...म्हणून ते मुंबई, पुणेकर म्हणतात, गड्या आपला गावच बरा; हे आहे कारण!

labor in buldana district.jpg
labor in buldana district.jpg

नांदुरा (जि.बुलडाणा) : गेल्या काही वर्षांपासून खेड्यातील लोकांचे शहराकडे स्थलांतर झाल्याने शेतीला मजूर मिळणे कठीण झाले होते. सुशिक्षित युवक कंपन्यांकडेे तर सामान्य नागरिकांनीही रोजगारासाठी शहराला प्राधान्य दिल्याने लोंढेच्या लोंढे शहराकडे आकर्षित झाल्याचे चित्र आतापर्यंत पहावयास मिळाले.

परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा प्रभाव जास्त प्रमाणात शहरात जाणवू लागल्याने व लॉकडाउनमुळे कामधंद्यालाही ब्रेक बसल्याने गावखेड्यातील मुंबई, पुणे येथे स्थायी झालेल्या युवकांनी व कामानिमित्त गेलेल्या नागरिकांनी घरचा रस्ता धरला असून, आपआपल्या शेतशिवारात मिळेल ते काम करण्याला प्राधान्य दिले आहे.

गेल्या एक-दोन दशकापासून शहरातील वाढते औद्योगिकीकरण रोजगाराला आमंत्रण देत गेले आहे. तासिकाप्रमाणे काम मिळत असल्याने ओव्हर टाइम करून जास्त पैसे मिळविण्याचा व त्यातून दोन पैसे शिल्लक पडतील या आशेने खरेतर हा खेडेगावातील मजूर वर्ग शहराकडे मिळेल ते काम करू लागला. तर युवकांनीही इंजिनिअरिंग, आयटीआय व इतर कोर्स करून कंपन्यात काम मिळवत रोजगाराला जवळ केले आहे. 

हे सर्व व्यवस्थित सुरू असताना यावर्षीच्या मार्च महिन्यात चीनमधील वुहान शहरातून कोरोना महाराष्ट्रात दाखल झाल्याने सर्व शहरात लॉगडाउन करणे शासनाला भाग पडले. त्यामुळे कंपन्या व इतर सर्व कामावर संक्रांत आल्याने गावखेड्यातील सर्व मजुरवर्ग व कंपन्यांतील चांगल्या पगाराच्या नोकरीवाल्या युवकांना घरचा रस्ता धरावा लागला आहे. जवळपास तीन महिन्यापासून शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत गेल्याने लॉकडाउन कायम ठेवावा लागत आहे. 

मुंबई, पुणे व इतर महानगरातील परतलेल्या सर्वानाच आपआपल्या गावात स्वतःच्या शेतात कामाला हातभार लावावा लागत आहे. तर मजुरांनी शेतीकामाला प्राधान्य देऊन आपला गावच बरा असल्याचे दाखवून दिले आहे. सध्या रोहिणी नक्षत्र शेवटच्या चरणात असून, मृग नक्षत्राची चाहूल लागत असताना पेरणीची तयारी बळीराजा करत आहे. त्याच्या साथीला यावर्षी प्रथमच महानगरातील योद्ध्यांची साथ शेतीला लाभत आहे.

शेतीच्या कामात महानगरातील नागरिकांचा बोलबाला
सध्या पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व इतर महानगरातून बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या धास्तीने नागरिक परतले आहेत. त्यात जास्तीत जास्त मजूर वर्गाचा समावेश असल्याने व हा मजूर वर्ग सध्या तरी शहराकडे जाण्याचे नाव घेत नसल्याने शेती मशागतीच्या सर्व कामांना यावर्षी कधी नव्हे एवढा मजूर वर्ग मिळत असल्याने बळीराजाही सुखावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com