अकाेला : कृषी सेवा केंद्र शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत

शेती मशागतीच्या कामांना वेग; शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे
 Farmer seed purchase
Farmer seed purchase sakal

बार्शीटाकळी : गत दोन दिवसांपासून तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणातील तापमान कमी झाले. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने लवकरच मॉन्सून दाखल होणार आहे. पाऊसाला सुरुवात होईल याचा अंदाज आल्याने शेतकरी शेतीच्या मशागतीत व्यस्त झाला आहे. तालुक्यात खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला असून, बी-बियाण्याच्या खरेदीसाठी आता शेतकरी कृषी सेवा केंद्राच्या दिशेने धाव घेतील. परंतु, समाधानकारक पाऊस झाल्याने अजूनही शेतकरी कृषी केंद्राकडे वळले नसल्याने कृषी सेवा संचालक शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

पावसाने अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लवाली आहे. परंतु, मूबलक पाऊस झाला नसल्याने शेतकरी कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाही. काही शेतकऱ्यांनी आधीच बी-बियाण्यांची खरेदी करून ठेवली आहे. पाऊस जोरदार झाल्यास वेळेवर धावपळ होऊ नये या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांनी घरात बी-बियाणे घेऊन ठेवले आहेत. तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्र अजूनही शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

यंदा सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर या बियाण्यांच्या दरात बऱ्याच प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. मॉन्सूनपूर्व किंवा मॉन्सूनचा पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या तयारीला काहीसा उशीर होत आहे, मात्र गत दोन दिवसांपासून ठिकठिकाणी पाऊसाने हजेरी लावल्याने बाजारात विविध प्रकारची दर्जेदार बी-बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करणार आहेत.

शेतकऱ्यांकडून विविध कंपनीच्या बियाणांना अधिक पसंती दिली जात आहे. संबंधित कृषी सेवा केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बियाणांमुळे नेमका काय फायदा होऊ शकतो? याची माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केल्या जात आहे. गत वर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली आहे. सुधारित अथवा संकरित वाणांचे बियाणे उपलब्ध असून, लागवडीसाठी योग्य, शुद्ध, निरोगी आणि दर्जेदार बियाणे खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे, तर पारंपरिक व सुधारित वाणांची सुद्धा चांगली मागणी वाढली आहे.

शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक खरेदी करावी

बी-बियाण्यांच्या पिशवीवर किंवा पॉकेटवर लेबल, सील, संबंधित अधिकाऱ्याची सही, खरेदीची पावती, बियाण्याची जात, प्रकार, लॉट नं. बियाण्यांची उगवण शक्ती, शुद्धता, बियाणे वापराचा अंतिम मुदत या महत्त्वपूर्ण बाबींची खात्री करूनच शेतकऱ्यांनी बी-बियाणांची खरेदी करावी. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या बी-बियाण्यचे बिल पावती व्यवस्थित सांभाळून ठेवावी, जणे करून भविष्यात त्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके याबाबतचा दर्जा व भेसळबाबत काही शंका असल्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी.

शेतकऱ्यांनी समाधानकारक पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, बी-बियाण्यांची खरेदीनंतर संबंधित कृषी सेवा केंद्रातून पक्के बिल घेणे आवश्‍यक आहे. बी-बियाण्यांच्या पिशव्या, पॉकीट सांभाळून ठेवावे, जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.

- विलास वाशीमकर, तालुका कृषी अधिकारी, बार्शीटाकळी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com