Ahmednagar : तीनशेहून अधिक मृतदेह बाहेर काढणारे पाणीवीर;शहरटाकळीच्या तरुणांचा मदतीचा हात नेहमीच पुढे

जेथे स्वतःच्या कुटुंबातील मृत व्यक्तीला स्पर्श करण्यास रक्ताची नाते धैर्य दाखवत नाहीत. जेथे विहीर, तलावात बुडालेले मृतदेह शोधण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या त्रिमूर्तीची ही कहाणी आहे.
Ahmednagar
Ahmednagarsakal

राजेंद्र पानकर

शहरटाकळी : जेथे स्वतःच्या कुटुंबातील मृत व्यक्तीला स्पर्श करण्यास रक्ताची नाते धैर्य दाखवत नाहीत. जेथे विहीर, तलावात बुडालेले मृतदेह शोधण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या त्रिमूर्तीची ही कहाणी आहे.

शहरटाकळी (ता. शेवगाव) येथील नारायण मिसाळ, अरुण लोखंडे, राजेंद्र गादे अशी यांची नावे आहेत. ते कसलीच पर्वा, अपेक्षा न करता, भीती न बाळगता खोल पाण्यात बुडालेले मृतदेह शोधण्यासाठी जीवाची बाजी लावतात. अशा या तिघांनी दहा वर्षांत चक्क ३०० पेक्षा अधिक मृतदेह पाण्याबाहेर काढून मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे समाजाकडून कौतुक होत आहे.

अरुण लोखंडे याने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याने नोकरीमागे न धावता वडिलोपार्जित शेतीत लक्ष घातले अन् विविध आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीतून प्रगती साधली. बालपणापासूनच मित्र राजेंद्र गादे, नारायण मिसाळ बरोबर त्याला पोहण्याचा छंद होता. ते पोहण्यात एवढे तरबेज झाले की नावारूपाला आले. लोखंडे व मिसाळ यांनी जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाईपलाईन केली.

शेती करीत असताना शेती व्यवसाय सोबतच ते तिघे जायकवाडी धरणाच्या पाण्यातील पाण्यात सटकलेले पाईप जोडणीचे काम करू लागले. अशातच शहरटाकळी परिसरात शेतकऱ्यांनी बागायती शेती जगवण्यासाठी. पाण्यातील लिकेज काढण्यासाठी या तिघांचा आधार ग्रामस्थांना मिळाला.

पाय घसरून किंवा अन्य कोणत्याही कारणाने विहिरी, तलावात बुडण्याच्या घटना मोठ्या संखेने पाहण्यास मिळतात. बुडालेले मृतदेह काढण्यास कुणी धजावत नव्हते. अशा चिंताग्रस्त कुटुंबासाठी सरसावले या तिघेजण. वयाच्या तिसाव्या वर्षी नारायण मिसाळ, अरुण लोखंडे व राजेंद्र गादे या तीन मित्रांनी बुडालेल्या व्यक्तींना पाण्यातून बाहेर काढण्याचा संकल्प केला. गेल्या दहा वर्षांत तीनशेहून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात या तिघांना यश आले आहे.

ऑक्सिजन किटच्या मदतीसाठी पुढे यावे

पाण्यातून मृतदेह बाहेर काढणे जिकिरीचे काम असते. तीनही युवक जिवाची बाजी लावून हे काम करतात. पाण्यात जास्त वेळ राहण्यासाठी या तिघांनाही ऑक्सिजन कीट मिळण्याची गरज आहे. प्रसंगी पाण्यात पडलेल्यांचे जीवही वाचू शकतील. या तिघांकडे एकच ऑक्सिजन किट आहे. तिघांना तसे किट मिळाल्यास यापुढे मृतदेह बाहेर काढणे शक्य होईल.

समाजासाठी धावून जाणारे यार

आजपर्यंत तिघेही शेवगाव तालुक्यातीलच नव्हे, तर संभाजीनगर, अहमदनगर, बीड, नाशिक, पुणे या जिल्ह्यांतील पैठण, पाथर्डी, वैजापूरसह अनेक गावांत बुडालेले मृतदेह शोधून बाहेर काढले आहेत. मदतीसाठी फोन आला, तर ते क्षणाचाही विलंब न करता हातातील काम सोडून मार्गस्थ होतात. या कामासाठी केवळ वाहनाचे भाडे किंवा त्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा खर्च, स्वखुशीने दिला, तरच बक्षीस स्वीकारतात.

बुडालेली घागर अन्‌ पट्टीचे पोहणारे

पूर्वी गावाच्या पाणवट्यावर पाणी भरायला लागायचे. रहाटावरून भरलेली घागर विहिरीतून ओढण्याची कसरत असायची. गावातील एखाद्याची घागर बुडाल्यास गावात असे एक, दोन जण असायचे की पाण्यात सूरउडी घ्यायचे आणि तळातील घागर वर घेऊन यायचे. ते कुठलेही ऑक्सिजन कीट वापरत नसत. गावात नळपाणी योजनाही नसे. पट्टीचे असे पोहणारे वीरही गावोगावी असायचे. पाण्यात उडी घेतल्यानंतर श्वास घेण्यास होणारा त्रास पाहून ऑक्सिजन सिलिंडरचे जुगाड तयार केले. त्यामुळे पाण्यात श्वास मिळून शोध कार्य करणे सोपे झाले. खोल विहीर, तलावांमध्ये मृतदेह सहज शोधून बाहेर काढता येतो.

-अरुण लोखंडे, शहरटाकळी.

या कामासारखी पुण्याई व समाजकार्य दुसरे कोणतेच नाही. पोहण्याची व पाण्याखाली मृतदेह शोधण्याच्या सवयीमुळे पाण्याखाली राहण्याची सवय जडली. काही ठिकाणी पाणी दूषित असल्याने पाण्यात जास्त वेळ थांबणे शक्य होत नाही. शासनाने पाण्यामध्येही श्वास घेता यावा म्हणून ऑक्सिजन किट उपलब्ध करून दिल्यास काम करणे सोपे होईल.

-नारायण मिसाळ, शहरटाकळी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com