
ममतांच्या विजयामुळे भाजपला चपराक बसली ः थोरात
संगमनेर ः कोरोनाशी लढण्याऐवजी पंतप्रधान व सर्व केंद्रीय मंत्री सत्तेसाठी निवडणुका जिंकण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या भाजपाबद्दल भारतीय जनतेमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ममतांच्या विजयनाने भाजपला चपराक दिली असून, पक्षाची पीछेहाट सुरू झाल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालाबाबत बोलताना ते म्हणाले, ""जनतेला शाश्वत विकास व सुरक्षितता हवी आहे. मात्र भाजपने मागील सात वर्षांत फक्त जाहिरातबाजी केली. पेट्रोल, डिझेलच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. महागाईने जनता त्रस्त झाली असून, देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.
बेरोजगारी वाढली आहे. या शिवाय देशासमोर कोरोनाचे मोठे उभे संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत देशातील जनतेला मदत करण्याऐवजी भाजपचे सरकार सत्तेसाठी निवडणुकांमध्ये भावनिक मुद्दे निर्माण करून लोकांचे लक्ष विचलित करीत आहेत.
महाराष्ट्रात रेमडेसिव्हिरचा तुटवडा आहे. ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. अशा मूलभूत प्रश्नांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले असल्याने भाजपकडून जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. याबाबत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी वेळोवेळी केंद्र सरकारला विविध सूचना, तसेच जनतेच्या मदतीसाठी कृतिशील उपाययोजना केल्या आहेत. पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांनी मिळवलेला ऐतिहासिक विजय भाजपला चपराक देणारा आहे, असे थोरात म्हणाले.
Web Title: Mamata Banerjees Victory Taught The Bjp A
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..