श्रीरामपूर (अहमदनगर) : केंद्र सरकारने लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकरी विरोधी निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. कांदा निर्यातबंदी तातडीने रद्द करावी, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी दिला आहे.
केंद्रातील भाजपा सरकारने कांदा निर्यातबंदी तात्काळ रद्द करुन कांदा उत्पादकांना न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना दिले. यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस तुषार बोबडे, जिल्हासचिव डॉ. संजय नवथर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, तालुकाध्यक्ष सुभाष सोनवणे, शहराध्यक्ष सचिन पाळंदे, जिल्हा उपाध्यक्ष उदय उदावंत, राहुल दातीर उपस्थित होते. कोरोना पार्श्वभूमीवर सहा महिन्यापासून सर्वत्र मंदीचे सावट पसरले आहे.
राज्यात पडलेल्या अतिपावसामुळे कांद्याच्या उत्पादनात घसरण होऊन बाजारात कांद्याची आवक घटली आहे. आता काही प्रमाणात दरवाढ होताना केंद्रातील भाजपा सरकारने कांदा निर्यातबंदी जाहीर केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. मनसे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली असून सरकारने तातडीने कांदा निर्यातबंदी रद्द कारावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे दिला आहे.
संपादन : अशोक मुरुमकर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.