स्वबळाबाबत काँग्रेसमध्ये विचारमंथन

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात : पक्षासाठी कठीण काळ पण, हेही दिवस सरतील
Balasaheb Thorat
Balasaheb Thoratsakal
Summary

काँग्रेसचा स्वबळाचा नारा, महाविकास आघाडीचा कारभार, नगरपंचायतीतील जय-पराजय, जिल्ह्यातील राजकारण, भाजपची आक्रमकता आदी मुद्द्यांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘सकाळ’शी दिलखुलास संवाद साधला.

प्रश्न - काँग्रेसचं सध्या काय चाललंय?

उत्तर - ‘‘काँग्रेस विचारसरणीसाठी कठीण काळ सुरू आहे. काँग्रेसचे तत्वज्ञान हे राज्यघटनेशी निगडीत आहे. समाजसुधारक, संतांच्या विचारांवर आधारित असलेल्या राज्यघटनेचे प्रतिबिंब झालेले दिसते. सर्वांना समान संधी, व्यक्ती स्वातंत्र्य, समाजवादी समाजरचना पक्षाला अभिप्रेत आहे. सध्या भाजप जे राजकारण करीत आहे ते धर्मावर आधारित आहे. सध्या कट्टरवादाचा ट्रेंड जगभरात दिसतो. जाती-धर्माचे राजकारण करणे सोपे असते. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कठीण काम काँग्रेस करीत आहे. पक्षासाठी काळ कठीण असला तरी तो कायम कठीण असेल असे नाही.’’

प्रश्न - राज्यात स्वबळाचा नारा प्रदेश काँग्रेसने दिला आहे.

उत्तर - स्वबळाचा नारा आमच्या प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे. विधानसभेच्या अशा काही जागा आहेत की, तिथे उमेदवार नसतो. अनेक जिल्ह्यात खासदार, आमदारकी लढविली जात नाही. त्यामुळे खाली अनेक प्रश्न निर्माण होतात. कार्यकर्ते, पदाधिकारी तयार होत नाहीत. आमचे तीन पक्षाचे सरकार आहे. प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. पण स्वबळाचे फायद्याबरोबरच तोटेही आहेत. स्वबळाचा विचार करताना भाजपला फायदा होणार नाही याचाही विचार करीत आहोत. स्वबळावर लढल्याचा तोटा अकोले नगरपंचायतीमध्ये दिसून आला आहे. कोणत्या पद्धतीने पुढे जायचे या बाबत विचारमंथन सुरू आहे.

प्रश्न - महाविकास आघाडी सरकारचा कारभार कसा चाललाय?

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विचारसरणीत साम्य आहे. आम्ही शिवसेनेला बरोबर घेतले. सुरवातील सोनिया गांधींचा याला विरोध होता. पण भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे होते. भाजपची विचारसरणी समाजास घातक आहे. ही गोष्ट लोकांच्याही एक दिवस लक्षात येईल. भाजप ज्या पद्धतीने समाजात विष कालवितो तसे शिवसेनेचे नाही. शिवसेनेला प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आहे. शिवसेना व भाजपमध्ये मोठा फरक आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. शिवसेनेने या पूर्वी अनेक वेळा कॉंग्रेसला पाठिंबा दिला आहे. आमच्या सरकारने अतिवृष्टी, महापूर, कोरोना व चक्रीवादळ या काळात उत्तम काम केले आहे. सरकारसमोर अर्थव्यवस्थेचा मोठा कठीण काळ होता. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. उर्वरित शेतकऱ्यांला लवकरच फायदा दिला जाईल. राज्य सरकारच्या सर्वच विभागांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. पुढचे तीन वर्षेही सरकार चांगले चालेल.

प्रश्न - नाना पटोले यांचे मोदी विषयींचे विधान कितपत योग्य आहे.

एक काळ असा होता की, दोन पक्षाचे नेते निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात भाषणे करायचे व संध्याकाळी मात्र सोबत जेवण करायचे. त्यावेळी खेळाडू वृत्तीचे राजकारण पाहायला मिळायचे. त्यांच्यात समंजसपणा असायचा. पक्ष, मतमतांतरे मांडण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. त्या मतभेदाला अडचण नाही. पण त्याला व्यक्तिगत स्वरुप देणे लोकशाहीला अभिप्रेत नाही. पूर्वीच्या पंतप्रधानांच्यावेळी असे होत नव्हेत. टीकेला व्यक्तिगत स्वरूप देणे, निंदा नालस्ती करणे दुर्दैवाने आजच्या काळात सुरू आहे. 2014नंतर असे प्रकार वाढले आहेत. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी व विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांचे राजकारणा पलिकडच्या नात्यावर नेहमीच उदाहरण दिले जाते. देशात आज मोठा बदल झाला आहे. व्यक्तिद्वेष वाढला असून सोशल मीडियावर पराकोटीची बदनामी होताना दिसते, असे होऊ नये. हे अयोग्य आहे.राजकारणात निव्वळ मवाळ भाषा चालत नाही. पटोले यांची भाषा आक्रमक आहे. ते स्पष्टपणे मांडणी करीत असतात. ती त्यांची पद्धत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना अशा पद्धतीने जाऊ नये.

प्रश्न - जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला का होऊ शकत नाही

काँग्रेसची ताकद जनमानसात असतेच. तिला मुखर होणे गरज असते. मध्यंतरी विखे दुसऱ्या पक्षातून आले. आणि पुन्हा गेले. यात आमचे नुकसान होते. त्यावेळी आम्हाला खासदारकी व आमदारकी मिळाली असेल पण कोणत्याही पक्षाला हे फॅक्शन परवडत नसते. दुर्दैवाने त्यांची ही कार्यपद्धती असल्यामुळे ते तसे वागले. यामध्ये आमचे नुकसान झाले आहे, असे थोरात यांनी सांगितले.

प्रश्न - पालघरचे जिल्हा विभाजन तुमच्या काळात झाले. नगर जिल्हा विभाजनाचे काय?

उत्तर - ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हाचा मीच महसूलमंत्री असतानाचा प्रस्ताव होता. जिल्हा मोठा असण्यापेक्षा 7 महापालिका, समुद्र किनारा ते सह्याद्रीचा पायथा, आदिवासी क्षेत्र असे सर्व एकत्रितपणे आले होते. मॅनेजमेंट म्हणून खूप मोठे क्षेत्र व विविधता होती. त्यामुळे तेथे झालेली जनसंख्येची वाढही लक्षात घेतली होती. म्हणून काळाची पहिली गरज होती. परंतु यापूर्वी जे जे जिल्हे करण्यात आले, यात अकोला-वाशिम, हिंगोली-परभणी, गोंदिया-भंडारा आहेत की ज्यात केवळ 3 आमदार आहेत. नवीन जिल्हा करायचा तर त्यासाठी 56 नवनवीन प्रकारची कार्यालये उघडावी लागतात. अधिकारी, त्यांच्या नेमणुका, व्यवस्था, निरनिराळ्या कार्यालयाच्या इमारती यासाठी शेकडो कर्मचाऱ्यांची गरज असते. जिल्हा परिषद, जिल्ह्यात बँका दोन कराव्या लागतात. त्यातून अनेक प्रश्न उभे राहतात. तिथे काही तालुके फक्त 30 गावांचे आहेत. हा प्रकार उस्मानाबादमध्ये दिसून येतो. त्या त्या काळात ते ते निर्णय होऊन गेले. या बाबत कुणाला काही म्हणायचे नाही पण, आता जिल्हा विभाजन करताना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल.

थोरात म्हणजे संगमनेर असे समीकरण झालेय

मी एवढ्या वेळा निवडून येण्याचे श्रेय जनतेलाच द्यावे लागेल. खूप काम केले तरी राजकीय यश मिळतेच असे नसते. मी जे काम केले त्याचे जनतेने कौतुक केले. परत परत संधी दिली. संगमनेर निवडणुकीच्या वेळी थोडे तापते. पण विरोधकांनी खालच्या पातळीवर जाऊन भाषणे केली, टीका केली, असे तुम्हाला दिसणार नाही. किंवा मी विरोधकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, असेही होत नाही. ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांची मांडणी करतात. प्रयत्न करतात. राजकीय दर्जा टिकविण्याचे काम त्यांनी व मी दोघांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com