नगर : पावसाचे पाणी रस्त्यांवर साचत असून, ते अनेक घरांमध्येही शिरते. त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेने शहरातील गायब झालेले नैसर्गिक ओढे, नाले शोधावेत; अन्यथा भविष्यात पावसाच्या पाण्यामुळे अनेक समस्या निर्माण होतील, असा इशारा नगरसेवक योगीराज गाडे यांनी आज दिला.
हेही वाचा - उपमहापौर मागताहेत महापालिकेसाठी अभियंते
गुलमोहर रस्ता परिसरातील दळवी मळा, गणेश कॉलनी व पारिजात चौक परिसरातील वसाहतींमध्ये व रस्त्यांवर पावसाच्या पाण्यामुळे तळे साचत असल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. घरात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत होते. आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या ठिकाणी गाडे यांनी स्वखर्चातून जेसीबीच्या साह्याने काम करून सर्व ठिकाणचे पाणी काढून टाकले. मात्र, ही सोय तात्पुरती असून, ओढे-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह खुला केल्यास कायमस्वरूपी समस्या सुटेल, असे गाडे यांनी सांगितले.
महापालिकेला दर वर्षी मे महिन्यात पत्र देऊन या ठिकाणच्या ओढे-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह खुला करण्यास सांगितले जाते. याबाबत ठोस निर्णय न घेतल्यामुळे दर वर्षी पावसाळ्याच्या 4 महिन्यांत घरांच्या परिसरात पाणी राहते. गेल्या वर्षी नरहरीनगरमधील नाल्यातील पाइप काढल्याने त्या भागात यंदा पावसाचे पाणी साचले नाही. मात्र, इतर भागात नाल्याचे पाणी असल्याने दुर्गंधीही येते. 30 वर्षांपूर्वी असणारे नैसर्गिक ओढे-नाले गायब झाले आहेत. त्यामुळेही नागरिकांच्या घरात पाणी घुसते. नाले बुजवून त्यावर बांधकामास परवाने दिले आहेत. याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे, असेही गाडे म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.