नगर तालुका ः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस लॉकडाउन करण्यात आले होते. मात्र, आता कृषी सेवा केंद्रचालकांनी प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ लॉकडाउन पाळण्यास सुरवात केली आहे. 10 जुलैपासून सुरू झालेले लॉकडाउन 13 जुलैपर्यंत पाळले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची खते, बी-बियाणे व औषधांची गैरसोय होत आहे.
जिल्ह्यासह राज्यात बाजरी, सोयाबीन आदी बियाणे बोगस निघाल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या. यातील काही कंपन्यांनी शेतकऱ्यांना मोफत बियाणेवाटप केले असून, काहींनी अद्याप बियाणे दिले नसल्याने शेतकऱ्यांकडून कंपन्या व व्यापाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करण्यास सुरवात झाली आहे.
वाढत्या तक्रारींमुळे कृषी खात्याकडून खते, बियाणे व औषधेविक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रचालकांवर गुन्हे दाखल करण्यास सुरवात केली आहे. त्याच्या निषेधार्थ राज्यातील कृषी सेवा केंद्रचालकांच्या संघटनेने तीन दिवस बंद पुकारला आहे. "बंद'च्या सलग दुसऱ्या दिवशी आज ग्रामीण भागातील केंद्रांवर खते, बियाणे व औषधे खरेदीसाठी शेतकरी येऊन जात असल्याचे दिसून येत होते.
अवश्य वाचा ः प्रशासकीय ऐवजी विनंती व आपसी बदल्या करा
खते व बियाणे न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. बोगस बियाणे निघाल्याने शेतकऱ्यांचा पेरणी व मशागतीवरील खर्च वाया गेला आहे. त्यामुळे संबंधित बियाणे कंपन्यांवर शासनाने कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही केली जात आहे.
दुबार पेरणीसाठी बियाणे देण्याची कंपन्या व विक्रेत्यांची तयारी आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न असल्याने सर्वांनी एकत्र येऊन त्यातून मार्ग काढणे गरजेचे आहे.
- अजय बोरा, राज्य सल्लागार, कृषी सेवा केंद्रचालक संघटना
संपादन ः दौलत झावरे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.