अकोले (अहमदनगर) : निळवंडे धरणग्रस्त असणारे कोहंडी गाव पुनर्वसन होताना या गावाला जलाशयातून पिण्यास पाणी मिळावे ही गावची माफक अपेक्षा. यापूर्वी एक कोटी रुपयांची योजना सुधारित प्रस्ताव मंजुरीमध्ये अडकली आहे. साडेतीन महिन्यापूर्वी १४ लाखाची दुसरी योजना मंजूर करून त्याचा शुभारंभ आजी आमदारांच्या हस्ते करण्यात आला.
संपूर्ण गाव या कामासाठी उपस्थित होता. मात्र साडेतीन महिने उलटूनही हे काम सुरू झाले नाही. पर्यायाने येथील महिलांना दीड किमी पायपीट करत पहाटे पाच वाजता डोक्यावर तीन हंडे घेऊन पाणी आणावे लागते. त्यामुळे महिला बचत गटाच्या सर्व महिला एकत्र येऊन त्यांनी आमदार, सभापती, प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना यांना निवेदन दिले. तरी देखील या योजनेचा कागद हलला नाही. त्यामुळे सकाळी साडे तीन किमी पायी चालत महिला माजी आमदार वैभव पिचड यांच्या निवासस्थानी येऊन भाऊ आमच्या नळ योजनेचे घोडे कुठे आडल ते पहा, नी आमच्या डोक्यावरचे हंडे खाली उतरवा असे म्हणत त्यांच्या भावना अनावर झाल्या.
त्याक्षणी श्री. वैभव पिचड यांनी संबधित खात्याला, ग्रामविकास विभागाला फोन लावून योजना का थांबली असा प्रश्न विचारताच वस्तूचे रेट वाढल्याने ठेकेदार काम करत नाही. दोन नोटीसा पाठवून त्याने दाद दिली नाही. लवकरच याबाबत नवीन निविदा काढून किंवा नवीन ठेकेदार नेमून निर्णय घेऊन काम सुरू करू असे सांगण्यात आले. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक होत १५ दिवसात काम सुरू झाले नाही तर मुला बाळासह सरकारच्या दारात बसू, असे म्हणत त्यांनी पुन्हा आपले गाव गाठले. याबाबत आमदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.