कोपरगाव (अहमदनगर) : जगभरात कोविडच्या प्रकोपामुळे मोठी उलथापालथ झाली. जगण्याचे संदर्भ बदलले. मात्र, मुद्रित माध्यमांवरील वाचकांचा विश्वास कायम राहिला. वृत्तपत्रांकडे सुरू झालेला जाहिरातींचा ओघ आणि त्याचा वाढता खप, हे त्याचेच लक्षण असल्याचे प्रतिपादन साहित्यिक संजय कळमकर यांनी केले.
संजीवनी शैक्षणिक संकुलात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे होते. संस्थेचे सचिव ए. डी. अंत्रे व कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे उपस्थित होते. कळमकर म्हणाले, की इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे टीआरपीसाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतात. आभासी मुद्यांभोवती फिरतात. तुलनेत मुद्रित माध्यमे सामान्य जनतेचे प्रश्न समोर आणण्याचे काम वर्षानुवर्षे करीत आली आहेत. त्यात पत्रकार हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. अनंत अडचणी सोसत पत्रकार वृत्तसंकलनाचे काम करतात.
हे ही वाचा : माजी मंत्र्यांच्या वस्तीवरील चंदनचोरी प्रकरणी दरोड्याचा गुन्हा
संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे म्हणाले, की संजीवनी शैक्षणिक संकुलाने देश-विदेशात नाव कमावले. त्यात स्थानिक पत्रकारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या संस्थेचे आणि पत्रकारांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे म्हणाले, की कोविड काळात संस्थेच्या सर्व शाखांचा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकविण्यास प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांचा त्यास उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या अडचणीत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने देशपातळीवर मानांकन मिळविले. कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यात सातत्य कायम राहिले. ही मोठी उपलब्धी ठरली. प्रा. साहेबराव दवंगे यांनी सूत्रसंचालन केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.