दिवाळीच्या तोंडावर शेतकरी अडचणीत; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Damage to crops due to heavy rains in Akole taluka
Damage to crops due to heavy rains in Akole taluka

अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात यंदा खरीपाची 47335.11 हेक्टरवर लागवड झाली. त्यात  सोयाबीनची 10562 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मध्यंतरी या पिकाची स्थिती चांगली असताना किडीचा प्रादुर्भाव व पाऊस यामुळे तालुक्यातील सर्वच पिकांना फटका बसल्याने शेतकरी राजा दिवाळीच्या तोंडावर अडचणीत आला असून ओळ दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

पाऊस पडल्याने खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने निम्यापेक्षा अधिक शेंगा आदल्या आहेत तर उर्वरित शेंगा भरत असताना उन पावसाचा खेळ सुरू झाल्याने नदीकाठच्या अनेक पिकांना नुकसान पोहचले आहे. मार्चपासून कोरोनाचे संकट आल्याने अनेकांचा रोजगार हिरावला असताना शेतकऱ्यांनी जेमतेम जुळवा जुळव करून बियाणे आणले त्याची लागवड केली. सुरुवातीला पिके जोमात होती. मात्र पाऊस व हवामान यामुळे पिके अर्धे अधिक तर काही ठिकाणी सत्तर टक्के पिके वायला गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. यापुढे कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न उभा राहिला आहे. जी स्थिती सोयाबीन तीच स्थिती बाजरी मकाची आहे. 

3468.66 हेक्टर बाजरी लागवड झाली. मका 3256.30  हेक्टरवर लागवड झाली. मात्र यावर्षी बाजरी पीक शंभर नंबरी होते. दमदार वैरण आली होती ती पाऊस पडल्याने व वातावरण खराब असल्याने पिके झोपली वैरणही खराब झाली. त्यामुळे या पिकाला ५० टक्केपेक्षा अधिक फटका नसल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर खुळे यांनी सांगितले.

कांदा 250 हेक्टर असून त्यापैकी 9.20  हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. त्यात मध्यंतरी कांदे भाव वाढले. 12ते 15हजार रुपये पाईलीने बियाणे शेतकऱ्यांनी घेतली. त्याचेही मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगतात. मुळा प्रवरा आढळा पट्ट्यात भात जोमात होते. एकूण क्षेत्राच्या 18983.25 हेक्टर क्षेत्रात लागवड झाली. मात्र भंडारदरा, मुळा, आढळा पट्ट्यात अती पाऊस व तांबेरा रोगापडल्याने भातपीक खराब झाल्याचे शेतकरी पांडुरंग खाडे यांनी सांगितले. 

महेश नवले (टोमॅटो उत्पादक शेतकरी) म्हणाले, टोमॅटो, सोयाबीन, बाजरी, भाजीपाला, ऊस या पिकांना पाऊस व वातावरणाचा मोठा फरक बसला. तांबेरा, उनी हुमणी रोग पडल्याने पिके ७० टक्के धोक्यात आहे. मुरुमाचे शेत असलेल्या ठिकाणी उसाची वाढ थांबली आहे. यावर्षी अगस्ती कारखाना 30, 40 हजार टन ऊस कमी पडेल अशी स्थिती आहे. तर सोयाबीन, बटाटा ही बियाणे बनावट असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, असे माजी आमदार वैभव पिचड यांनी सांगितले. तालुक्यात अतीपाऊस व भात,सोयाबीनवर विविध प्रकारचे रोग पडले तर काही ठिकाणी बनावट बियाणे दिल्याने शेतकरी अडचणीत असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावी, असेही ते म्हणाले. 

तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी म्हणाले, भात पीक सध्या पोटरी अवस्थेत असून पीक परिस्थिती चांगली आहे. बाजरी पिकाची काढणी सुरू आहे. मका पीक सध्या पोटरी अवस्थेत आहे. 

अशी आहे लागवड
भात पिकाचे सरासरी क्षेत्र 13400 हेक्टर असून 18983.25 हे क्षेत्रावर लागवड बाजरी पिकाचे सरासरी क्षेत्र 5000 हेक्टर असून 3468.66 हेक्टरवर लागवड, मका पिकाचे सरासरी क्षेत्र 3500 हेक्टर असून 3256.30 हेक्टर क्षेत्रावर लागवड. नागदी पिकाचे सरासरी क्षेत्र 500 हेक्टर असून 260  हेक्टरवर लागवड झाली. खरीप तृणधान्य पिकाचे सरासरी क्षेत्र 500 हेक्टर असून 252.70  हेक्टर क्षेत्रावर लागवड. मूगाचे सरासरी क्षेत्र 150  हेक्टर असून 83.40 हेक्टर क्षेत्रावर लागवड. उडीदाचे सरासरी क्षेत्र 50 हेक्टर असून 91.37 हे क्षेत्रावर लागवड. भुईमूग पिकाचे सरासरी क्षेत्र 2000  हेक्टर असून 1138.41 हेक्टर क्षेत्रावर लागवड. कारळे पिकाचे सरासरी क्षेत्र 500 हेक्टर असून 242.40  हेक्टर क्षेत्रावर लागवड. सोयाबीन  पिकाचे सरासरी क्षेत्र 3500 हेक्टर असून 10562.89  हेक्टर क्षेत्रावर लागवड. चाराचे सरासरी क्षेत्र 1025  हेक्टर असून 2088.70  हे क्षेत्रावर लागवड. कांदा पिकाचे सरासरी क्षेत्र 250  हे. असून 9.20  हे क्षेत्रावर लागवड. 

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com