अकोला : गेल्या चार-पाच वर्षांपासून भिजत ठेवलेला भारत राखीव बटालियन कॅम्पचा प्रश्न अखेर शासनाने मार्गी लावला आहे. हा कॅम्प आता अकोला जिल्ह्यातील तेल्हारा किंवा अकोला तालुक्यात होणार नसून तो काटोल जिल्ह्यात पळविण्यात आला आहे. तसा आदेश गुरुवारी निर्गमित झाला आहे. हा बदल करताना पालकमंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधी अंधारात होते का, असा प्रश्न नागरिकांना पडला असून, जिल्ह्यातील राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी हा नियोजित महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्यातून बाहेर गेल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.
भाजपची राज्यात सत्ता असताना सुरुवातीला हा कॅम्प तेल्हारा तालुक्यातील वांगेश्वर नजीक मंजूर करण्यात आला होता. जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असतानाच हा कॅम्प अकोला तालुक्यातील सिसा उदेगाव शिवारात नेण्याचे निश्चित करण्यात आले. या निर्णयामुळे तेल्हारा तालुक्यातील जनता संतप्त झाली होती. स्थानिक आमदार महोदयांना यामुळे लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. दरम्यान, यासंदर्भात मुंबईत एक बैठक आयोजित करून तत्कालीन मुख्यमंत्रांनी हा कॅम्प इतरत्र न हलविण्याचे आश्वासन दिले होते. गेले तीन वर्षांपासून हा विषय थंड बसत्यात ठेऊन आता थेट तो दुसऱ्या जिल्ह्यात मंजूर केला आहे. काटोल येथे हा कॅम्प होणार आहे. काटोल शहर नागपूरपासून जवळ असल्याने आणि मध्यवर्ती ठिकाण असल्याने हा कॅम्प तेथे मंजूर करीत असल्याचे तकलादू कारण यात पुढे करण्यात आले आहे.
दळणवळणाच्या मुद्द्यावर हा कॅम्प इतरत्र पळविला जात असेल तर तो तेल्हारा तालुक्यात मंजुरच का केला होता याचे उत्तर कुणाकडेही नाही. पालकमंत्री म्हणून बच्चू कडू यांनी ही जबाबदारी घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्ह्यात कायम ठेवण्यात अपयश ठरले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.