
कलेक्टर कार्यालयाचे द्वार ‘अटकेपार’
अहमदनगर - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीने नगरच्या वैभवात भर घातली आहे. या इमारतीचे भव्यदिव्य रुप पाहून सर्वचजण कौतुक करीत आहेत. या इमारतीची स्वच्छता ठेवण्यासाठीही प्रशासनाने व्यवस्था केली आहे. मात्र, जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांच्या सोयीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. तालुक्याच्या गावावरून जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी लागणाऱ्या पैशांपेक्षा जास्त पैसे स्थानकावरून जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्या-येण्यासाठी मोजावे लागतात. त्यामुळे कलेक्टर कार्यालयाचे द्वार ‘अटकेपार’ नेल्याची भावना व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे नवीन वास्तूत स्थलांतर होऊन काही महिने लोटले आहेत. त्या भव्य वास्तूत प्रथम आल्यानंतर भल्या भल्यांना गोंधळून जायला होते. संबंधित विभागात जाण्यासाठी अनेकांना विचारपूस करावी लागते. हा सर्व प्रकार मुख्यालयात पोहचल्यानंतरचा आहे. मात्र, या मुख्य इमारतीत पोचण्यासाठी अनेकांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागते. बसस्थानकावरून जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यासाठी रिक्षा चालकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जातात. हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शहर बससेवा जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या मार्गावर सुरू करण्याची मागणी होत आहे. ही बससेवा माळीवाडा बसस्थान ते तारकपूर बसस्थानकानंतर जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे सुरू केल्यास प्रश्न सुटू शकतो.
यांना होतोय मनस्ताप
नेवासे व शेवगाव या दोन तालुक्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नव्याने वास्तूत गेल्याने फायद्याचे ठरत आहे. मात्र, इतर तालुक्यांच्या दृष्टीने ते डोकेदुखीचे ठरत आहे. यामध्ये पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, पाथर्डी, अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूर या तालुक्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत. येथील नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
असा मार्ग आवश्यक
माळीवाडा बससस्थानकापासून बस सुटून दिल्लीगेट मार्गे जिल्हा रुग्णालय, तारकपूर बसस्थानक, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय, न्यायालय, महापालिका, वन विभाग व जिल्हाधिकारी कार्यलय असा मार्ग ठेवल्यास वरील शासकीय कार्यलयात येणाऱ्या नागरिकांची सोय होऊ शकते. दुसरा पर्याय माळीवाडा, नगर कॉलेज, कोटला बसस्थानक, डीएसपी चौक मार्गे आणि जिल्हाधिकारी कार्यालय.
असे आकारले जाते रिक्षा भाडे
माळीवाडा बसस्थानक (स्पेशल) ६० ते ८०
तारकपूर बसस्थानक (स्पेशल) ५० ते ६०
माळीवाडा बसस्थानक (शेअरिंग) २५ ते ३५
तारकपूर बसस्थान ः (शेअरिंग) ३० ते ३५
ई-रिक्षाची सेवा द्यावी
समाजकल्याण विभागातर्फे ई-रिक्षांचे वाटप केले जात आहे. अशा लाभार्थ्यांची येथे नियुक्ती केल्यास त्यांना कायम स्वरुपी रोजगार मिळून नागरिकांची सोय होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने याबाबत विचार करावा, अशी मागणी आता होत आहे.
नगरला येण्यासाठी लागणारे भाडे
राहुरी ६०
संगमनेर १५०
श्रीरामपूर १०५
नेवासे ९०
श्रीगोंदे ९५
अकोले १८५
शेवगाव ९५
कोपरगाव १५०
जामखेड११५
पाथर्डी ८०
पारनेर ६०
राहाता १२५
कर्जत ११५
Web Title: Rickshaw Fare More Than St Administration Neglects The Facility Of Citizens
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..