श्रीगोंदे : कोरोनामुळे तालुक्यात लिंबांचा उन्हाळी हंगाम खाली गेला. आता किलोचा दर 5 ते 7 रुपयांवर आला आहे. दर पाडण्यात व्यापाऱ्यांची साखळी तयार झाली असून, त्यांची मनमानी शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत आहे. गावोगावी वजनकाटे घेऊन बसणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोणाचेही बंधन नाही.
हेही वाचा : नगरमध्ये कोरोनाने आवळला फास...
तालुक्यात लिंबातून घामाचे पैसे कमावणारा शेतकरीवर्ग मोठा आहे. सात हजार हेक्टर क्षेत्रावर लिंबूबागा आहेत. कमी क्षेत्राच्या शेतकऱ्यांचा प्रपंच त्यावरच चालतो. बड्या शेतकऱ्यांनीही शेतीत विविध प्रयोग करताना लिंबूबाग करून नगदी चलन सुरू ठेवले आहे. मात्र, शेतकऱ्यांना लिंबासाठी हक्काची बाजारपेठ नाही. त्यामुळे त्यांची लूट होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
श्रीगोंद्यातून सुमारे 100 टन लिंबे रोज बाहेर जातात. पंजाब, राजस्थान, दिल्ली येथे काही प्रमाणात लिंबे जातात. मात्र, प्रामुख्याने मुंबई व पुण्याच्या बाजारात जास्त माल जातो. गावातील छोटे व्यापारी चार दिवसांपूर्वी 17 ते 18 रुपये किलोने लिंबे खरेदी करीत होते. मात्र, अचानक हीच लिंबे दोनच दिवसांत 5 ते 7 रुपयांवर आली.
सोबतच शेतकऱ्यांच्या लिंबांच्या वजनात 2 किलोपर्यंत हक्काची कपात केली जाते. त्याचे ठोस कारण कोणालाही देता येत नाही. मागणी नाही, उठाव नाही, असे सांगून शेतकऱ्यांना लुटले जाते. वाडी, गावात किरकोळ लिंबे खरेदी करणारे व्यापारी तीच लिंबे श्रीगोंदे बाजार समितीत विकतात. तेथून ती मुंबईसह परराज्यांत जातात.
बाजारात 20 रुपयांना 4 लिंबे
मुंबईतील एका व्यापाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की श्रीगोंद्यात 5 ते 7 रुपये किलोने खरेदी होणारे लिंबे आम्ही 20 ते 22 रुपयांना घेतो. किरकोळ बाजारात तर 20 रुपयांना 4 लिंबे मिळतात. एका किलोत 30 लिंबे बसतात. मग, सगळा हिशेब कुठे जातो, हे शेतकऱ्याला समजत नाही. सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, की ठरावीक व्यापाऱ्यांच्या, यावर चर्चा न केलेलीच बरी!
लिंबांना मागणी नाही
लिंबांना सध्या बाहेर मागणी नाही. लिंबू आणूच नका, असे सांगितले जाते. त्यामुळे लिंबांचे दर पडले आहेत. गावातील अथवा कुठलाही व्यापारी त्यात मनमानी करीत नाही.
- उमेश पोटे, व्यापारी संचालक, बाजार समिती, श्रीगोंदेव्यापाऱ्यांवर कारवाई करू
कुठलाही व्यापारी शेतकऱ्यांवर मनमानी करीत असेल, तर त्यावर थेट कारवाई करू. या व्यापाऱ्यांवर निर्बंध नसले म्हणजे मनमानी होईल असे नाही. अधिक माहिती घेऊन, गरज पडली तर कारवाई करू.
- महेंद्र माळी, तहसीलदार, श्रीगोंदे
श्रीगोंद्यातील लिंबांची सद्यःस्थिती
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.