वाशीम : मागील महिण्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात जिल्हा कचेरीसमोर सोयाबीनची होळी करत शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. या नैसर्गिक आपत्तीतून बचावलेल्या सोयाबीनची काढणी सुरू असताना परतीच्या पावसाने तांडव सुरू केले. त्यामुळे खरिप हंगामासाठीची शेती मशागत, खते, बी-बियाणे, निंदन, खुरपन तसेच सोंगणी व काढणीसाठी लागलेला खर्च देखील वसूल होण्याची शक्यता मावळली. शेतकरी नैसर्गिक संकटात सापडला असताना प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानंतर जिल्ह्यातील खरिपाची नजर अंदाज पैसेवारी ६६ पैसे जाहीर केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर विमा कंपनीकडून परतावा मिळाला नाही तर, शासनाने जाहीर केलेल्या पैसेवारीमुळे दुष्काळी मदतीपासून सुध्दा वंचित राहण्याची वेळ आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकटांचा डोंगर उभा झाला. शासन, प्रशासनाने जिल्ह्यातील पीक नुकसानीचे फेर सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तत्परतेने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होवू लागली आहे. याच मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दामुअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात एकत्र आलेल्या संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीसमोर सोयाबीनची होळी करून नुकसान भरपाईची मागणी केली. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
(संपादन - विवेक मेतकर, अकोला) |
|||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.