवेशिकेबरोबरच घेतली जात आहे. या माहितीचा आता स्पर्धेत प्रवेशिका स्वीकारणाऱ्यांकडून, तसेच इतरांकडून स्पर्धकांशी व्यक्तिगत संपर्क साधला जात असून, त्यांची कुटुंबातील सदस्यांची माहिती घेण्याचा सपाटा सुरू केला आहे.
स्पर्धेतील मोजकेच नंबर काहींकडून सोशलच्या माध्यमातून संदेश पाठवून संपर्क अभियान वाढविले आहे. या संपर्काच्या माध्यमातून आपण महाविद्यालयात एकत्र होतो, तुम्हाला पाहायला आलो होतो, अशी चर्चा करून एकमेकांशी नाते जोडण्याचा "उद्योग' सुरू केला आहे. याचा मनस्ताप अनेकांना होत आहे.
क्लिक करा ः कोरोनाच्या लढाईत "गुरुजी' सरस
नाहक स्पर्धेत सहभागी झालो
नाहक ऑनलाइन स्पर्धेत सहभागी झालो, असे मत आता स्पर्धक व्यक्त करू लागले आहेत. ऑनलाइन स्पर्धा आयोजित करणाऱ्या संस्था धर्मादाय आयुक्तांकडे रजिस्टर नसल्याची चर्चा आता स्पर्धकांमधून होत आहे.
विवाह जुळणीसाठी पुढाकार
ऑनलाइन माध्यमातून स्पर्धा घेऊन अनेकांना त्या माध्यमातून सहभागी केल्यानंतर त्यांच्या व्यक्तिगत मोबाईल नंबरवर संपर्क साधून घरात कोणी विवाहेच्छू आहे का? आम्ही विवाह सूचक मंडळ स्थापन करीत आहोत, असे सांगून माहिती संकलनास सुरवात केली आहे. हा हेतू जरी चांगला असला, तरी त्यात प्रत्येकाने खबरदारी पाळावी.
फेसबुकवर मैत्रीचे निमंत्रण वाढले
ऑनलाइन स्पर्धेत सहभागी झालेल्यांच्या फेसबुक अकाउंटवर आता मैत्रीचे निमंत्रित करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. कधी नाही पाहिलेले व अनोळखी लोक मैत्रीचे निमंत्रण पाठवीत असल्याने त्याचा सर्वाधिक महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
स्पर्धकांनी ऑनलाइन स्पर्धेसाठी माहिती भरताना काळजी घ्यावी. अत्यंत विश्वासू संस्था असेल, तर माहिती भरावी; अन्यथा त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे ऑनलाइन स्पर्धकांनी काळजी घ्यावी.
- अरुण परदेशी, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.